Saturday, 16 December 2017

अंबरीषाची श्रीकृष्णभक्ती




प्राचीन  काळातील  घटना  आहे.  अंबरीष नावाचा एक राजा अनन्य भगवतभक्त होता. त्याच्या राजकोषामध्ये अतूलनीय ऐश्वर्य होते.  परंतू  ते सर्व तो स्वप्नवत  मानीत असे. कारण त्याला माहित होते कि, हे सर्व ऐश्वर्य नाशिवंत आहे. केवळ एकच श्रीकृष्ण शाश्वत आहे. म्हणून तो सर्वांगाने  नित्य निरंतर श्रीकृष्णभक्ती करीत असे. कानाने श्रीकृष्ण  लीलाचे, गुणांचे नित्य निरंतर श्रवण करीत असे. तो सर्वत्र डोळ्याने  श्रीकृष्णदर्शन करीत असे. सर्व प्राणिमात्रांमध्ये तो श्रीकृष्णाचेच दर्शन करीत असे. वाणीने तो श्रीकृष्णाचेच संकिर्तन करीत असे. तो नाकाने  निर्माल्य तुलसीदलाचा  वास घेत असे. तो जिभेने फक्त श्रीकृष्णाचाच प्रसाद  ग्रहण करीत असे. तो श्रीकृष्णाचेच मनाने  निरंतर चिंतन करीत असे. तो  स्वत:च्या हाताने  श्रीकृष्णाच्या मंदीराची सेवा करीत असे. तो पायाने तीर्थयात्रा करीत असे. श्रीकृष्णाच्या लिला जेथे-जेथे झालेल्या आहेत, तेथे-तेथे तो पायी चालून तीर्थयात्रा करीत असे. तो श्रीकृष्णाच्या मंदीराचा जिर्णोध्दार करीत असे. मस्तकाने  श्रीकृष्णाच्या चरणकमलांची सेवा करीत असे. अशा प्रकारे तो अनन्यतेने श्रीकृष्ण भक्ती सर्वांगाने करीत असे. म्हणून भगवान श्रीकृष्ण त्या निष्काम भक्तावर अति  प्रसन्न  झाले होते. आणि श्रीकृष्णाने  अंबरीष राजाच्या रक्षणासाठी सुदर्शनचक्र नियुक्त केले होते. कोणीही अंबरीष राजा छळण्याचा प्रयत्न केला तर ते सुदर्शनचक्र त्याचा निप्पात करीत असे.
एकदा अंबरीष राजाने  वर्षभराच्या  निर्जल उपवास करून एकादशीचे  व्रत  पूर्ण केले द्वादशीस  पारणे करण्यासाठी   ब्राह्मणास सुग्रास भोजन दिले. तसेच साठ  कोटी  सवत्स-गोदान केले. दान केलेल्या गाईची  शिंगे  सोन्याने  तर  खुर  चांदीने  मढविलेले होते.  आता स्वतः  पारणे  करणार  तोच  दुर्वासामुनी  तेथे आले. राजाने मुनींचे स्वागत केले. पाद्यपुजा केली आणि  भोजनाचे  निमंत्रण दिले. परंतू  दुर्वासामुनी  स्नानासाठी नदीवर गेले. बराच  वेळ झाला तरी आलेच  नाहीत. आता अर्ध्या  घटकेनंतर  त्रयोदशी लागणार होती. मुनींचे भोजन झाल्याशिवाय राजा स्वतः  पारणे करू शकत नव्हता. पारणे केले नाही तर वर्षभराचे व्रत पुर्ण होणार नाही. राजापुढे  धर्मसंकट उभे राहिले. म्हणून राजाने राजगुरूंच्या उपदेशानुसार  जलप्राशन  केले  तोच  दुर्वासामुनी  हजर झाले. माझ्या भोजनाच्या आधी पारणे केल्याने क्रोधीत झाले. त्या मुनींनी जटेतून एक राक्षसी काढून ती अंबरीष राजावर सोडली. राजाच्या रक्षणासाठी अस्लेल्या सुदर्शनचक्राने त्या राक्षसीचा  संहार केला. आता ते
सुदर्शनचक्र  मुनींच्या  मागे लागले. सुदर्शनचक्राची धगधगती आग मुनींना व्याकुळ करू लागली. मुनींनी स्वत:च्या तप सामर्थ्याने त्या सुदर्शनचक्रास प्रतिकार करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतू सुदर्शनचक्र साक्षात  श्रीकृष्णाचे असल्याने कोणीही त्याचा प्रतिकार करू शकले नाही. दुर्वासामुनी त्या सुदर्शनचक्रातून सुटकेसाठी ब्रह्मदेवास, नंतर महादेवास, व शेवटी विष्णुस  शरण गेले. परंतू  सुदर्शनचक्र  थांबेना. भगवान विष्णु म्हणतात--मी  भक्तांच्या आधीन आहे. मीच  त्यांचा  एकमेव  आश्रय आहे.  तप, विद्या  ही  कल्याणकारी  साधने आहेत परंतू  अहंकाराने  तीच  विपरीत  फळ  देतात. या सुदर्शनचक्रातून सुटकेसाठी तुला  अंबरीषराजा  कडेच  जावे लागेल. अंबरीषराजा माझा अनन्य भक्त आहे. त्याची कोण्तीही चूक नसताना तू केवळ तुझ्या अहंकाराने त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला. मी त्याचे रक्षण केले आहे. नाईलाजास्तव दुर्वासामुनी अंबरीषराजास शरण गेले. तेव्हा अंबरीष--हे  सुदर्शनचक्रा,  आजवर  मी  जे  काही  धर्मकार्य  केले  असेल  तर  शांत  हो. तेव्हा  सुदर्शनचक्र शांत  झाले. तेव्हा दुर्वासा मुनींना भक्तांचे सामर्थ्य समजले. दुर्वासा--आज  मी  भक्ताचे  महत्व  जाणले.  माझा  अपराध  विसरून  मला  जीवनदान  दिले.

No comments:

Post a Comment