सती तारामती
अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा । पंचकन्या स्मरे नित्यं महापातक नाशनम् ।।
जो मनुष्य अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, व मंदोदरी या पाच जणींचे स्मरण दररोज करतो त्याची महा पातके नष्ट होतात असे आपल्या संस्कृतीचे महत्व आहे. अहल्या गौतमऋषींची पत्नी, द्रौपदी पांडवांची पत्नी, सीता श्रीरामाची पत्नी, तारा हरिश्र्चंद्राची पत्नी, व मंदोदरी ही रावणाची पत्नी होय.
हजारो वर्षांपुर्वी आपल्या भरतखंडामध्ये शैब्य राजास तारामती नावाची एक सद्गुणी कन्या होती. ती रूपाने ही सौंदर्यवान होती. कालांतराने ती उपवर झाल्यानंतर तीचा विवाह हरिश्र्चंद्र राजाशी झाला. हरिश्र्चंद्र राजा सत्यनिष्ठ होता. हरिश्र्चंद्र राजास अनेक भार्या होत्या. परंतू तारामती ही पट्टराणी होती. ही तारामती प्रजापालनामध्ये राजा इतकीच प्रजावत्सल व दक्ष होती. नियत कर्तव्यापुढे तीने सुख विलासाचे स्तोम कधीही माजविले नाही. हरिश्र्चंद्र राजाची आज्ञा प्रमाण मानून ती प्रजेची सेवा करीत असे. आपले वैयक्तिक सुख-दुःख तीने हरिश्र्चंद्र राजास समर्पित केले होते. राजाच्या सुख-दुःखामध्ये ती समरस झालेली होती. अनेक वर्षांपर्यंत त्या दोघांस पुत्रप्राप्ती झाली नाही. म्हणून त्यांनी वरूणराजास प्रसन्न करून त्याच्या कृपेने पुत्र प्राप्त केला. त्याचे नाव रोहीत होते. अनेक वर्षांनंतर सती तारामतीला पुत्र झाल्यामुळे राज्यामध्ये सर्वत्र आनंदी आनंद झालेला होता.
एके दिवशी विश्वामित्र ऋषींनी सत्यनिष्ठ हरिश्र्चंद्र राजाची सत्त्वपरिक्षा घेण्याचे ठरविले. त्यांनी मायेने उत्पन्न केलेल्या कन्येच्या लग्नामध्ये मायेनेच उत्पन्न केलेल्या वरास, ऋषींनी सत्यनिष्ठ हरिश्र्चंद्र राजाकडून स्वतःचे संपूर्ण राज्य दान करून घेतले. त्यानंतर गुरूदक्षिणेसाठी हरिश्र्चंद्रास आपल्या तारामती या पट्टराणी व प्रिय पुत्र रोहीत यांना एका वृध्द ब्राह्मणास विकण्यास सांगितले. सती तारामतीने सत्यनिष्ठ हरिश्र्चंद्र राजाच्या सत्त्वपरिक्षेसाठी सर्व काही विनम्रतेने सहन केले. तर हरिश्र्चंद्रास विश्वामित्र ऋषींनी स्मशानामध्ये गुलामगिरीचे काम करण्यास भाग पाडले. सत्यनिष्ठ हरिश्र्चंद्र आलेल्या सर्व संकंटांना मोठ्या धीराने सामोरे जात असे. तो वृध्द ब्राह्मण सती तारामती व पुत्र रोहीत यांच्या कडून अतिशय भयंकर शारीरक कष्टाची कामे करवून घेत असे. परंतू सती तारामती आपल्या सत्यनिष्ठ हरिश्र्चंद्रासाठी सर्व असह्य वेदना निमूटपणे सहन करीत असे. अनेक दिवसांच्या या भयंकर शारीरक कष्टाच्या छळानंतर त्या वृध्द ब्राह्मणाने सती तारामतीचा मानसिक छळ सुरू केला. एके दिवशी रोहीतास सर्पदंश घडवून त्यास मारले. त्या मुलाचे प्रेत सती तारामतीला स्वतः स्मशानामध्ये घेऊन जाण्यास भाग पाडले व लहान मुलांस मारणारी अवदसा म्हणून तेथील राजांस खोटी तक्रार केली. त्या राजाने सती तारामतीस देहान्ताची शिक्षा ठोठावली. त्या राजाच्या आज्ञेनुसार सती तारामतीचा वध करण्याचे काम सत्यनिष्ठ हरिश्र्चंद्रास सांगितले. सत्यनिष्ठ हरिश्र्चंद्रावर हे महान संकंट आलेले होते. प्रिय पुत्राचा मृत्यु आणि प्रिय पत्नीचा आपल्या हाताने घात करण्याची शिक्षा. परंतू या विश्वामित्र ऋषींनी घेतलेल्या सत्त्वपरिक्षेमध्ये सत्यनिष्ठ हरिश्र्चंद्र उतीर्ण झाला. तेव्हा विश्वामित्र ऋषींनी व देवेंद्राने प्रसन्न होऊन मृत रोहीतास पुन्हा जिवंत केले. व मायेचा खेळ संपविला. सत्यनिष्ठ हरिश्र्चंद्रास त्याचे संपूर्ण राज्य परत मिळाले.
अशा असह्य परिस्थितीमध्ये सती तारामतीने पत्नी व माता म्हणून जी आदर्श वागणूक सिध्द केलेली आहे त्यामुळे देवेंद्र सती तारामतीवर संतुष्ट झाला. व त्याने सती तारामतीस सती पतिव्रता म्हणून स्वर्गामध्ये सन्मानाने प्रवेश दिला. भारतीय संस्कृतीने सती तारामतीला प्रातःस्मरणीय अशा पंचकन्येमध्ये स्थान देऊन अमर केलेले आहे. अशा थोर मातेचे चरित्र वाचून त्यातील शक्य ते आचरण करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. सती तारामतीची विनम्रता, सहनशीलता, वात्सल्यता, पतिनिष्ठा, निर्भयता, धैर्यशील अशा अनेक सदगुणांचे स्मरण करून त्याचे आचरण प्रत्येक भारतीय नारीने केले तर भारताचे भविष्य उज्वल होईल यात तिळमात्र शंका नाही. हीच भारतीय नारीची श्रेष्ठता आहे.
No comments:
Post a Comment