Friday, 15 December 2017

विद्येची आधिष्ठार्थी सावित्रीबाई फुले



विद्येची  आधिष्ठार्थी  सावित्रीबाई  फुले

 साताया  जिल्ह्यातील  नायगाव  येथील  खंडोजी  नेवसे  पाटील  यांची  जेष्ठ  कन्या  सावित्रीबाई  यांचा  विवाह  वयाच्या  नवव्या  वर्षी  महात्मा  जोतीबा  फुले  यांच्याशी  सन  १८४०  मध्ये  झाला.  आणि  सावित्रीबाई  फुले  यांच्या  अलौकिक  जीवनकार्यास  सुरवात  झाली.
 ज्या  काळामध्ये  स्त्रीने  शिकणे  धर्मबाह्य,  निषिध्द    महापाप  समजले  जाई  त्या  काळामध्ये  मुळामध्ये  निरक्षर  असलेल्या  सावित्रीबाईंनी  आवश्यक  तेव्हढे  शिक्षण  विवाहानंतर  घेतले.  प्रारंभी  पतीच्या,  जोतीबांच्या  आग्रहास्तव  आणि  काळाच्या  ओघात  स्वयंप्ररणेने,  स्वाध्यायाद्वारे,  स्वतःच्या  अखंड  परिश्रमाने,  कर्तृत्वाने  त्या  आद्य  शिक्षीका,  आद्य  मुख्याध्यापिका,  आद्य  समाजसेविका,  आद्य  दीनदलितांच्या  उध्दारक   इतकेच  नव्हेतर  आधुनिक  मराठी  कवितेच्या  गंगोत्री  म्हणून  सावित्रीबाई  फुले  आज  सुध्दा  अजरामर  आहेत.निबंधाचा  विषय  विद्येशी  संबंधीत  असल्याने  सावित्रीबाई  फुले  यांनी  जे  शिक्षणकार्य  केले  त्याचाच  विस्ताराने  उल्लेख  येथे  करीत  आहे.  तरीही  त्यांच्या  इतर  समाजकार्याचा  संक्षेप्तामध्ये  उल्लेख  केल्याशिवाय  त्यांचे  चरित्र  पूर्ण  होणार  नाही.
 अज्ञानग्रस्त  शूद्र  जसे  ब्राह्मणादी  वरीष्ठ  वर्गाच्या  दास्यात  खितपत  पडले  आहेत  त्याच  प्रमाणे  स्त्रीजात  देखील  पुरूषवर्गाच्या  दास्यात  युगानूयुगे  सापडलेली  आहे.  हे  लक्षात  घेऊन  महात्मा  जोतीबा  फुले  यांनी  सन  १८४८  मध्ये  मुलींसाठी  एक  शाळा  स्थापन  केली.  सावित्रीबाईंनी  याच  शाळेमध्ये  अध्यापनाचे  कार्य  सुरू  केले.  घरच्या  नातेवाईकांचा,  माळी  समाजाचा  विरोध  पत्करून  समाजाकडून  अवहेलनात्मक  प्रतिकूल  परिस्थितीमध्ये  धैर्याने  तोंड  देऊन  समाजकार्य  चालू  ठेवले.
 सामाजिक  विषमता  दूर  करून  समतेवर  आधारलेल्या  आधुनिक  शिक्षण  पध्दतीचा  अवलंब  करण्याचे  जोतीबांचे  ध्येय  हेच  आपल्या  जीवनाचे  उद्दीष्ट  ठरवून  सावित्रीबाईंनी  जन्मभर  कार्य  केले.  शाळेमध्ये  मुलांची  अनुपस्थिती  होऊ  नये  त्यांना  शिक्षणाची  गोडी  लागावी  यासाठी  त्या  स्वतः  पालकांच्या  भेटी  घेऊन  त्यांना  शिक्षणाचे  महत्व  समजाउन  देत  असत.  तसेच  मुलांना  अभ्यासामध्ये  विरंगुळा  म्हणून  खाऊ  देत  असत.  इतकेच  नव्हेतर  मुलांच्या  विशेष  हुशारीबद्दल  बक्षिसे  देत  असत.  शाळेचे  वातावरण  आरोग्यदायी,  शाळेतील  मुलामुलींचे  चारित्र  निर्माण  या  गोटींकडे  त्या  जातीने  विशेष  लक्ष  देत  असत.  अशा  सर्व  गोष्टींचा  विचार  करून  शिक्षणाचे  कार्य  अखंडीतपणे  चालू  रहावे  यासाठी  त्या  अहोरात्र  झटत  होत्या.
 सन  १८५२  मध्ये  स्त्रीयांच्या  समस्या  सोडविण्यासाठी,  त्यांची  सुधारणा  करण्यासाठी  महिला  सेवा  मंडळाची  स्थापना  करून  अनेक  सांस्कृतिक  कार्यक्रम  जातिभेद  विरहित  भावनेने  सुरू  केले.  त्याची  देशभर  चर्चा  झाली.  यावरून  सावित्रीबाईंच्या  संग्राहकवृत्तीची,  उत्सवप्रियतेची,  सेवावृत्तीची,  जातीभेद  निर्मूलनाची    पुरोमीत्वाची  कल्पना  येते.
 सन  १८६३  मध्ये  विधवा  स्त्रियांच्या  मुलांच्या  हत्या  थांबविण्यासाठी  बालहत्या  प्रतिबंधगृहाची  स्थापना  करून  असंख्य  बालहत्या  थांबविल्या.  त्यामध्ये  स्वतः  स्वयंपाक  करून,  विधवांचे  बाळंतपणे  सुध्दा  करण्यामध्ये  कमीपणा  मानला  नाही.  त्या  मुलांना  शिक्षण  देऊन  त्यांचा  जीवनमार्ग  सुरळीत  केला.  सन  १८७३  मध्ये  पहिला  सत्यशोधक  विवाह  सावित्रीबाईंनी  पुढाकार  घेऊन    स्वखर्चाने  केला.  त्याची  ही  देशभर  चर्चा  झाली.  सन  १८७६  मध्ये  महाराष्ट्रामध्ये  भीषण  दुष्काळ  पडला  होता.  त्या  दुष्काळपिडीत  गरीब  मुलांसाठी  व्हिक्टोरिया  बालाश्रमाची  स्थापना  करून  अनेक  मुलांचे  पालन  पोषण,  संगोपन  केले.
 जोतीबांच्या  अखेरच्या  आजारपणामध्ये  औषधालासुध्दा  पैसे  नसताना  मिळेल  ते  काम  करून  त्यांची  सेवा  सुश्रुषा  अहोरात्र  केली.
 जोतीबांच्या  निधनानंतर  त्यांचे  भाऊबंद  अंतयात्रेस  आडवे  आले  असता  सावित्रीबाईंनी  धीराने  स्वतःच्या  हाती  टिटवे  धरून  स्वतः  जोतीबांच्या  पार्थीव  शरीराला  अग्नी  दिला.  भारताच्या  इतिहासामध्ये  घडलेली  ही  क्रांतीकारक  घटना  मुद्दाम  नमुद  करावीसी  वाटते.
 त्यानंतर  सत्यशोधक  समाजाचे  नेतृत्व  त्यांनी  खंबीरपणे  साभाळले.  सन  १८९६  मध्ये  महाराष्ट्रामध्ये  भीषण  दुष्काळ    सन  १८९७  मध्ये  प्लेगची  साथ  झाली  होती.  तेव्हा  रोग्यांची  सुश्रुषा  करीत  असतानाच  त्यांना  प्लेगची  रोगण  झाली    त्यातच  त्यांचा  दि.१०.३.१८९७  रोजी  अंत  झाला
 तत्कालीन  राजकीय  ऋषी  म्हणून  मान्यता  प्राप्त  झालेले  मामा  परमानंद  यांनी  आयुष्याच्या  उतरणीला  लागलेल्या  फुले  दांपत्याला  आर्थिक  सहाय्य  मिळावे  म्हणून  सयाजीराव  गायकवाड,  बडोदा  संस्थान  यांना  पत्राद्वारे  कळविले,  --  जोतिबांपेक्षा  त्यांच्या  पत्नीचे  कौतुक  करावे  तेव्हढे  थोडेच  आहे.  आपल्या  पती  बरोबर  तिने  संपूर्ण  सहकार्य  केले    त्यांच्या  बरोबर  वाट्याला  येतील  त्या  हालआपेष्टा  भोगल्या.  उच्चवर्णातील  उच्च  शिक्षण  घेतलेल्या  स्त्रीयात  ही  अशा  प्रकारची  त्यागी  स्त्री  आढळून  येणे  कठीण  आहे.
 यावरून  सावित्रीबाईंच्या  अलौकीक  कार्याचा  अंदाज  होऊ  शकतो.
 अशा  विद्येची  आधिष्ठार्थी  सावित्रीबाई  फुले  यांना  आदरांजली  वाहून  त्यांच्या  चरित्रातून  स्फुर्ती  घेऊन  त्यांंचे  अलौकीक  कार्य  निरपेक्षवृत्तीने  अखंडीतपणे  चालू  ठेवण्याची  आज  सुध्दा  प्रखरतेने  गरज  आहे.


No comments:

Post a Comment