Monday, 11 December 2017

गीता एक इतिहास



गीता  एक  इतिहास
गीतेतील  तत्त्वज्ञानाविषयी  अनेक  थोर  विचारवंतांनी  थोर  विचार  प्रगट  केले  आहे.  येथे  फक्त  गीतेतील  ऐतिहासिक  उल्लेखांचा  विचार  व्यक्त  करणार  आहे.
महाभारत  युध्द  टाळण्याच्या  अनेक  प्रयत्नांना  अपयश  आल्यामुळे  युध्द  अटळ  झाले  तेव्हा  ते  युध्द  राजमहालात  बसून  पहाण्याची  दिव्य  दृष्टी  भगवान  व्यासांनी  धृतराष्ट्राला  देऊ  केली  परंतू  भित्र्या  धृतराष्ट्राने  ती  दिव्य  दृष्टी  आपल्या  सारथी,  संजयांस  देण्याची  विनंती  केली.  म्हणून  संजयाने  धृतराष्ट्रास  सांगितलेली   गीता  आज  प्रसिध्द  आहे.  केवढे  भाग्य  त्या  संजयाचे  कारण  हे  गीताज्ञान  केवळ  अर्जुनास  श्रीकृष्णाने  दिले  होते.  तरी  श्रीकृष्णाचे  विश्वरूप  दर्शन  जसे  अर्जुन  घेत  होता  तसेच  संजयांस  ते  मिळत  होते.
दुसरी  महात्वाची  गोष्ट  गीतेचा  उपदेश  रणभूमीवर  सांगितला.  युध्दाचे  शंखघोष  झाल्यावर  हा  उपदेश  सांगितला.  त्यावेळी  कौरव  पक्षाच्या  पराक्रमी  महावीरांनी  काय  केले  असेल?  शांत  बसले  असतील  ?  जेव्हा  याच  युध्दामध्ये  कर्ण  निःशस्त्र  झाल्यावर  अर्जुनाने  जेव्हा  शस्त्रसंधान  केले  तेव्हा  तो  धर्मनीती  सांगू  लागला.  त्यावर  श्रीकृष्ण  त्यास  म्हणाले  ही  युध्दभूमी  आहे.  ज्यावेळी  द्रौपदीचे  वस्त्रहरण  झाले  आणि  इतर  अनेक  अधर्म  दुर्योधनाने  केले  तेव्हा  तूझी  धर्मनीती  दुर्योधनास  का  सांगितली  नाहीस  ही  युध्दभूमी  आहे.  वादविवाद  सभा  नाही.
तर  उत्तर  असे  आहे  अर्जुनाचा  मोह  घालविण्यासाठी  श्रीकृष्णाने  केवळ  अर्जुनास  काळाच्या  पलीकडे  नेऊन  उपदेश  केला.  हे  आपल्याला  अशक्य  वाटते.  परंतू  श्रीकृष्णास  काहीही  अशक्य  नाही.  त्या  युध्दभूमीच्या  कालगणतीनुसार  अर्जुनास  मोह  झाल्यानंतर  दुसऱ्या क्षणामध्ये  श्रीकृष्ण  उपदेशाने  अर्जुनाचा  मोह  दूर  झाला.
कर्मयोगाचा  उपदेश  करीत  असताना  जनक  राजाच्या  कर्तव्य  पालनाचा  उल्लेख  गीतेमध्ये  आलेला  आहे.  तसेच  हा  उपदेश  श्रीकृष्णाने  विवस्वानाला  केला  त्याने  तो  उपदेश  मनुला   मनुने  इक्ष्वाकूला  केला  पुढे  ही  ज्ञान  परंपरा  कालांतराने  खंडीत  झाली  म्हणून  तेच  ज्ञान  श्रीकृष्णाने  अर्जुनास  दिले  असा  उल्लेख  गीतेमध्ये  आहे.
त्याच  प्रमाणे  आदित्यामध्ये  विष्णु,  मरूद्गणांमध्ये  मरीची,  वेदांमध्ये  सामवेद,  देवतांमध्ये  इंद्र,  रूद्रांमध्ये  शंकर,  यक्षराक्षसांमध्ये  कुबेर,  पुरोहितांमध्ये  बृहस्पति,  सेनानायकांमध्ये  कार्तिकेय,  महर्षींमध्ये  भृगु,  देवर्षींमध्ये  नारद,  गंधर्वांमध्ये  चित्ररथ,  सिध्दांमध्ये  कपिलमुनि,  समुद्रमंथनातून  उत्पन्न  झालेला  ऐरावत,  उच्चैःश्रवा,  कामधेनु,  दैत्यांमध्ये  प्रल्हाद,  शस्त्रधायांमध्ये  श्रीराम,  मुनींमध्ये  व्यास,  कवींमध्ये  शुक्राचार्य,  अश्या  अनेक  ऐतिहासिक  व्यक्तींचा  उल्लेख  गीतेमध्ये  श्रीकृष्णाने  विभूती  म्हणून  केला  आहे.
अश्या  रितीने  गीतेतील  तत्त्वज्ञान  बाजूला  ठेऊन  गीतेतील  ऐतिहासिक  महत्व  मांडण्याचा  येथे  प्रयत्न  केला  आहे.

No comments:

Post a Comment