Saturday, 1 July 2017

पांडुरंगाची जीवनयात्रा


  पांडुरंगाची  जीवनयात्रा
 प.पू.पांडुरंगशास्त्री  आठवले  यांचा  जन्म  १९.१०.१९२०  रोजी  कोकणातील  रोहे  या  गावी  झाला.  त्यांचे  आई  वडील  शहरात  रहात  असल्यामुळे  बालपण  आजी  आजोबांबरोबर  रोहे  गावातच  गेले.  लहानपणी  त्याचे  आजोबा  त्याला  कौतुकाने  झकास  पांडुरंग  म्हणत  असत.  लहानपणीच  आजी  आजोबांकडून  अनेक  चूकीच्या  चालीरीतींची  जाणिव  झाली.  तेव्हापासून  त्याचा  विचार  सूरु  होता  की  हे  समाजातील  चित्र  बदलले  पाहिजे.  लहानपणातील  एक  गोष्ट  त्याने  जन्मभर  लक्षात  ठेवली  होती.  साधारण  वयाच्या  सहाव्या  वर्षी  त्याचे  लाडके  आजोबा  निवर्तले.  अंतसमयी  त्यांनी  झकास  पांडुरंगाला  जवळ  घेऊन  सांगितले,--  पांडुरंगा,  आठवले  घराण्यानं  आजपर्यंत  प्रखर  व्रतनिष्ठा  जपली  आहे.  व्रतनिष्ठा  म्हणजे  एखादी  गोष्ट  करायची  ठरविल्यानंतर  त्यापासून  कोणी  ढळत  नाही.  तुलाही  असंच  व्रतनिष्ठ  राहावं  लागेल.  तुला  मी  संस्कृत  तुला  शिकवतो  ते  भिक्षुकी  करण्यासाठी  नाही  हे  ध्यानात  ठेव.  संस्कृतीचा  उपयोग  केवळ  कर्मकांडापुरताच   राहता  तो  समाजाभिमुख  झाला  पाहिजे.  संस्कृत  वाङमयातले  मौलीक  विचारच  सुसंस्कृत  समाज  घडवू  शकेल.  आणखी  एक  महत्वाची  गोष्ट  सांगतो  कुणाकडून  उसनं  घ्यायचं  नाही.  उधार  मागायचं  नाही.  कर्ज  काढायचं  नाही  आणि  जामिन  राह्यचं  नाही.  अन्यथा  अंगी  तेजस्विता  येत  नाही.
 पुढे  दहाव्या  वर्षी  पांडुरंग  मुंबईला  आला.  संस्कृताच्या  उच्च  अभ्यासासाठी  प्रौढ  मनोरमा,  परिभाषेंदु  शेखर,  लघुशब्देंदु  शेखर,  लघुमंजुषा  परमलघुमंजुषा,  व्याकरण  महाभाष्य,  तर्कसंग्रह,  न्यायकुसुमांजलि,  कुवलयानंद,  पंचदशी,  भामती,  सर्वदर्शन  संग्रह,  मीमांसा  परिभाषा  इत्यादी  अनेक  वाङमयांचे  पांडुरंगाने  अध्ययन  केले.  त्यानंतर  त्याने  परदेशी  वाङमयाचा  अभ्यास  सुरू  केला.  शेक्सपियरचे  संपुर्ण  वाङमय,  मास्टर  ऑफ  मॅन,  हॉलबेन,  प्राइड  अँड  प्रिज्युडाइज्ड,  लेसन्स  ऑफ  हिस्टरी,   रिफॉरमेशन,   स्टोरी  ऑफ  फिलॉसॉफी,   स्टोरी  ऑफ  सिव्हिलायझेशन  इत्यादी  अनेक  पाश्चात्य  संस्कृतीच्या  वाङमयाचा  त्याने  उदार  अंतःकरणाने  सखोल  अभ्यास  केला.  या  सर्व  अभ्यासाचा  व्यासंग  इतका  मोठा  की  मुंबईच्या  रॉयल  एशियाटिक  लायब्ररीमधील  कोणते  पुस्तक  कोठे  ठेवले  आहे  हे  त्या  लायब्ररीचा  लायब्ररीयन  पांडुरंगशास्त्री  आठवले  यांना  विचारीत  असे.  इथे  स्वामी  विवेकानंदांची  आठवण  येते.  स्वामी  असेच  मोठमोठाले  पुस्तकांचे  खंड  एका  रात्रीतून  वाचून  काढीत  असत,  तर  एका  माणसाला  हे  खरे  वाटले  नाही  तर  स्वामींनी  त्याला  अमुक  एक  ओळ  ही  कोणत्या  पुस्तकामध्ये,  कीतव्या  पानावर,  वरून  कीतव्या  ओळीवर  आहे  असे  एक  नव्हे  दोन  नव्हे  तर  पंधरा  वीस  उदाहरणे  आजच्या  य़ुगातील  संगणकासारखी  धाडधाड  सांगायला  सुरवात  केली.  तेव्हा  त्या  माणसाची  अवस्था  काय  झाली  असेल  हे  प्रत्येकानेच  समजून  घ्यावे.  तसेच  लोकमान्य  टिळकांचेही  उदाहरण  असेच  आहे.  कारगृहात  लिहीलेला  गीतारहस्य  इंग्रजांनी  नष्ट  केला,  तेव्हा  टिळक  म्हणाले  काही  काळजी  करू  नका,  गीता  रहस्य  माझ्या  डोक्यामध्ये  आहे.  घ्या  लिहून.  वगैरे.  लोकमान्य  टिळकांचे  उदाहरण  मुद्दामूनच  दिले  आहे.  प.पू.पांडुरंगशास्त्री  आठवले  टिळकांचे  अवतार  आहेत  असे  म्हणले  तर  काही  वावगे  होणार  नाही  असे  मला  वाटते.  असो.
 असा  सर्वांगीण  अभ्यास  केल्यानंतर  आपल्या  भारत  देशाच्या  आजच्या  सामाजिक  परिस्थितीचा  विचार  करताना  प.पू.पांडुरंगशास्त्री  आठवले  म्हणतात,  --  कर्मकांड,  जातीभेद,  वर्णभेद,  दारिद्र्य,  उच्चनिचता  अश्या  अनेक  गोष्टींमध्ये  या  देशातला  प्रत्येक  माणूस  अडकून  पडला  आहे.  त्यामुळेच  तो  प्रगत  होऊ  शकला  नाही.  त्यावर  एकच  उपाय  आपल्या  प्राचिनतम  वैदिक  संस्कृतीवर  आलेलं  मळभ  दूर  केलं  पाहिजे.  हे  कार्य  मी  करणार.  समाजसेवा  म्हणून  नाही  तर  हा  माझा  स्वधर्म  आहे.  कारण  समाजसेवा  हळूहळू  व्यवसाय  बनतो.  हे  कार्य  मी  अंगावर  घेतलेले  नसून  अंतःप्रेरणेने  ते  स्फुरलेले  आहे.  वैदिक  संस्कृतीच्या  बळावर  आधुनिक  काळात  मानव  कल्याणार्थ  क्रांती  घडवून  आणायची  असेल  तर  सर्वप्रथम  माणूस  घडवायला  हवा.  संस्कृतीच्या  कार्याची  धुरा  प्रतिकूल  परिस्थितीमध्ये  वाहून  नेण्याची  धमक  त्याच्या  जवळ  असायला  पाहिजे.  भगवंतावर  त्याची  निष्ठा  असली  पाहिजे.  वैचारीक  पातळीवर  प्रस्थापितांच्या  विरोेधात  उभं  रहाण्याचा  आत्मविश्वास  त्याच्या  ठायी  पाहिजे.  या  वैदिक  संस्कृतीच्या  विचारधारेने  भारावून  गेलेल्या  पाश्चात्यांचे  उदाहरण  देताना  प.पू.दादा  अनेकदा  म्हणत,  --  अमेरिकने  हिरोशीमा-नागासाकि  या  शहरांवर  अणुबाँब  टाकायच्या  अगोेदर  अमेरिकन  शास्त्रज्ञांनी  वाळवंटात  त्याची  चाचणी  घेतली  त्यावेळी  स्फोटाचे  रौद्ररूप  पाहून  शास्त्रज्ञांच्या  गटातला  ओपेन  हैमर  शास्त्रज्ञ  म्हणाला,  --  हा  स्फोट  पाहून  मला  गीतेतल्या  अकराव्या  अध्यायाची  आठवण  येत  आहे.  आणि  आपण  भारतीय  गीतेवर  शंका  घेतो  आहे.
 आपल्या  पत्नीला  प.पू.दादांनी  लग्नानंतर  सांगितले,  --  मी  केवळ  विद्वान  पंडित  बनून  रहाणार  नाही.  मला  धर्माची  शुध्दी  करायची  आहे.  लोकांच्या  तामसी  कारवायांना  आवर  घालण्याची  शक्ती  फक्त  धर्मात  असते.  त्या  धर्माचे  शुध्द  स्वरूप  मला  समाजासमोर  ठेवायचे  आहे.  दुष्ट  चालीरीती,  भ्रष्ट  कर्मकांड,  जातीभेद  अश्या  गोष्टींचा  धर्माला  गंज  चढला  आहे.  तो  गंज  काढण्याचं  कार्य  मला  करायचे  आहे.  आणि  त्यातून  केवळ  भगवंतावर  निष्ठा  ठेऊन  मानवधर्म  पाळणारा  माणूस  मला  घडवायचा  आहे  हे  कार्य  सोपं  खासच  नाही.  आज  शेजारचा  माणूस  देखील  आपल्याला  ओळखत  नाही  अश्या  परिस्थितीमध्ये  आपल्याला  काम  करायचं  आहे.  या  कार्यात  मला  तुझं  सहाय्य  हवं  आहे.  आणि  खरोखरच  त्या  माऊलीने  प.पू.दादांना  शेवट  पर्यंत  सर्व  प्रकारे  सहाय्य  केले.  इथे  महायोगी  श्रीअरविंदांची  आठवण  येते.  ते  आपल्या  पत्नीला  पत्रात  लिहीतात,--  परमेश्वराची  प्राप्ती  आणि  मायभूमीची  भक्ती  यासाठी  स्वीकारलेली  निवृत्ती  हेच  माझे  जीवन  आहे..  पत्नी  ही  पतीची  सहचारीणी  असते  पती  ज्या  वाटेने  जातो  त्याच  वाटेवरून  तीची  पावले  पडावेत  अशी  अपेक्षा  असते.....  असो.
 स्वाध्याया  विषयी  प.पू.दादां  सांगतात,  --  वैदिकांची  विचारधारा  आणि  ऋषींच्या  परिश्रमांची  परंपरा  यामधून  स्वाध्यायाची  निर्मिती  झाली  आहे.  दुर्दैवाने  आज  समाजाला  त्याचे  विस्मरण  झाले  आहे.  वेदविचारांचे  पठण,  चिंतन  आणि  मनन  यामुळे  विचारशील  तसेच  गतिमान  मानवसंघ  तयार  होतो.  कारण  स्वाध्यायामुळे  परिस्थितीचे  परिवर्तन  किंवा  मूल्यपरिवर्तन  यापेक्षा  मानव  परिवर्तन  महत्वाचे  आहे.  मानव  जागृतीमुळेच  परिवार  सुखी  होतो.  समाजाला  स्वास्थ  लाभते  आणि  पर्यायाने  राष्ट्र  बलशाली  बनते.  स्वाध्याय  म्हणजे  स्व  चा  अध्याय.  शुध्द  चैतन्याला  अहं  आणि  इच्छा  यांची  संगत  लागून  जो  जीव  तयार  होतो  तो  स्व.  अहं  अस्तित्वाची  जाणिव  ठेवतो  तर  इच्छा  जगण्याची  उमेद  राखते.  जीव  त्यामध्येच  अडकतो   ईश्वराला  विसरतो.  स्व  ची  उन्नती  साधण्यासाठी  अहं  ला  घासून  पातळ  करण्याच्या  आणि  इच्छेला  विस्तृत  करून  पारदर्शक  करण्याच्या  प्रक्रियेत  जे  तत्त्वज्ञान  आहे  आणि  आचरण  करण्याची  जी  पध्दत  आहे  त्याला  स्वाध्याय  म्हणतात. 
 १९४८  साली  प.पू.दादांंच्या  या  कार्यात  थोडा  अडथळा  आला.  बेचाळीस  दिवस  ते  विषमज्वराने  आजारी  होते.  कुठेही  जाणं  त्यांना  शक्य  नव्हतं.  त्याकाळात  त्यांचे  केवळ  विचारमंथन  सुरू  होते.  या  अडचणीच्या  काळात  त्यांना  अनेकांनी  आर्थीक  सहाय्य  देऊ  केले  परंतू  कठिण  प्रसंगामध्ये  सुध्दा  आयुष्याचे  खडतर  व्रत  खंडीत  होऊ  दिले  नाही.
 साधारणपणे  १९५२  साली  पॅरीसहून  डॉ.  डीन  मुंबईस  आले  असता  त्यांची  आणि  प.पू.दादांंची  योगायोगाने  रॉयल  एशियाटिक  लायब्ररीमध्ये  भेट  झाली.  अनेक  मुद्यांवर  चर्चा  झाली.  आणि  डॉ.  डीन  प.पू.दादांंच्या  या  कार्याने  भारवून  गेले.  पुढे  त्यांनी  १९५४  साली  जपानमध्ये  झालेल्या  द्वितीय  विश्व  तत्त्वज्ञान  परिषदेसाठी  प.पू.दादांंना  आग्रहाचे  निमंत्रण  केले  होते.  त्या  परिषदेमध्ये  अवतारवादाच्या  चर्चेला  उत्तर  देताना  प.पू.पांडुरंगशास्त्री  आठवले  म्हणाले,  --  संपुर्ण  जगाला  मार्गदर्शन  करणारा  श्रीकृष्णासारखा  अद्वितीय  पुरूष  आजपर्यंत  जन्मलेला  नाही.  तो  ईश्वराचाच  अवतार  होता.  ईश्वर  मनुष्याकार  घेतो  ही  केवढी  सुरम्य  कल्पना  आहे.  मला  येशू  ख्रिस्ताविषयी  नितांत  आदर  आहे.  तसाच  आपल्यालाही  श्रीकृष्णाविषयी  आदरभाव  असायला  हवा.  कारण  इथे  आपण  सारे  विचारवंत  आहोत.  येशू  ख्रिस्त  हा  संत  पुरूष  होता.  शेजायांवर  प्रेम  करा  हे  सांगायला  तो  आला  होता.  तत्त्वज्ञान,  मानसशास्त्र,  समाजशास्त्र,  अर्थशास्त्र,  राजनिती  ही  पाचही  दालनं  प्रकाशित  करण्यासाठी  अवतार  येतो.  तो  केवळ  फुलांचा  सुगंध  देण्यासाठी  येत  नसून  जीवनाचं  प्रात्यक्षिक  दाखविण्यासाठी  येत  असतो.  श्रीकृष्ण  आजच्या  काळात  जरी  विद्यमान  नसला  तरी  त्याने  दिलेल्या  विचारांच्या  आणि  उपदेशांच्या  रूपाने  आज  देखील  तो  आजच्या  जगात  नांदतो  आहे.  त्याचे  तत्त्वज्ञान  हे  तत्कालिक  नसून  चिरंतन  आहे.  संपुर्ण  जगाला  आत्मोन्नतीचा  आणि  समाजोन्नतीचा  चिरंतन  विचार  देणारा  श्रीकृष्ण  हा  एकमेवाद्वितीय  पुरूष  होता.  त्याच्या  तत्त्वज्ञानामध्ये  धर्माचा  अर्थ  प्रांतीक  कींवा  राष्ट्रिय  असा  मर्यादित  नसून  अखिल  मानवजातीमध्ये  स्नेहभाव,  सद्वर्तन  आणि  सामंजस्य  निर्माण  व्हावे  हा  विश्वव्यापक  अर्थ  दिसतो.  आज  जगातल्या  विचारवंतांनी  वर्ल्ड  पार्लमेंट  ची  संकल्पना  पुढे  आणली  आहे.  ही  एकी  बळानं  किंवा  शस्त्राच्या  जोरावर  मुळीच  टिकून  रहाणार  नाही.  त्यासाठी  एकच  मार्ग  आहे.  तो  म्हणजे  धर्म.  विश्वधर्माच्या  आधारावरच  विश्वसत्ता  टिकून  राहील.  प्रख्यात  मानवतावादी  इंग्रजी  लेखक  एच.जी.वेल्स  यांनी  आपल्या  आउटलाइन  ऑफ   हिस्टरी  ऑफ   वर्ल्ड  या  पुस्तकामध्ये  विश्वधर्माची  संकल्पना  मांडली  आहे.  त्यात  ते  म्हणतात,  --  विश्वधर्म  हा  समान  विचारसरणीवर  आधारलेला  हवा.  तो  सर्वांना  समजेल  असा  सहजसुलभ  असावा.  हा  धर्म  म्हणजे  ख्रिश्र्चन,  मुस्लीम,  बौध्द  किंवा  तत्सम  कोणताही  नसावा.  तो  प्रतिगामी  किंवा  पुरोगामी  नसावा.  परंतू  वैश्विक  तत्त्वज्ञानाची  त्याला  पार्श्र्वभूमी  असावी.  निस्वार्थी  सेवेवर  तो  आधारित  असावा.  ही  संकल्पना  आम्हांस  मुळीच  नवीन  नाही.  पाच  हजार  वर्षांपुर्वी  श्रीकृष्णाने  याच  धर्माची  स्थापना  केली  होती.  एच.जी.वेल्स  आपल्या  फर्स्ट  अँड  लास्ट  या  पुस्तकामध्ये  म्हणतात,  --  विश्वशांतीसाठी  अशा  एका  धर्माची  आवश्यकता  आहे,  की  जो  धर्म  व्यक्ती  आणि  समाज  म्हणजेच  जगावर  त्याचबरोबर  माणसाच्या  आंतरिक  आणि  बाह्य  विचारांवर  अंकुश  ठेवू  शकेल.  अनेक  धर्मांचा  अभ्यास  करून  बर्ट्रंड  रसेल  यांनी  आपल्या  सोशल  रीकन्स्ट्रक्शन  या  ग्रंथामध्ये  म्हणले  आहे,  --  असा  एक  नवा  धर्म  पाहिजे  की,  जो  जगाच्या  उलट्या-सुलट्या  प्रवाहात  राहू  शकेल.  तसेच  जगाला,  व्यक्तीला  आणि  समाजाला  खरा  मार्ग  दाखवू  शकेल.  त्याला  प्रोटेस्टंट  धर्म  प्राइमरीली  पर्सनल  वाटतो  तर  कॅथॉलिक  धर्म  प्राइमरीली  सोशल  वाटतो.  अश्या  रितीने  द्वितीय  विश्व  तत्त्वज्ञान  परिषद  प.पू.दादांंनी  चांगलीच  गाजविली.  नंतर  डॉ.  कॉम्प्टन  यांनी  दिलेली  अमेरिकेतील  ऑफर  सोडून  प.पू.दादांंनी  आपल्या  देशात  स्वाध्यायाचे  कार्य  सुरूच  ठेवले.
 भावी  काळात  राष्ट्राची  उभारणी  करणाया  आजच्या  तरूणांना  वैदिक  संस्कृतीचे  खरे  स्वरूप  समजून  देण्यासाठी  जून  १९५६  मध्ये  प.पू.दादांंनी  ठाण्याला  तत्त्वज्ञान  विद्यापीठ  सूरू  केले.  ते  नेहमी  म्हणत,--  वैदिक  संस्कृतीचे  महत्व  समाजाला  उमजेल  तेव्हा  एक  जडवादी  प्रवाह  आणि  दुसरा  अंधश्रध्दाळूंचा  प्रवाह  हे  दोन्ही  प्रवाह  आपोआप  रोखले  जातील.  वैदिक  संस्कृतीचे  महत्व  उमजल्यावर  निद्रिस्त  माणूस  जागा  होईल,  जागा  असेल  तर  उठून  बसेल,  बसला  असेल  तर  चालू  लागेल,  आणि  चालत  असेल  तर  धावू  लागेल.  एव्हढी  शक्ती  या  वाङमयात  आहे.  वैदिक  संस्कृतीचे  महत्व  शास्त्रीय  दृष्टिकोनातून  सांगणारी  पुस्तके  अजून  लिहीली  गेली  नाही.  आज  वैदिक  धर्माचे   भ्रष्ट  स्वरूप  काही  ठिकाणी  बघायला  मिळते.  एकीकडे  भौतीक  सुखासाठी  चटावलेला  सुधारक  दिसतो  तर  दुसरीकडे  निराशवादी  श्रध्दाळू  दिसतो.  हे  दोन्ही  घटक  सामाजाच्या  दृष्टीने  घातक  आहेत.  म्हणून  हे  वैदिक  तत्त्वज्ञान  शास्त्रीय  स्वरूपात  घडविण्याचे  कार्य  या  तत्त्वज्ञान  विद्यापीठामध्ये  सूरू  आहे.
 प.पू.दादांंना  अनेक  पुरस्कार  मिळाले  त्यात  प्रामुख्याने  गांधी  अॅवॉर्ड,  टिळक  पुरस्कार,  तसेच  विदेशातील  १९९६  मध्ये  मॅगेसेसे  हा  पुरस्कार,  तर  १९९७  मध्ये  सर्वश्रेष्ठ  टेम्पल्टन  पुरस्कार  हे  आहेत.  या  सर्वांचे  श्रेय  त्यांनी  योगेश्वराला  दिले  होते.
 व्यक्तीसेवेच्या  माध्यमातून  देवाची  सेवा  करून  त्यांनी  लाखो  लोकांचा  सर्वांगीण  उत्कर्ष  साधला.  त्यांना  नवजीवन  दि्‌ले.  अतिशय  दारिद्र्य,  दडपशाही  आणि  अन्याय  या  ठिकाणी  प.पू.दादांंनी  आपल्या  कार्यातून  सुबत्ता,  स्वातंत्र्य-प्रेम  अणि  न्याय  या  गोष्टी  उभ्या  केल्या.  एकाच  देवाचे  अंश  या  नात्याने  माणसा-माणसाला  त्यांनी  प्रेमाच्या  आधारावर  एकत्र  आणले.
 अश्या  रितीने   प.पू.दादांची  खडतर  व्रताने  चालविलेली  देहयात्रा  २००४  साली  संपली.  तरीसुध्दा  त्यांचे  कार्य  अविरतपणे  पुढे  चालू  ठेवणे  ही  आजची  गरज  आपण  सर्वांनी  ओळखून  घेतली  पाहिजे.

1 comment: