रामदास स्वामींचे तत्त्वचिंतन
श्रीसमर्थ रामदास स्वामींचा या देहातील
कालखंड इसवी सन
१६०८ पासून १६८२
पर्यंत होता. म्हणजेच
सूमारे सव्वातीनशे वर्षांपुर्वीचा हा कालखंड
आहे. रामदास स्वामींनी वयाच्या तेराव्या वर्षापासून श्रीरामाच्या उपासनेला प्रारंभ केला. कठोर
तपसाधना करून आत्मज्ञान
प्राप्त केले. नंतर
बारा वर्षे संपुर्ण
भरतखंडामध्ये भ्रमण केले.
मानस सरोवर प्रदक्षिणा
केली. त्यामुळे त्यांना विवीध समाजातील
निरनिराळ्या रूढी परंपरेची
माहिती झाली. अनेक
समाजघटकांची विचारधारणा समजली. याच
कालखंडामध्ये परकीय आक्रमणामुळे
संपुर्ण समाज मनाने
तसेच व्यावहारीक दृष्ट्या अस्वस्थ झाला होता.
कर्मठ कर्मकांड, कमालीचा नास्तिकपणा, वाह्यात तर्कटीपणा व बुवाबाजी
असा हा आचारभ्रष्ट
व विचारभ्रष्ट समाज आत्मघातकी
झाला होता. समाजाची
अशी दीन अवस्था
पाहून रामदास स्वामींनी लोकसंग्रह करून समाजाला
एक नवी, समृध्द
व आत्मोन्नत करणारी दिशा
दाखविली. ब्रह्मज्ञानाचे तत्त्वज्ञान सोप्या, सरळ व प्रांजल शब्दातून समाजापूढे ठेवले. ते
तत्त्वज्ञान स्वतः प्रत्यक्ष
आचरणात आणून ती
विचारधारा पुढे शिष्यांमध्ये
आत्मसात करवून मोठा
संप्रदाय निर्माण केला. मनुष्याची
विचारशक्ती त्याचे संपुर्ण
आयुष्य घडविते. मनुष्य जसा
विचार करेल तसे
त्याचे आचरण असते.
मनुष्याची विचारशक्ती, बुध्दी म्हणजेच
मन हे अतिशय
चंचल आहे. क्षणामध्ये
ते साता समुद्रापलिकडे
जाऊ शकते. म्हणून
या मनाला नियंत्रणामध्ये
ठेवणे अत्यंत आवश्यक
आहे. तसेच त्याला
आत्मोध्दाराच्या कार्यामध्ये गुंतवून ठेवले पाहिजे.
कारण मनाला विषय
नसला म्हणजे ते
आत्मघातकी विचार करू
लागते. त्यातून तसेच आचरण
होते. आणि या मनामुळे मनुष्याचा आत्मघात होऊ शकतो.
म्हणून या मनासाठी
रामदास स्वामींनी मनाचे श्लोकामध्ये
असंख्य उपदेश केले
आहेत. समाजातील सर्व घटकांसाठी
हे तत्त्वज्ञान अत्यंत उपयुक्त
असून कल्याणकारी आहे. रामदास
स्वामींनी सांगितलेला लोकशाहीचा मार्ग आज
आपण फक्त कायद्याने
अनुसरला आहे. परंतू
त्याची पुर्णतः अंमलबजावणी होत नाही.
लोकांना जे आवडत
नाही तसे वागू
नये. लोकांना शारिरीक त्रास, मानसिक
ताप, आर्थिक नुकसान,
आवडत नाही ते
करू नये. तर
लोकांना जे आवडते
तसे वागावेे. लोकांची सेवा, त्यांचा
मनाने आदर व आर्थिक फायदा
केलेला आवडतो तसे
वागावेे. आज हे साधे तत्त्व
खूप मोलाचे आहे.
आज या तत्त्वाचे
आचरण झाले तर
आजच्या सर्व समस्या
सपुष्टात येऊन समाजाची
सर्वांगीण उन्नती होईल.
प्रत्येकजण खया अर्थाने
सुखी व समृध्द
होईल. आज नितीमत्ता
इतक्या खालच्या थराला गेली
आहे की नितीमुल्यांची
पायमल्ली करणायांना आज समाजामध्ये
प्रतिष्ठेचे स्थान आहे.
आज परिस्थिती अशी आहे
की एखादा मनुष्य
रामदास स्वामींच्या या तत्त्वाचे
आचरण करू लागला
तर त्यास एकटे
पाडून वाळीत टाकणारे
महाभाग आज पहायला
मिळतात. असे प्रकार
आपल्या समोर घडतात.
पण आपल्याला काही जाणवत
नाही. कारण त्याची
आपल्याला सवय झालेली
असते. उदा. स्वातंत्र्यवीर
सावरकरांनी स्वातंत्र्यपुर्व काळात केलेल्या
देशभक्तीचे राजकीय पुढायांनी
स्वातंत्र्योत्तर काळात काय
केले हे आज सर्वांना माहित आहे.
परंतू त्याचे सावरकरांनी
कधीच भांडवल केले
नाही. आणि समाजानेसुध्दा
त्याचा गंभीर विचार
केला नाही. असो.
तसेच पुढे
रामदास स्वामींनी सांगितले आपण अत्यंत धैर्यवान
व्हावे. कोणीही, कीतीही मोठा
अपमान केला तरी
सहनशील रहावे. नेहमी
लोकांशी गोड बोलावे.
सर्व लोकांना आनंद द्यावा.
आजच्या काळामध्ये हे रोजच्या
व्यवहारातील तत्त्व अत्यंत
कमी प्रमाणात दिसते. म्हणूनच
सर्वत्र गुलामगिरी आवडीने सहन
होते. सर्वत्र अत्याचार वाढीला लागला
आहे. समाजातील धैर्यता संपुष्टात आली आहे.
कारण कोणी धारिष्ट
दाखविण्याचा प्रयत्न केला तर
त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याची चेष्टा
केली जाते. सहनशीलता
हे एक शूरतेचे
लक्षण आहे. ज्याने
क्रोधावर विजय मिळविला
आहे तोच खरा
वीर होय. थोर
पराक्रमापेक्षा अपमान सहन
करणे हे भ्याडतेचे
नसून शूरतेचे प्रतिक आहे.
ही विचारधारणा आज प्रत्येकाच्या
ठिकाणी असणे खूप
आवश्यक आहे. यामूळे
भांडण, तंटे, मारामारी,
खून यांचे प्रमाण
कमी होईल. आजचा
समाज केवळ स्तुतीप्रिय
आहे. त्यामुळे आजच्या काळामध्ये
समोरासमोर गोड बोलणे
सर्वत्र दिसून येते.
परंतू पाठीमागे निंदा केली
जाते. तोंडावर खोटी स्तुती
करायची एक वाईट
प्रथा आज समाजामध्ये
दिसते. सर्व लोकांना
आनंद देण्यासाठी स्वतः आनंदी
असणे आवश्यक आहे.
आज हा आनंद
भौतीक वस्तूंमध्येच सिमीत झाला
आहे. धनदौलत व
नावलौकीक यामधील आनंद
क्षणिक असतो. शाश्वत
आनंद हा त्यागामध्ये
आहे.
रामदास स्वामींनी मनुष्यदेहाविषयी सांगितले कीं मनुष्य
देहासाठी अनेक कष्ट
सोसतो. सर्व धडपड
देहाचेच चोचले पुरविण्यासाठी
असते. मला हे पाहिजे ते
पाहिजे. ते मिळविण्यासाठी
अनेक संकटांशी झुंज द्यावी
लागते. तरी देहाची
जोपासना चालूच असते.
आणि शेवटी एक
दिवस हे शरीर
सोडावे लागते. तरीसुध्दा
आत्मबोध होत नाही.
आपल्यापैकी कोणा एकाचा
मृत्यु झाल्यास इतर सर्वजण
विनाकारण दुःख, शोक
व्यक्त करतात. त्याक्षणी
त्यांना स्वतःच्या मृत्युची काळजी नसते.
तेव्हा त्यांची अशी समजूत
असते की त्यांना
मृत्यु नाहीच. परंतू
आज नाही तर
उद्या त्यांचा मृत्यु आहेच
हे सत्य त्यांना
पटत नाही. म्हणून
शाश्वत सत्याचा नेहमी आग्रह
धरावा. देहाचा अभिमान
सोडून देहातील आत्मस्वरूपाचे चिंतन करावे.
प्रत्येक प्राणिमात्रांच्या ठिकाणी असणारा
आत्मा हा परमात्म्याचा
अंश आहे. केवळ
परमात्मा हेच परमसत्य
आहे. बाकी सर्व
ब्रह्म ही महामाया
आहे. त्या मायेच्या
मोहजाळामध्ये गुरफटून जाऊ नये.
भौतिक सुख कितीही
सुखावह वाटले तरी
ते क्षणिक असून
नाशीवंत आहे. हे
परमसत्य आजच्या काळात
जाणून थोर विचारवंतांनी
आपले कल्याण साधले
आहे. त्यासाठी विश्वास पाहिजे. मनोधैर्य पाहिजे. जिज्ञासा पाहिजे. परंतू या
गोष्टी आज दुर्मिळ
झाल्या आहेत. विज्ञानातील
प्रगतीमुळे मनुष्याचा अहंकार दुणावत
चालला आहे. आज
मी हे करू शकतो ते
करू शकतो या
अहंकारामुळे तो मायेच्या
चक्रव्युहामध्ये अडकला आहे.
म्हणून त्याला परमसत्याची
जाणिव होत नाही.
तसेच रामदास
स्वामीं दासबोधामध्ये सांगतात मनुष्यजन्म इतर जन्मांपेक्षा
श्रेष्ठ असून त्यामध्येच
विचारशक्ती आहे. कर्माचे
स्वातंत्र्य आहे. आत्मोध्दाराची
शक्यता आहे. ती
इतर जन्मांमध्ये नाही. म्हणून
मनुष्यजन्माचे उद्दिष्ट कशामध्ये आहे हे ओळखून जन्माचे
सार्थक केले पाहिजे.
परंतू आज पाश्चात्य
संस्कृतीच्या प्रभावाने भौतिक वस्तूंचा
उपभोग घेणे यामध्येच
मनुष्याची सार्थकता आहे अशी
ठाम विचारधारणा झालेली दिसते.
आज सर्व ठिकाणी
उपभोगाच्या विषयीचेच वातावरण दिसते. मंदीरांमध्ये सुध्दा
कर्मकांड, भजन, सप्ताह,
पारायणे, जयंती व
पुण्यतिथी महोत्सव असे उत्सवाचेच
वातावरण दिसते. तसेच
आध्यात्मिक प्रवचने, किर्तने, व्याख्याने यामध्ये सुध्दा कथानकावरच
भर दिलेला असतो.
कथानके ही केवळ
विषय समजून घेण्यासाठी
असतात. त्यातील सारांश जाणून
घ्यावा. तसेच त्यातील
तत्त्वज्ञान आचरणात आणणे
हे खूप महत्वाचे
आहे. नुसतीच दासबोधाची
पारायणे करून काहीही
साध्य होणार नाही.
दासबोधातील तत्त्वज्ञान आचरणात आणणे
हा दासबोधाचा खरा उपदेश
आहे. सगळ्या गोष्टी
ऐकाव्या पण त्यातील
तत्त्वांश, रहस्य तेवढे
शोधून ग्रहण करावे.
जे असार, व्यर्थ,
निरूपयोगी असेल ते
समजून सोडून द्यावे
याला श्रवणभक्ति म्हणतात. अश्या श्रवणभक्तीची
आज गरज आहे.
आज तरूणपीढीचा आध्यात्म्याकडे कल वाढत
चालला आहे असे
थोड्या फार प्रमाणामध्ये
दिसून येते. कारण
आजचा तरूण वर्ग
आजच्या एकंदर परिस्थितीला
कंटाळून गेला आहे.
कोठेच शांती समाधान
नाही. सगळीकडे भ्रष्टाचार, अत्याचार, चोया, दरोडे,
खून, अतिरेक्यांचा उद्रेक वाढत
चाललेला दिसून येतो.
या विवंचनेमुळे तो वैतागून
गेला आहे. शांती
समाधानासाठी तो मंदिरामध्ये/आश्रमामध्ये
जातो. परंतू तेथे
सुध्दा संपुर्ण शांती समाधान
दिसत नाही. ही
परमशांती कोठे मिळेल
याचा तो शोध घेऊ लागतो. त्यासाठी
आत्मज्ञानाचा शोध हा रामबाण उपाय
आहे. परमसत्याचे प्रतिपादन आध्यात्मिक प्रवचने, किर्तने, व्याख्याने यामध्ये सुध्दा विशेष
दिसत नाही. त्याला
कारण एकतर वक्त्याला
परमसत्याचे ज्ञान नसते
व श्रोत्यांना मनोरंजनाची आवड असते,
कींवा वक्त्याला परमसत्याचे ज्ञान असते
तर श्रोत्यांना परमसत्याची जिज्ञासा नसते. परंतू
आज समाजाला परमसत्याची जाणीव करून
देणे खूप आवश्यक
आहे. काही प्रमाणात
हा उपक्रम चालू
असलेला दिसतो. पत्रद्वारा
दासबोध अभ्यासक्रम, दासबोधाची शिबीरे, वगैरे. या
प्रकारच्या उपक्रमांचा प्रचार मोठ्या
प्रमाणात झाला पाहिजे.
कारण आत्मज्ञानाच्या आचरणानेच केवळ आजचे
भेडसावणारे सर्व प्रश्न
सुटणार आहेत. केवळ
सत्ता, संपत्ती, नावलौकीकता यामुळे हे
प्रश्न सुटण्या ऐवजी वाढीला
लागत आहेत हे
आज प्रत्यक्ष अनुभवाला येत आहेच.
सारासार विचार केल्यास
असे दिसून येते
की रामदास स्वामींनी मुख्यतः आत्मज्ञानाचे तत्त्वज्ञान तहेतहेने, तसेच उदाहरणे
देऊन सविस्तरपणे सांगितले आहे. हे
आत्मज्ञान फक्त नरदेहीच
शक्य आहे. कारण
फक्त मनुष्यजन्मामध्ये विचारशक्ती आहे. परंतू
आज आपण पाहतो.
तारूण्याचा नखरा, वैभवाची
गुर्मी, विलासी भोगवृत्ती
आणि नावलौकीकतेचा अट्टाहास सर्वत्र दिसतो. हा
केवळ शाश्वत जीवाला
भुलवून, फसविणारा मायेचा पसारा
आहे. आपले म्हणून
आलेले हे शरीर
सुध्दा आपले नाही
तर मग इतरांची
कथा काय करावी.
आपला सर्व अट्टाहास
मी भोवतीच केंद्रिभूत
असतो. मी हे करतो मी
ते करतो. मी
रूपवान आहे, माझ्याकडे
संपत्ती आहे, मला मोठा
नावलौकीक आहे, माझी
मुले, माझी बायको,
इत्यादी. याचा आपल्याला
गर्व झालेला असतो.
परंतू जेव्हा हे
शरीर सोडण्याची वेळ येते
तेव्हा हे सर्वकाही
रूपवान शरीर, संपत्ती,
नावलौकीक, मुले, बायको,
येथेच सोडून जावे
लागते. तेव्हा कोणीही
तसेच काहीही उपयोगी
येत नाही. कारण
सर्व गोष्टी शरीराशीच
निगडीत आहेत. एका
परमेश्वरा वाचून आपले
कोणी नाही. एकाग्र
भक्तीने त्याला घट्ट
धरून ठेवावे. मनुष्यजन्म अतिदुर्मिळ आहे. तो
केवळ भौतिक सुखाच्या
उपभोगामध्ये वाया घालवू नये.
आत्मज्ञान प्राप्त करून त्याचे
सार्थक करावे. या
नरदेहरूपी पेटी मध्ये
नाशीवंत भौतिक वस्तूंचा
मोह टाळून परमेश्वरासारखे
अमुल्य रत्न साठविले
तरच त्या नरदेहरूपी
पेटीचा योग्य उपयोग
होतो. यामध्येच मनुष्यजन्माची सार्थकता आहे. परंतू
आज सर्वत्र चित्र वेगळेच
दिसते. नाशीवंत भौतिक वस्तूंच्या
उपभोगाने देहाचे चोचले
पुरविले जातात. देहातून
घेता येणारे जे
जे सुख असते
ते सर्व अखेरी
दुःखच निर्माण करते. आरंभी
ते गोड वाटते
पण अखेर दुःखाला
कारण होते. कारण
ते केवळ क्षणिक
असते. नाशीवंत वस्तुंकडून शाश्वत सुखाची
अपेक्षा होऊच शकत
नाही. मनुष्याला आपले प्राण
सर्वात प्रिय असतात.
त्या प्राणाची जशी तो काळजी घेतो,
सतत त्याच्याकडे लक्ष देतो.
तसेच परमेश्वराकडे लक्ष द्यावे.
तो आपला प्राण
समजावा. परमेश्वर आपल्याला प्राणासारखा प्रिय झाला
पाहिजे. आपल्या प्राणाला
धक्का लागू नये,
आपला प्राणनाश होऊ नये
म्हणून आपण त्याची
अहोरात्र काळजी घेतो.
अगदी तसेच परमेश्वराकडे
चोवीस तास आपलेपणाने,
श्रध्देने लक्ष द्यावे.
यालाच सर्वोत्तम प्रेम म्हणतात.
आपलेे परमेश्वरावरील प्रेम हळुहळु
इतके वाढले पाहिजे
की आपला प्राण
परमेश्वरमय व्हावा आणि
परमेश्वर प्राणमय व्हावा. अशी अवस्था
झाल्यावर मग आपल्या
हृदयामध्ये प्राण आहे
का परमेश्वर आहे हे आपणास कळत
नाही. इतकी एकरूपता
येऊ शकते. मी
कोण आहे हा प्रश्न दिसतो
साधा परंतु त्याचे
उत्तर शोधू लागले
म्हणजे मूलतत्त्वांची मीमांसा करावी लागते.
मी या मनुष्यजन्माच्या
आधी कोण होतो.
मला कोणी निर्माण
केले. माझे शरीर
मला किती काळ
साथ देणार आहे.
शरिरत्याग केल्यानंतर मी कोठे
जाणार आहे. शरिर
तर येथेच रहाते
नाश पावते तर
मग अविनाशी कोण आहे.
अशी मीमांसा करता करता
अखेर ज्या मी
ला आज आपण मी मानतो
तो खरा मी नाही असे
उघडपणे कळून येते.
परमात्मा सगळीकडे सुक्ष्मरूपाने व्यापून आहे. आपल्या
आनंदाने तो संपूर्ण
विश्वामध्ये भरलेला आहे.
आणि मीच तो आत्मा आहे.
मीच सगळीकडे व्यापून आहे. व स्वानंदाने संपूर्ण विश्वामध्ये भरलेला आहे.
अशी परसत्याची प्रचिती झाल्यावर मी आणखी
कोणी निराळा असू
शकत नाही हा
सिध्दांत पटतो. म्हणून
देहाचा अहंकार असत्य
आहे. तो एक केवळ मायेचा
भ्रम आहे. रोजचे
उदाहरण घ्यायचे झाल्यास आपण नेहमी
म्हणतो माझे शरीर,
माझे मन. याचाच
अर्थ मी देहाहून
व मनाहून वेगळाच
आहे. परंतू महामायेमुळे
आपल्याला परमसत्याची जाणिव होत
नाही. आत्मज्ञानाची प्रचिती येणे महत्वाचे
आहे. प्रचिती म्हणजे परिक्षा
करून स्वतः अनुभव
घेणे, प्रत्यय घेणे, आंधळेपणाने
विश्वास न ठेवता
पारखून मगच सत्य
मानणे, सत्य ज्ञान
सांगणे हीच रामदास
स्वामींची उपासना आहे.
त्यामुळे त्याच्या तत्त्वज्ञानाला एक वेगळेच
सामर्थ्य आहे. आपण
आपला संपूर्ण मीपणा परमेश्वराला
वाहणे आणि त्याच्याशी
संपूर्णपणे एकरूप होऊन
जाणे यास आत्मनिवेदन
म्हणतात त्यामुळे आपल्याला समाधान मिळते.
सर्व चिंता, काळजी
कमी होतात. स्वरूपाशी
एकरूप होणे यामध्ये
समाधानाची गुरूकिल्ली आहे. सामान्यजीव
मायेच्या जाळ्यात अडकलेले असतात. प्रपंचातील
दुःखाने गांजून गेलेले
असतात. त्यांना या मायेच्या
जाळ्यातून केवळ सद्गुरू सोडवू शकतात. जे
सदा सर्वकाळ परमात्मा स्वरूपाबद्दलच बोलतात व
सांगतात जे परमात्म्याला
संपुर्णपणे जाणतात ते
ब्रह्मज्ञ होय. त्यांनाच
आपण साधुपुरूष कींवा सद्गुरू
म्हणतो. सद्गुरू जवळ शुध्द
ब्रह्मज्ञान असते. आणि
त्या सद्गुरूच्या प्रत्यक्ष व्यवहारांत आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे आचरण असते.
देहाने लोकांमध्ये, लोकांसारखा दिसले तरी
मनाने सदगुरू लोकांहून
निराळे असतात. असा
सद्गुरूच आपल्याला आपले गुप्त
आत्मस्वरूप दाखवितो. आध्यात्मिक साधना करीत
असताना काही चूक
होते आहे का,
साधनेचा गर्व तर
होत नाही ना,
याचा पारदर्शक शोध घेण्यासाठी
सद्गुरूची आवश्यकता असते. समजा
एखाद्याने आध्यात्मिक साधना केली
व त्याला सिध्दि
प्राप्त झाल्या. त्यामुळे त्याचे सामर्थ्य
वाढले. त्याची लोकप्रियता
वाढली. त्याच्या देहास महत्व
आले. त्यामुळे देहबुध्दीचे झुंबाड वाढले.
मग मी देहच
आहे असा त्याला
भ्रम होतो. परंतू
हाच भ्रम त्याच्या
कल्याणाच्या मार्गामध्ये मोठा अडसर
आहे. हे त्याला
केवळ सद्गुरूच सांगू शकतात,
आणि केवळ सद्गुरूचेच
तो मानू शकतो.
त्याचा हा अहंकार
घालविण्याचे सामर्थ्य केवळ सद्गुरूमध्येच
असते. त्यासाठी सद्गुरूस शरण जावे.
सदगुरू ज्ञानाची शिकवण देतात.
ज्या ज्ञानामुळे देहबुध्दीचा अहंकार नाहिसा
होतो. ज्ञान म्हणजे
व्यवहारज्ञान अजिबात नव्हे.
पैसा मिळवून उपजिवीका
करण्याचे साधन हे
ज्ञानाचे उद्दिष्ट नाही. ज्ञान
म्हणजे फक्त आत्मज्ञान
होय. आपण आपल्याला
पाहणे यालाच ज्ञान
म्हणतात. आपले खरे
स्वरूप पहाणे हे
खरे ज्ञान आहे.
परंतू आत्मज्ञानाचा नूसता जप
करून चालत नाही.
त्यावर मनन करून
त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला
पाहिजे. जेथे दृश्याचे
भान संपुर्ण नाहीसे होते,
जेथे मी जाणतो,
मला ज्ञान आहे,
ही जाणीव अज्ञान
समजले जाते असे
शुध्द जे स्वरूपभान
त्याला ज्ञान म्हणतात.
स्वरूपभानामध्ये माया मावळते
म्हणून दृश्याचे भान उरत
नाही. हे आत्मज्ञान
भाग्याप्रमाणे प्राप्त होते. कारण
ज्ञान प्राप्त होणे ही
एक दिर्घ प्रक्रिया
आहे. जन्मजन्मंातरीची ही अखंड
प्रक्रिया आहे. मागील
जन्मातील पुण्याई पुढील जन्मामध्ये
उपयोगी पडते. हे
आत्मज्ञान सगळ्या परमार्थ
साधनांचे खरे फळ आहे. त्याने
संशयवृत्तीचे मूळ संपूर्णपणे
नाश पावते. भ्रम
नाहीसा होतो. जगातील
सर्व ज्ञानांचे मुख्य सार
हेच आहे. आपल्या
इंद्रियांना दिसणारे दृश्य विश्व
हे मिथ्या आहे
असे पटले, म्हणजे
ते जसे दिसते
तसे ते नाही
अशी खात्री पटली
की दृश्याकडे धाव घेणारी
वृत्ति आपोआप मागे
फिरते. अशा रीतीने
वृत्ति उलटून हृदयातील
आत्मस्वरूपाकडे धाव घेउ
लागली की मग दृश्य असून
सुध्दा नसल्यासारखे होते. ते
असून अनुभवास सुध्दा येत
नाही. कारण आत्मस्वरूपामध्ये
इतकी एकरूपता आलेली असते
की मी चे अस्तित्वच उरत नाही.
अशा रीतीने वृत्ति
अंतर्मुख होऊन आत्मस्वरूपाचे
ज्ञान होते. परंतू
मी देहच आहे
असा ज्याला आत्मविश्वास
वाटतो तो साहजिकच
आत्मघातकी असतो. त्याला
जन्ममरणाच्या फेया वारंवार
भोगाव्या लागतात. कारण अंतसमयीच्या
आसक्ती प्रमाणे मृत्यूनंतर दुसरा देह
प्राप्त होतो आणि
हे चक्र पुढे
चालू रहाते. मी
देहच आहे ही मिथ्या भावना
विवेकाने बाजूस सारली
पाहिजे. मी आत्मा
आहे ही सत्य
भावना दृढपणे धरण्याचा
अभ्यास केला पाहिजे.
त्यासाठी निरंतर श्रवण,
मनन, चिंतन आवश्यक
आहे.
इंद्रियांना दिसणारे दृश्य विश्व
प्रत्यक्ष दिसत असून
सुध्दा त्याच्याकडे केवळ दुर्लक्ष
केले पाहिजे. निरंतर आत्मस्वरूपात
एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. मुख्य
परमेश्वर कसा आहे
हे निश्चितपणे ओळखण्याचा प्रयत्न करावा. अनेक
देवांच्या घोटाळ्यात आपण पडू
नये. ज्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्याच
प्रमाणे प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार
देवाची उपासना करतो.
कोणी श्रीकृष्णाची, तर कोणी
गणपतीची, तर कोणी
शंकराची, तर कोणी
दुर्गेची, तर कोणी
खंडोबाची, तर कोणी
म्हसोबाची, तर कोणी
मरीआईची इत्यादी अनेक देवदेवतांची
उपासना करीत असतो.
त्यामध्ये कोणता देव
श्रेष्ठ, कोणता देव
पावणारा, याच्या भानगडीत
पडण्याचे कारण नाही.
एकाच परमेश्वराची ही अनेक
रूपे आहेत हे
अनुभवाने जाणून घ्यावे.
ज्याने हे चराचर
विश्व निर्माण केले, ज्याने
या विश्वाचे पालन अनादी
काळापासून केले आहे
व अजूनही ते
कार्य अविरतपणे चालू आहे.
त्या परमात्म्या विषयी विचार
करावा. अत्यंत शुध्द,
निःसंदेह व निःस्वार्थी
विवेकाने परमेश्वराचे ज्ञान करून
घ्यावे. जो देहातीत
अवस्थेला पोहोचतो त्याची पुर्णतः
लक्षणे सांगता येत
नाही. कारण ती
अवस्था इंद्रियातीत आहे. म्हणून
तिचे शब्दांनी वर्णन करता
येत नाही. निर्गुण
आत्मा हाच खरा
मी आहे असा
साक्षात् अनुभव येणे
यामध्ये मनुष्यजन्माचे सार्थक आहे.
त्यासाठी निरंतर विवेक
साधना केली पाहिजे.
परमात्मा त्रिगुणांच्या पलिकडे आहे
असा प्रत्यक्ष अनुभव येणे
म्हणजेच ज्ञान होय.
बाकी सर्व जे
काही आहे ते केवळ अज्ञान
आहे याची मनामध्ये
पक्की खूणगांठ बांधली पाहिजे.
परंतू आजच्या काळामध्ये
सत्ता संपत्ती मिळवून देणाया
ज्ञानाला खूप महत्व
दिसून येते जे
केवळ देहाभिमानाला प्रोत्साहन देणारे आहे.
परमात्मा दिसत नाही
म्हणून काय झाले
तो
सगळीकडे भरून राहिलेला
आहे. तो सुक्ष्मपणे
सर्वत्र व्यापलेला आहे. आत्मज्ञानाने
समाधान व परमशांती
मिळते. इंद्रियांना तो दिसत नाही
म्हणून तो अगोचर,
अदृश्य आहे. मनाला
तो भासत नाही,
व नाश पावत
नाही, तो कोेठे
जात नाही, व
येत नाही म्हणून
तो अच्युत आहे.
त्यास रूप नाही,
म्हणून तो अरूप
आहे. त्याचा आदि
व अंत कळत
नाही, म्हणून तो
अनंत आहे. त्याला
कसल्याही मर्यादा नाहीत, म्हणून
तो अपरंपार आहे. ज्याचा
तर्क करता येत
नाही म्हणून तो
अतर्क्य आहे. तोच
परमात्मा आहे. अश्या
असंख्य उदाहरणांनी त्याचे वर्णन
करता येते. संपुर्ण विश्वामध्ये आत्म्यासारखी वस्तू नाही
म्हणून केवळ दृष्टान्ताच्या
निमित्ताने आत्मा कसा
आहे हे कसे तरी समजून
घ्यावे लागते. विवेकाने
जगाचा शोध घेऊ
लागले की दृश्याचा
निरास होतो त्यातून
टिकणारे कोणते व
तात्पुरते कोणते याची
आपोआप निवड होते.
मग आपण खरे
कोण याचा बोध
आपल्याच ठिकाणी आपल्यास
होतो. तो परमात्मा
दृश्याहून वेगळा असला
तरी दृश्याच्या अंतरी वास
करतो. सगळ्या चराचरांत
भरून राहिल्याने तो सर्वांचा
आत्मा आहे. सुक्ष्म
विचार केल्याने परमात्मा सर्वांतर्यामी आहे हे हृदयी जाणवते.
देहाभिमान सोडावा याचा
अर्थ कर्मत्याग नव्हे. कर्माच्या
आसक्तीचा त्याग महत्वाचा
आहे. कारण ही
आसक्तीच देहबुध्दीला धरून ठेवते.
देहात राहून देह
नसल्याची वृत्ति ठेवणे
आणि पुष्कळ कर्मे
करून अकर्तेपणामुळे ते मुळीच
न केल्यासारखी अवस्था सांभाळणे
ही जीवनमुक्ताची मुख्य लक्षणे
आहेत. त्यालाच कर्मयोगी म्हणतात. ती केवळ
जीवनमुक्तच ओळखू शकतो.
जसे माणूसच माणसाचे
सुखदुःख समजू शकतो.
माणसाला जनावराचे सुखदुःख
काय समजणार, वैद्यकीय तज्ञालाच दुसया वैद्यकीय
तज्ञाच्या अडचणी समजू
शकतात. त्या वैद्यकीय
तज्ञाच्या अडचणी कलाकाराला, सामान्य माणसाला कश्या समजतील.
म्हणून परमार्थाची आस्था नसेल
तर कदापीही ज्ञान होणार
नाही. माया कशी
व परमात्मा कसा आहे
हे ओळखणे म्हणजेच
अध्यात्म असे म्हणता
येईल. परमात्म्याचे वर्णन कितीही
केले तरी ते त्या वर्णनाहून
निराळेच असते. कारण
आपण वर्णन इंद्रियांच्या
साह्याने करतो परंतू
परमात्मा इंद्रियातीत आहे. विवेकाने
परमात्मा दर्शन होऊ
शकते. परमात्मा एकच एक अद्वितीय आहे. म्हणून
देहबुध्दीची कल्पना नाहीशी
करण्यासाठी निर्विकल्प ब्रह्मस्वरूपाची कल्पना करावी
त्याने देहबुध्दीची कल्पना नाहीशी
होते. सर्वजण ब्रह्मामध्येच
जगतात पण आपण त्यामध्ये जगतो याची
जाणीव त्यांना नसते. मायेच्या
भ्रमाने होणारा भास
समजतो पण भास निर्माण करणारे परब्रह्म
समजत नाही. परमेश्वराने
निर्माण केलेल्या सर्व वस्तुंचा
उपभोग घेणे समजते
नव्हेतर त्यावर हक्क
गाजविता येतो. सूर्यामुळे
आपणास प्रकाश व
उष्णता मिळते. मग
काय झाले तो
सृष्टीचा नियमच आहे.
सूर्यामुळे प्रकाश व
उष्णता घेणे हा
आमचा हक्कच आहे
अशी समजूत होते
हा भ्रमाने होणारा भास
आहे. परंतू सूर्य
कोणी निर्माण केला याचा
कधी विचार करावासा
वाटत नाही. सूर्य
निर्माण करणारे परब्रह्म
आहे याचा विचार
केला पाहिजे. केवळ देहबुध्दीमूळे
होणारा भास जाणून
घेतला पाहिजे. मानवी मन
संकल्प करते व विकल्प करते.
मन जेव्हा परमात्म्याची
कल्पना करते तेव्हा
ती खरी असते
तो संकल्प होतो.
तेच मन जेव्हा
मायेची कल्पना करते
तेव्हा ती खोटी
असते तो विकल्प
होतो. तरी आपल्या
मनाला संकल्प करण्याची
सवय लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आत्मस्वरूपस्थिती कशी आहे
हे आपल्याला नीट समजत
नाही म्हणून ती
खरी नाहीच असे
म्हणणे योग्य नाही.
विवेकाने ते आत्मज्ञान
करून घ्यावे. ज्या ब्रह्मस्वरूपाची
आपण कल्पना करायची
ते स्वरूपच जर आपण स्वतः झालो
तर मग कल्पना
आपोआप शुन्यवत होते. आपण
ब्रह्मस्वरूप आहोत हे
आपले मूळचे स्थान
होय. तेथून बाजूला
न होता आपण
साधना करण्यास शिकावे. आपले हे
मूळ स्थान आपण
ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हे जर साधले
तरच अलिप्तपणाची युक्ति स्वाधीन
होते. सर्व काहीकरून
कशात न सापडण्याची,
मीपणाने देहाभिमानामध्ये न गुंतण्याचीकला
ही अलिप्तपणाची युक्ति आहे.
आत्मस्वरूपाची प्रचिती आल्यावर देहाचे स्मरणच
उरत नाही. तेथे
साधन करणे किवा
सोडणे हे उरत नाही. त्यावेळी
या देही मी
विदेही अवस्था भोगत
आहे असे अनुभवता
येते. श्रवणामध्ये अर्थाकडे लक्ष देणे
म्हणजे मनन होय.
आणि त्या अर्थाकडे
लक्ष एकाग्र झाले
म्हणजे चिंतन होते.
त्यानेच साक्षात्कार होऊन समाधान
मिळते. ज्या विचाराने
अभिमान, भ्रम नाहिसा
होतो, अंगी धैर्य
उत्पन्न होते, देहातून
सुख घेण्याची प्रवृत्ति मरते, परमार्थ
वाढतो तोच सर्वश्रेष्ठ
विचार आहे. देहबुध्दि
मेल्याने जिवंत असून
मेल्यासारखा राहता येते.
वासना मेल्याने मृत्यूस मारून जिवंत
राहता येते. मी
आत्माच आहे या स्वच्छ विवेकाच्या
जोरावर आपल्याला जन्म आणि
मृत्यू यांचे स्मरण
होत नाही. ज्याच्या
सत्तेने हे विश्व
निर्माण झाले. ज्याच्या
सत्तेने विश्वामधील सर्व घडामोडी
घडून येतात तो
खरा परमेश्वर होय. तो
कायमचा सर्वकर्ता आहे हे ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तो परमेश्वर या विश्वाहून
पूर्णपणे वेगळा आहे,
निराळा आहे. याबद्दल
यत्किंचित देखील संशय
काढू नये. कारण
जो करतो ते
तो नसतो. जसे
बाहुल्याचा सुत्रधार. सुत्रधार बाहुल्यांना नाचवून खेळ
करतो म्हणजे तो
बाहुल्या नव्हे. या
संपूर्ण विश्वाचा सुत्रधार तो परमात्मा
आहे. आपण त्याच्या
हातातील केवळ बाहुल्या
आहोत. तरीसुध्दा आपल्याला किती गर्व
होतो. मी हे करतो, मी
ते करतो वगैरे.
पुष्कळ जन्मांनतर मानवदेह प्राप्त होतो. जेव्हा
पाप पुण्य यांचे
प्रमाण सम होते
तेव्हा मानवदेह प्राप्त होतो. या
मनुष्यजन्मामध्ये आत्मज्ञान केले नाही
तर सद्गति मिळत
नाही. पुन्हा मानवदेह
मिळेल याची खात्री
नाही. कारण अंतकाळापर्यंत
विषय वासनांचा उपभोग घेत
असल्यामूळे पुढील जन्म
त्याच वासनेतून निर्माण होतो. मी
देह आहे ही भावना सोडली
की विदेहीपणाचे ऐश्वर्य प्राप्त होते. अन्यथा
केवळ अधोगती निश्चित
आहे हे ओळखून
आत्मज्ञानासाठी प्रयत्न करावा. अज्ञानामध्ये
मायेची भयंकर भिती
वाटते तर ज्ञानामध्ये
मायेचा भ्रामकपणा जाणवतो. जसे अंधारामध्ये
दोरखंडाला पाहून सापाची
भिती वाटते, परंतू
प्रकाशामध्ये त्याच दोरखंडाची
भिती वाटत नाही.
म्हणून मायेच्या आधीन न होता मायेवर
नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जे खरे आहे
ते स्वतः सिध्द
असते ते निर्माण
करावे लागत नाही.
पण जे खोटे
असते ते खयावर
झाकण घालते. परब्रह्म
हे स्वयंसिध्द आहे परंतू
माया त्यावर आवरण
घालून त्या परमसत्या
ऐवजी मायेचा आभास
निर्माण करते. या
संपुर्ण विश्वामध्ये परमात्मा सुक्ष्मरूपाने आहे हे परमसत्य आहे परंतू
माया या परमसत्यावर
मायेचे आवरण घालून
विश्वाचा आभास निर्माण
करते. म्हणून आपणास
विश्वामध्ये परमात्मा असून सुध्दा
दिसत नाही. तरी
सदासर्वकाळ आत्मस्वरूपाशी लक्ष केद्रीत
करावेे. आत्मस्वरूपाची ओळख करणे
हा मनुष्याचा स्वधर्म आहे. सर्व
दृश्य पदार्थांच्या आंतबाहेर ब्रह्मस्वरूप भरून आहे.
तरीपण सामान्य लोकांपासून ते गुप्त
आहे. प्रत्येकाच्या जवळ असून
देखील ते त्यांना
नसल्यासारखे झाले आहे.
आत्मज्ञानी अतिशय दुर्मिळ
असतात. ते निस्वार्थी
असून कार्य झाल्यानंतर
तेथून निघून जातात.
शोधले तरी ते सापडत नाहीत.
त्यांना मान-सन्मान नसतो, वैभवाची
अभिलाषा नसते. देहधारी
मनुष्याला अपार परमात्म्यास
संपुर्णपणे जाणणे शक्य
नसते. कारण मनुष्याची
कुवतच किती छोटी
आहे. जसे पाव
लीटरच्या मापामध्ये महासागर मापणे केवळ
अशक्य आहे. स्थूल,
सुक्ष्म व कारण या सगळ्या
देहाचा शोध घेतला
तर हा खोटा
मीपणा कोठे दिसत
नाही. त्या शोधात
सारे मी-तू पण
पंचतत्वामध्ये विलीन होऊन
जाते. विवेकाने देहाभिमान जातो, तर
वैराग्याने आसक्ती जाते.
देह व आत्मा
एकमेकापासून वेगळे न
करता देहामध्ये आत्मदर्शन घेणे महत्वाचे
आहे. याचा प्रयत्न
जे करीत नाहीत
ते केवळ दुर्दैवी
असून नरदेह फूकट
वाया घालवतात.
सारांशाने आत्मज्ञानाचा अनुभव म्हणजे
देहभान विसरून आत्म्याचा
आनंद घेणे हा
आहे. आपण कोण
आहे या परमसत्याचा
साक्षात्कार होणे हा
आत्मज्ञानाचा अनुभव आहे.
आपले खरे स्वरूप
आत्मा आहे. शरीर
हे आत्म्यास प्रकट होण्याचे
एक साधन आहे.
कारण आत्मा अव्यक्त
आहे. त्याला प्रकट
होण्यासाठी साधनाची गरज असते.
जसे मनुष्यशरीर, पशुशरीर, वृक्ष वेली
इत्यादी. जो आत्मा
मनुष्यशरीरात आहे तोच
आत्मा किडा-मुंगीमध्ये, हत्तीमध्ये, झाडांमध्ये आहे. प्रकट
होण्यासाठी साधने वेगवेगळी
आहेत. ज्या प्रमाणे
सूर्यामधून निघालेली सूर्यकिरणे असंख्य ठीकाणी
एकाच प्रकारची असतात त्याप्रमाणे
सत्यरूप परमात्मा अंशरूपाने सर्व प्राणीमात्रांमध्ये
आत्मारूपाने स्थित असतो.
आत्मानुभव हा केवळ
दिव्य अनुभव आहे.
कारण हा अनुभव
इंद्रियातीत, त्रिगुणातीत आहे. कारण
इंद्रिये आणि त्रिगुण
प्रकृती हे शरीराशी
संबंधीत आहे. तर
आत्मा निर्गुण, निराकार, अव्यक्त व अविनाशी
आहे. आत्मज्ञानाचे तत्त्वज्ञान हे आपल्या
देहातील आत्मारूपी परमेश्वर जाणणे हेच
आहे. आत्मा म्हणजे
प्रत्येक प्रणिमात्रांमध्ये सूक्ष्मरूपाने स्थित असलेला
परमात्मा जाणून त्यास
ओळखणे होय. आत्म्याचा
अनुभव घेण्यासाठी आत्म्याने जे बाह्यकवच
शरीर धारण केले
आहे त्या शरीराचे खरे स्वरूप ओळखणे
अत्यंत आवश्यक आहे.
कारण आत्मा म्हणजे
शरीर नाही परंतू
आत्मा शरीरामध्ये प्राणरूपाने असतो. आत्म्याशिवाय
शरीर मृतप्राय आहे. तर
आत्म्याला आकार येण्यासाठी,
व्यक्त होण्यासाठी शरीराची गरज असते.
असे हे आत्मा
व शरीर संयुक्त
असून सुध्दा विभक्ततेने
अनुभवता येते. हे
परम सत्य आहे.
शरीराचा अहंकार संपुष्टात
आल्यावर उरलेल्या आत्म्याचे दर्शन होऊ
शकते. या तत्त्वज्ञानाच्या
अनुभवामुळे समदर्शन होते. समदर्शन
म्हणजे सर्वत्र एकाच परमसत्याची
जाणीव होणे. ते
परमसत्य म्हणजे या
विश्वामध्ये श्रीहरी हे एकच सत्य आहे.
बाकी सर्व त्याची
महामाया आहे. ज्याचे
चित्त आत्म्यामध्ये, परमात्म्यामध्ये एकरूप झाले
आहे, त्यास आत्मसाक्षात्कार
होतो, आत्मानुभूती येते. तो
इंद्रियसुखामध्ये आसक्त होत
नाही. त्यास महामायेचा
आभास दूर करता
येतो. या विश्वामध्ये
श्रीहरी सुक्ष्मरूपाने स्थित आहे,
परंतू तो सर्वांना
दिसत नाही. त्यांना
त्या फक्त भौतीक
वस्तू दिसतात. परंतू आत्मसाक्षात्कार
झालेला आहे, त्यास
त्या प्रत्येक भौतीक वस्तूमध्ये
श्रीहरी दिसतो. सर्वत्र
तो श्रीहरीचे रूप पाहू
शकतो, जाणू शकतो.
कारण हेच परमसत्य
आहे. हे तत्त्वज्ञान
आत्मसात करून मनुष्यजन्म
सार्थकी लावणे हाच
अर्थबोध उद्देश प्रामुख्याने
रामदास स्वामींनी तहेतहेने, तसेच उदाहरणे
देऊन सविस्तरपणे सांगितला आहे.
आपल्या मूळ
अस्तित्वाचे अज्ञान हा
महामायेचा मुख्य प्रभाव
आहे. कारण आपले
अस्तित्व हे केवळ
आत्म्याशी निगडीत आहे.
मनुष्याच्या मृत्युनंतर शरीर तेथेच
रहाते. त्यातील प्राण निघून
जातो. तो प्राण
म्हणजेच आत्मा होय.
शरीराला जन्म-मृत्यु आहे, तर
आत्मा अमर आहे.
शरीर नाशीवंत आहे तर आत्मा शाश्वत
आहे. हे परमसत्य
न जाणता शरीरालाच
मी म्हणणे, समजणे यालाच
केवळ अज्ञान म्हणतात.
याच तत्त्वज्ञानावर आपली भारतीय
संस्कृती आधारलेली आहे. या
अज्ञानामूळे मनुष्य शरीराची
जोपासना करतो. आपण
शरीर आहे मानतो.
त्याला शरीराचा व कर्माचा
अहंकार होतो. आणि
त्या कर्माचे इच्छित फळ
मिळाले नाही तर
तो दुःखी होतो,
क्रोधी, मत्सरी होतो.
मग त्यातूनच चोरी, दरोडे,
खून, मारामारी, जाळपोळ, हत्याकांड, सत्तेची हाव, भ्रष्टाचार,
स्त्रीयांवर अत्याचार इत्यादी वाईट प्रकार
निर्माण होतात. अज्ञानामूळे
मनुष्य स्वतःचेच नुकसान करून
घेतो जे भरून
काढता येणे अशक्य
होते कारण तो
जन्मभर भौतिक सुखामध्ये
गुंगून जातो. आहाराचा
सुध्दा मनुष्याच्या शरीरावर, आहाराच्या गुणधर्मानूसार परिणाम होेतो.
स्निग्ध व रसयुक्त
पदार्थांच्या सात्विक आहारामुळे मनुष्याचे आयुष्य, शक्ती, सुख
आरोग्य वाढते. तर
कडू, आंबट, खारट,
तिखट पदार्थांच्या राजस आहारामुळे
मनुष्याचे दुःख, शोक
व रोग वाढतात.
तसेच शिळे व उष्टे अन्न
मांस इत्यादी पदार्थांच्या तामस आहारामुळे
मनुष्याचे अहंकार व
द्वेष या तामस
वृत्ती वाढतात. अश्या अनेक
भौतिक सुखाचा पूरेपूर
उपभोग घेतो त्यातच
त्याचा अंत केव्हा
होतो हे त्यालाही
समजत नाही व नंतर अंतकाळी
ज्या भौतिक सुखाचे
चिंतन असेल त्याप्रमाणे
पुनर्जन्म मिळतो. मनुष्यजन्म
मिळेलच असे नाही.
उदा. मांस मटन
खात असताना मृत्यु
आल्यास मटनाचा विचार
करीत असल्यामूळे पुनर्जन्म जनावराचा मिळेल त्या
पशूजन्मामध्ये विचारशक्ती नाही. म्हणून
आत्मज्ञान समजून घेणे
केवळ मनुष्यजन्मामध्येच शक्य आहे.
पशू, पक्षी, कीटक
यांना विचारशक्ती नाही. म्हणून
मनुष्यजन्म उपभोगासाठी नाही तर
आत्मज्ञानाच्या अनुभूतीमध्ये मनुष्यजन्माची सार्थकता आहे.
या आत्मज्ञानाचा
विसर विपरीत संस्कारामूळे
झालेला आहे. आज
प्रत्येक ठिकाणी पाश्चात्य
संस्कृतीचा विपरीत प्रभाव
दिसून येतो. ही
पाश्चात्य संस्कृती केवळ भोगप्रधान
संस्कृती आहे. परंतू
आपली संस्कृती मोक्षप्रधान आहे. आज
आपल्या प्राचीन संस्कृतीचे अंशच फक्त
शिल्लक राहीले आहेत.
संस्काराला खूप महत्व
आहे. लहान मूलांवर
जसे संस्कार होतील तेच
त्यांचे पुढिल आयुष्य
घडवून आणतात. आज
दूरसंचावरील विवीध वाहीन्याद्वारे
लहान मूलांवर
विपरीत संस्कार होत आहेत.
या संस्कारांचा वारसा घेऊन
ही युवा पीढी
उद्याचा समाज बनविणार
आहेत. आजच्या विज्ञान
प्रगतीमध्ये मनुष्य बहिर्मुख
प्रगत झाला परंतू
अंतर्मुख अधोगतीस चालला आहे.
विज्ञानामूळे अणूशक्तीची निर्मिती करून अहंकार
दुणावला आहे. त्यास
आकाश दोन बोटांवर
आहे असा भ्रम
झाला आहे. अणूशक्तीची
भिती दाखवून इतरांस
तो हीन समजू
लागला आहे. आपल्या
इच्छेप्रमाणे तो इतरांना
वागवू लागला आहे.
माझ्याकडे शक्ती आहे
मी काहिही करू
शकतो अशा विचारांनी
आजचा काळ संकूचित
तसेच विनाशकारी वृत्तीचा बनला आहे.
मागील शतकामधील या विचारांचा
वारसा चालू शतकामध्ये
पुढे झेपावतो आहे. मागील
शतकामध्ये मनुष्य चंद्रावर
जाऊन आला तर या शतकामध्ये
तो मंगळावर जाऊ लागला
आहे. सर्व भौतिक
वस्तूंचा पूरेपूर उपभोग घेणे
हाच संस्कार या काळामध्ये
प्रकर्षाने दिसून येतो.
पण या सर्व
भौतिक वस्तूंचा उपभोग कसा,
कीती व कश्यासाठी
घ्यावा हे सुध्दा
समजत नाही. तसेच
या सर्व भौतिक
वस्तू निर्माण कोणी केल्या
याचा विचार सुध्दा
करण्याची इच्छा होत
नाही. समाजामध्ये आत्मज्ञानाचा उपदेश रूजविण्याचे
कार्य सफल झाले
नाही याची अनेक
कारणे आहेत. समाजाची
परीस्थिती हे एक प्रमूख कारण
आहे. आजच्या काळामध्ये
विश्वास हे जीवनमूल्य
नाहीसे होत चालले
आहे. कोणी आत्मज्ञानाचा
उपदेश केला तर
विश्वास नसल्यामूळे त्यावर दुर्लक्ष
केले गेले. देव
कोठे आहे? दाखवा
म्हणजे विश्वास बसेल अशी
आजची विचारधारा आहे. विश्वासामध्ये
आदराची भावना असते.
आज कोणाचाच कोणाला आदर
नाही. सर्वांनाच मी चा अहंकार झाला
आहे. आज या अहंकाराला समाजामध्ये
प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे
हे मोठे दुर्दैव
आहे. या देहाच्या
अहंकारामूळे परमसत्याचा विसर होतो.
त्यासाठी आज आत्मज्ञानाचा
प्रसार व प्रचार
होणे अत्यंत निकडीचे
आहे.
म्हणून आज
रामदास स्वामींच्या एकंदर तत्त्वज्ञानातील
मुख्य तत्त्वज्ञान कोणते हे
लक्षात घेतले पाहिजे.
आत्मज्ञानाचा शोध घेऊन
आत्मानुभूती घेणे या
उपदेशाचा रामदास स्वामींनी अनेक वेळा
अनेक ठिकाणी आवर्जून
उल्लेख केला आहे.
कारण हेच सर्व
परमार्थाचे सार आहे.
आजच्या काळामध्ये या तत्त्वज्ञानाची
अत्यंत आवश्यकता आहे. केवळ
याच
आत्मज्ञानामुळे आजच्या गंभीर
परिस्थितीवर मात करणे
शक्य आहे. या
आत्मज्ञानामुळे कर्मयोगाचे आचरण होऊ
शकेल. केवळ कर्माच्या
आसक्तीचा त्याग होऊन
सर्व कर्मे सुरळीत
पार पडतील. देहाची
आसक्ती कमी झाल्यामुळे
कशाचाही मोह होणार
नाही. पैशाचा मोह,
संपत्तीचा मोह, सत्तेचा
मोह, नातलगांचा मोह, हितचिंतकांचा
मोह हीच आजच्या
बकाल परिस्थितीची मूळ कारणे
आहेत. आत्मज्ञानाची ओळख मनामध्ये
रूजल्यानंतर देहाची आसक्ती
कमी होते. उदा.
जेव्हा युध्दभूमीमध्ये द्रोणाचार्यांना आपला पुत्र
अश्वत्थामा मारला गेला
हे युधिष्ठिरा कडून समजले
तेव्हा द्रोणाचार्यांचा जीवनाचा दृष्टीकोन पुर्णपणे बदलला. त्यांनी
शस्त्रत्याग केला व ध्यानस्थ झाले. आपला
पुत्र अश्वत्थामाच आता या जगात राहीला
नाही तर आता माझ्या जीवनाला
काही अर्थ नाही
अशी त्यांची स्थिती झाली.
हे पुत्राच्या बाबतीत होते
तर आपला देह
म्हणजे आपण नाही
हे समजल्यानंतर काय स्थिती
होईल. जशी भगवान
रमण महर्षींची झाली होती.
तात्पर्य़ हेच की जेव्हा देहाचीच
आसक्ती कमी होते
तेव्हा मान, अ्पमान,
गर्व, अहंकार, क्रोध, लोभ,
मोह, मत्सर सर्व
काही देहाचे आत्मघातकी
विकार गळून पडतात.
हेच आजच्या परिस्थितीचे
मुळ कारण आहे.
आज आपण सर्वत्र
पहातो आहे. चोरी,
दरोडे, खून, मारामारी,
जाळपोळ, हत्याकांड, सत्तेची हाव, भ्रष्टाचार,
स्त्रीयांवर अत्याचार, इत्यादी सर्व काही
देहाच्या आसक्तीमुळेच होते आहे.
आजच्या काळातील उदाहरण. भारताचे उपराष्ट्रपती यांना राष्ट्रपती
पद मिळाले नाही
तर लगेच त्यांना
मानसिक धक्का बसला
व त्यात त्यांचा
अंत झाला. राष्ट्रपती
पद हेच जीवनाचे
ध्येय समजून ते
मिळाले तरच जीवन
नाही तर जीवनाला
काही अर्थ नाही
अशी त्यांची समजूत झाली.
आत्मज्ञानामूळे आजच्या समाजामधील
प्रत्येक घटकातील देहाभिमान संपून आज
भेडसावणाया सर्व समस्या
संपुष्टात येतील. आजच्या
सर्व समस्या देहाशी
निगडीत आहेत. देहाभिमानाचा
विसर झाल्यावर एकात्मतेची भावना निर्माण
होईल. मुख्य म्हणजे
मृत्युचे भय रहाणार
नाही. कारण मृत्यु
हा देहाचा आहे.
आणि आपले खरे
स्वरूप देह नसून
आत्मा आहे. आत्मज्ञानामुळे
वैयक्तीक, कौटुंबिक, सामाजीक व राष्ट्रीय
या सर्व पातळ्यांवर
मानवाचा उध्दार होईल.
मनुष्याची विनाशकारी विचारधारणा नाहीशी होऊन
विवेकबुध्दि जागृत होईल.
वैयक्तीक पातळीवर देहाशी निगडीत
असलेले राग, लोभ,
द्वेष, मत्सर हे
सर्व विकार आणि
विषयवासना नाहीशा होतील.
हे जरी स्वप्नवत
व अतिशय अवघड
वाटत असले तरी
जेव्हा आत्मज्ञानाची जाणीव होते
तेव्हा देहाभिमान सहज संपुष्टात
येतो. या विश्वामध्ये
अशक्य काही नाही.
त्यासाठी अंतरीक तळमळ
पाहीजे, तिव्र इच्छा
पाहीजे. चिकाटीने प्रयत्न केले पाहीजे
तर काहीही अशक्य
नाही. अश्या रितीने
वैयक्तीक पातळीवर प्रत्येकास आत्मज्ञानाची जाण होऊन
मनःशांती, निरोगी शरीर,
सुख समाधान मिळेल.
कौटुंबिक पातळीवर कुटूंबातील एकमेकांचे हेवेदावे, भांडणतंटा संपून एकमेकांविषयी
आदराची, जिव्हाळ्याची भावना उत्पन्न
होईल. अश्या प्रसन्न
वातावरणाचा संस्कार लहान मुलांवर
झाल्यास त्याचा भावी
पीढीवर चांगला परिणाम
होईल. लहानपणी मुलांवर जे संस्कार
होतात तशीच त्यांची
विचारशक्ती तरूणपणी कार्य करते.
देहाभिमानाचा कडू संस्कार
आजच्या काळामध्ये सर्वत्र मोठ्या प्रतिष्ठेचा
विषय झालेला आहे.
तो वरवर कितीही
सुखावह दिसत असला
तरी शेवटी विषकन्येप्रमाणे
घातच करतो. लहानपणीच
मुलांवर देहाभिमानाची आसक्ती नसेल
तर तो तरूणपणी
नाशीवंत देहाच्या भौतीक सुखासाठी
विनाकारण राग, लोभ,
मोह, मत्सर, द्वेष
या मनोविकारांच्या आहारी जाणार
नाही. या मनोविकारातूनच
हेवेदावे, भांडणतंटा, चोरी, दरोडे,
खून, मारामारी, जाळपोळ, हत्याकांड, सत्तेची हाव, भ्रष्टाचार,
स्त्रीयांवर अत्याचार इत्यादी वाईट प्रकार
निर्माण होतात. हे
सर्व काही थांबविण्यासाठी
नूसतेच कायदे करून
त्यांचा इष्ट परिणाम
होत नाही, हे
आपण अनुभवतोच आहे. त्यासाठी
आजच्या तरूणपीढीची विचारधारणा बदलणे आवश्यक
आहे. सामाजीक पातळीवर एका नवीन
समृद्ध समाजाची निर्मीती होईल. ज्या
समाजातील प्रत्येकाची वैचारीक क्षमता उदार,
विशाल आहे. सुसंस्कृत
व सुसंस्कारीत तरूणपीढीचा अनुकूल परिणाम
होऊन कुटूंब कुटूंबातील
भांडणे, द्वेषभावना नाहीशा होऊन
त्या समाजाची सर्वांगीण प्रगती होईल.
राष्ट्रीय पातळीवर दोन समाजातील
सूड भावना दूर
होतील. प्रत्येक समाजाची दूसया समाजाविषयी
सलोख्याची भावना होईल.
जातीय तंटे ही
आजची मोठी राष्ट्रीय
समस्या आहे. ती
नक्कीच संपुष्टात येईल. राष्ट्रीय
पातळीवर प्रत्येकामध्ये विश्वबंधुत्वाची भावना निर्माण
होइल. जी आजच्या
काळाची खरी गरज
आहे. ही विश्वबंधुत्वाची
भावना नुसतीच धोरणे
जाहीर करून होत
नसते. त्यासाठी प्रत्येकाच्या हृदयी विश्वबंधुत्वाची
खरी तळमळ असावी
लागते. परस्परातील आत्मीयता जागृत करण्यासाठी
आत्मज्ञानाचीच तीव्रतेने आवश्यकता आहे.
अश्या रीतीने
रामदास स्वामींच्या तत्त्वज्ञानाची आजच्या काळामध्ये
कीती आवश्यकता आहे हे सहज स्पष्ट
होते.
No comments:
Post a Comment