Monday, 13 November 2017

मनुष्याच्या आरोग्यासाठी तुळशीचे महत्व




मानवी आरोग्यासाठी तुळस हे एक अमृत आहे, कारण मानवाच्या कोणत्याही व्याधीला सहजपणे नष्ट करण्याची शक्ती तुळशीमध्ये आहे. जो मनुष्य रोज नियमितपणे तुळशीची पाच पाने खाईल, त्याचे आरोग्य निरोगी राहील. तुळशीच्या रोपामध्ये विद्युतशक्ती मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने वातावरण शुध्द करण्याची शक्ती तुळशीमध्ये आहे. तुळस ह्रदयास हितकर, उष्ण, जठराग्नीला प्रदीप्त करणारी, तसेच दाह व पित्त उत्पन्न करणारी असून चवीला  तिखट व कडवट असते. तुळशीचा रस सुध्दा तिखट, कडवट उष्ण, वीर्य प्रदीप्त करणारा असल्याने मूत्रपिंडाचे सर्व दोष, कृमी, उचकी, उलटी, खोकला, ताप, श्वासविकार नष्ट होतात.
नियमितपणे तुळशीची पाने खाण्याने त्वचेचे सर्व रोग नष्ट होऊन कांती तेजस्वी होते असे अथर्ववेदामध्ये सांगितले आहे. तुळशीच्या सुगंधाने वातावरण शुध्द होऊन पवित्र व विकाररहित होत असे पद्मपुराणामध्ये सांगितले आहे. तुळशीचा काढा मासिक पाळीच्या काळामध्ये घेतल्यास निरोगी व दिर्घायु  संतानप्राप्ती होते, असा असे आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे. तुळस पित्तकारक, वातनाशक व कफनाशक असून उचकी, खोकला, विषदोष, श्वासविकार, पार्श्वशूल इत्यादी विकार नष्ट करते, तुळशीच्या पानांचा रस व मध एकत्र पिल्याने सर्दी नष्ट् होते, असे आयुर्वेदाचार्य चरक यांनी सांगितले आहे. तुळस ह्र्दयास हितकारक आहे असे निघुंटरत्नाकर यांनी सांगितले आहे. तुळस वातनाशक व कफनाशक असून चवीला तिखट व कडवट, रुचीवर्धक, व कृमीघ्न आहे, असे राजनिघुंट यांनी सांगितले आहे. तुळस तोंडातील दुर्गंधी नष्ट करते, असे  गजवल्लभ यांनी सांगितले आहे. तुळस लघु व उष्ण असून जठराग्नीला प्रदीप्त करणारी आहे, असे  आयुर्वेदाचार्य धन्वंतरी निघुंट  यांनी सांगितले आहे. होमियोपथीच्या दृष्टीने गर्भविकार, मूत्रविकार, व गुदाविकार या विकारांपासून मुक्ततेसाठी तुळस अत्यंत गुणकारी आहे. अलोपथीच्या दृष्टीने तुळस शरीरातील कफ बाहेर काढते.
नियमितपणे अनुशापोटी चमचाभर तुळशीच्या पानांचा रस पिल्याने बुध्दी, शक्ती, स्फुर्ती व स्मरण शक्ती वाढून रक्तातील कॉलेस्टरोलचे प्रमाण नियमित रहाते, तसेच वजन नियमित करते आणि कांती तेजस्वी होते. तुळशीची पाने, मंजिऱ्या, डहाळ्या, मूळ, व बी यास पंचांग म्हणतात. तुळशीची ही पाचही अंगे मनुष्यशरीरासाठी अत्यंत गुणकारी आहेत.
तुळशीच्या सेवनाने मनुष्यशरीरावर कोणतीही विपरीत प्रतिक्रिया होत नसून शरीरामध्ये कोणत्याही जहरी घटकांचा संचय होत नाही हे आजच्या विज्ञानाने सिध्द केले आहे.



No comments:

Post a Comment