Saturday, 7 October 2017

महारास




हेमंतऋतुतील  मार्गशीर्ष  महिन्यामध्ये  वृंदावनातील  कुमारींनी  कात्यायनी  व्रत  केले. हे  कात्यायनी  देवी, महामायी  नंदनंदन  आमचा  पती  व्हावा.  त्यांनी आपले मन  श्रीकृष्णास  समर्पित केले.
कात्ययनि  महामये  महायोगिन्य  धीश्वरी । नंदगोपसुतं  देवि  पतिं  मे  कुरू  ते  नमः।।
महिनाभर  कुमारींनी  कात्यायनी  व्रत  परिपूर्ण केल्यानंतर बाळकृष्ण त्यांना म्हणाले--कुमारींनो, मी  तूमचा  संकल्प  जाणला  आहे, ज्यांनी  आपली  बुध्दी  मला  समर्पित  केली, त्यांची  कामना  संसारीभोगाकडे  जात  नाही. जसे  भाजलेले  बी  अंकुरत  नाही.  येत्या  शरद  ऋतूतील  पौर्णिमेस  तूमचा  संकल्प  पूर्ण  होईल. आपल्या प्रियतमाचे हे बोल ऎकून त्या आनंदीत  झाल्या.   
बाळकृष्णाने शरदपौर्णिमेच्या  रात्री  रासक्रिडेचा  संकल्प केला. मधुर  बासरीवादन करायला सुरूवात केली. मधुर मुरलीचे सूर्  ऐकताच  गोपी  अर्धवट  काम  सोडून  मुरलीधरा कडे गेल्या. कोणी गाईची  धार  अर्धवट सोडून गेल्या, तर कोणी उतु  जाणारे  दुध  अर्धवट  सोडून गेल्या, तर कोणी स्वयंपाक  अर्धवट  सोडून गेल्या, तर कोणी जेवायला वाढण्याचे  अर्धवट  सोडून गेल्या, तर कोणी दुध पाजायचे  अर्धवट  सोडून गेल्या, तर कोणी पतीची सेवा  अर्धवट  सोडून गेल्या, तर कोणी जेवायचे  अर्धवट  सोडून गेल्या, तर कोणी चंदन  लावायचे  अर्धवट  सोडून गेल्या, तर कोणी काजळ लावायचे अर्धवट  सोडून गेल्या, तर कोण वस्त्रालंकार  अर्धवट  सोडून गेल्या, तर कोणी गेल्या. भगवंताकडे सर्व गोपी लोहचुंबका प्रमाणे खेचल्या गेल्या.
 भगवंताच्या  आकर्षणाने त्यांचे पापपुण्य  नष्ट झाले, त्यांचा गुणमयदेह  नष्ट झाला. त्या दिव्यदेहाने  वृंदावनामध्ये पोहोचल्या. तेव्हा मुरलीधर त्यांना म्हणतात--सुंदरींनो, वृंदावनामध्ये तुमचे  स्वागत आहे, परंतू  ही  रात्र  भितीदायक आहे, येथे हिंस्त्र  प्राणी असतात, स्त्रियांनी  येथे  थांबणे  चूकीचे आहे, तुम्ही येथे थांबू नका. परत आपापल्या घरी  जा. आपल्या  पतीची, पुत्रांची, स्वजनांची  सेवा  करा. तोच  तूमचा  श्रेष्ठ  धर्म आहे. माझ्या  लीला-गुण  श्रवणाने, दर्शनाने,  संकिर्तनाने,  ध्यानाने  माझे अनन्य  प्रेम तुम्हास प्राप्त होईल ते  माझ्याजवळ  राहून  होत  नाही. तुम्ही परत  जा.
आपल्या प्रियतमाचे हे कठोर बोल ऎकून गोपी  खिन्न झाल्या. पायाच्या  नखांनी  माती  उकरू  लागल्या, रडू  लागल्या. त्यांचे हृदय  भरून  आले, त्यांना काहीच बोलवेना. भगवंतावर  त्यांचे  अनन्य  प्रेम होते. मोठ्या धाड्साने त्या गोपी म्हणाल्या--प्रभो,असे  निष्ठुर  बोलू  नये. आमचा त्याग  करू  नये. तूम्हीच तर आमचे जन्मोजन्मीचे  पती आहात. त्यासाठीच तर सर्व संसार सोडून आम्ही तूझ्या चरणसेवेसाठी आलेलो आहोत.  तूला शरण आलेलो आहोत.  आमच्यावर कृपा  करावी.आम्ही तूझ्या दासी आहोत.
अशा रितीने परिक्षेमध्ये  पास  झाल्यानंतर  प्रत्येक  गोपीसाठी बाळकृष्णाने एक-एक  रूप  धारण  करून  रासलिलेस प्रारंभ केला. हात  पसरून, अलिंगन, गोपींच्या अंगास स्पर्श करून, विनोद करीत, स्मितहास्य करीत बाळकृष्णाने सर्व गोपींचे मनोरथ पूर्ण केले. त्यांचा दिव्य  प्रेमभाव  जागृत झाला. गोपींना  परमानंद प्राप्त झाला. काही  वेळानंतर  त्यांना सूक्ष्म अहंकार झाला, त्याक्षणी  बाळकृष्ण एकाएकी अंतर्धान पावले. तेव्हा गोपींची  विरहअवस्था अत्यंत दारूण झाली. अमाप संपत्ती क्षणामध्ये नष्ट व्हावी तशी गोपींची  अवस्था झाली.
विरह-गीत म्हणू लागल्या. तेच गोपी-गीत म्हणून प्रसिध्द आहे. भगवंताच्या  लीलाचे  स्मरण. गोपींचे  मन  श्रीकृष्णमय. त्या गोपी-गीतामध्ये म्हणतात--
आम्ही  केवळ  तूझ्यासाठी  प्राण  धारण  केलेले आहेत, तूला  दशदिशांमध्ये  शोधीत  आहोत. तू  आम्हास  घायाळ  केले. आपले  सुंदर  मुखकमल  दाखवा. आमच्या  हृदयातील  आग  शांत  करा. तूझ्या  कथा  अमृतस्वरूप असून ज्ञानीजन  त्या  गातात. त्याचे  श्रवण  कल्याणकारी आहे, जे  त्याचे  विस्ताराने  वर्णन  करतात, तेच  सर्वश्रेष्ठ  दानशूर आहेत. तूझे  प्रेमपूर्णहास्य मंगलदायी आहे. तूमचा  विरह आम्हास असह्य होत आहे, एक क्षण आम्हास एका युगासमान भासतो आहे.  गोपीं  चा  गर्व  नष्ट झाला. त्याक्षणी बाळकृष्ण प्रगट झाले. गोपींना पुन्हा परमानंद झाला.  हृदयतील  आग  शांत झाली. भगवान  गोपींना  उपदेश  करतात.-जे  प्रेम  करणाऱ्या वरच  प्रेम  करतात, त्यांचा  सर्व  व्यवहार  स्वार्थासाठीच असतो, त्यात  कोणताच धर्म  नाही. जे  प्रेम    करणाऱ्या  वरही  प्रेम  करतात, त्यांचा  सर्व  व्यवहार  निस्वार्थी असतो,  त्यात खरा धर्म असतो,  त्यांचा  स्वभाव  परोपकारी असतो. मी  तर  प्रेम  करणाऱ्या वर  सुध्दा  प्रेम  करीत  नाही, कारण  त्यांची  चित्तवृत्ती  नेहमी  माझ्याकडेच  लागून  रहावी. म्हणून  मी  अदृश्य  झालो  होतो. माझ्याशी  तूमचा  हा  आत्मिक  संयोग  सर्वथैव  निर्दोष आहे. जन्मजन्मांतरी  सुध्दा  तूमच्या  प्रेम, सेवा, त्यागाचे  ऋण  मी  फेडू  शकणार  नाही, तूम्हीच  मला  आपल्या  सौजन्याने  तूमच्या  ऋणातून  मुक्त  करावे.
आकाशातून  देव-देवता  भगवंताची  रासक्रिडा  उत्सुकतेने  पहात  होते. आकाशातून पुष्पवृष्टी झाली.
हा महारासलिलेचा अलौकिक प्रसंग शुकदेवाने परीक्षितराजाला सांगितला. तेव्हा परीक्षित शंका विचारली. परीक्षित-ब्रह्मन, धर्माचे  उपदेशक,  धर्माचरण  करणारे, असताना  त्यांनी  परस्त्रीयांना  स्पर्श  करण्याचे  धर्मविरोधी  वर्तन  का  केले. माझा  संशय  दुर  करा. तेव्हा शुकदेव सांगतात-श्रेष्ठ  पुरूषांचे  वर्तन  कधीकधी  धर्माचे  उल्लंघन  भासते. परंतू  ते  दोषी  नसतात, जसे  अग्नीमध्ये  सर्वकाही  भस्मसात. परंतू  तो  अपवित्र  होत  नाही.  त्यांच्यामध्ये  कर्ताभाव  नसतो, स्वार्थ  नसतो,  त्यांच्या  प्रभावाने  सर्वांची  कर्मबंधने  नष्ट  होतात, त्यांना  कर्मबंधन  कसे  असेल.  ज्याच्या  अंगी  सामर्थ्य  नाही,  त्याने  असा  विचार  सुध्दा  करू  नये, कृत्य  केल्यास  सर्वनाश होतो. महादेवाने  वीष  पीले, दुसरा  मरून  जाईल.  म्हणून  श्रेष्ठ  पुरूषांच्या  उपदेशाचे  आचरण  करावे.  गोपांना  भगवंताचा  कधीच  मत्सर  वाटला  नाही, कारण  ते  असेच  समजत  होते  कि,आपल्या  पत्न्या(गोपी) आपल्या  जवळच  आहेत. जो  ही  रासक्रिडा  श्रध्देने  श्रवण  करतो,  त्यास  निष्काम भक्ती  प्राप्त होते, त्याच्या कामभावना  नष्ट होतात.

No comments:

Post a Comment