Sunday, 17 September 2017

वाली पत्नी तारास आत्मज्ञानाचा उपदेश



वाली  पत्नी  तारास  आत्मज्ञानाचा  उपदेश
द्वापारयुगामध्ये  किष्किंधानगरीचा  राजा  वालीने  आपल्या  लहान  भाऊ  सुग्रीवास  नगरीच्या  बाहेर  हाकलून  देऊन  त्याच्या  पत्नीशी  अधर्माचे  वर्तन  करीत  होता.  म्हणून  श्रीरामाने  त्याचा  वध  केला.  त्यावेळी  त्या  वालीच्या  मृत  देहा  जवळ  जाऊन  वालीची  पत्नी  तारा  ढसढसा  रडू  लागली.  शोक  करू  लागली.  श्रीरामास  ती  म्हणाली,--ज्या  बाणाने  माझ्या  पतीचा  वध  केलास,  त्याच  बाणाने  माझाही  अंत  करून  टाक.  मी  पती  वियोगाचे  दुःख  सहन  करू  शकत  नाही.  तूला  पत्नी  वियोगाचे  दुःख  माहीत  आहेच.  तेव्हा  श्रीरामाने  तारास  आत्मज्ञानाचा  उपदेश  केला.
श्रीराम  म्हणाले,--तूझा  पतिच्या  वधाने  तू  शोक  करणे  योग्य  नाही.  तूच  विचार  कर  तूझा  पती  पंचमहाभूतात्मक  देह  आहे  की  त्या  देहामध्ये  असलेला  आत्मा  आहे?  जर  तूझा  पती  पंचमहाभूतात्मक  देह  असे  तू  मानीत  असशील  तर  तो  तूझ्या  समोरच  आहे.  तर  शोक  का  करते  आहेस?  जर  तूझा  पती  आत्मारूप  आहे  असे  तू  मानीत  असशील  तरी  सुध्दा  तूला   शोक  करण्याचे  काहीच  कारण  नाही.  आत्मा  निर्गुण  निराकार  आहे.  तो  जन्मास  येत  नाही.  तो  मरत  ही  नाही.  तो  सर्वव्यापी  आहे.  तो  आकाशा  प्रमाणे  नित्य  ज्ञानस्वरूप,    शूध्द  आहे.  तेव्हा  तारा  श्रीरामास  म्हणाली,--शरीर  नाशीवंत  आहे  आणि  आत्मा  शाश्वत  आहे  तर  मग  सुख-दुःखाचा  संबंध  कोणाशी  असतो.  तेव्हा  श्रीराम  म्हणाले,--जो  पर्यंत  शरीराचा  आणि  इंद्रीयांचा  अहंकार  होत  असतो  तो  पर्यंत  आत्मज्ञानाच्या  अज्ञानामुळे  त्या  शरीरास  सुख-दुःखाचा  भोग  संबंध  येतो.  जसे  इंद्रीयांच्या  भोगाचा  विचार  करणायास  स्वप्नामध्ये  अनेक  भोग  दिसतात  परंतू  जागे  झाल्या  नंतर  ते  सर्व  भोग  खोटे  आहेत  हे  समजते,  तसेच  आत्मज्ञाना  नंतर  शरीराच्या  इंद्रीयांचे  सर्व  भोग आपोआप  नष्ट  होतात.  शरीराच्या  सुख-दुःखाचे  भोग  हे  भासमान  असून  केवळ  मनाचे  खेळ  आहेत.  जसे  स्फटिक  मण्यास  कोणताही  रंग  नसला  तरी  तो  मणी  लाल  पदार्था  जवळ  लाल  दिसतो,  परंतू  त्या  स्फटिक  मण्यास  कोणताच  रंग  नसतो,  तसेच  प्रकृतीच्या  त्रिगुणांमुळे  आत्मा  निर्गुण  असून  ही  गुणयुक्त  भासतो.  तो  आत्मा  सुख-दुःखाचा  भोग  घेत  असल्याचा  भास  होतो.  तसेच  त्या  आत्म्याचा  शरीराशी  संबंध  आल्यामुळे  कर्माचा  अहंकार  होतो.  त्यामुळे  कर्मबंधन  भोगावे  लागते.  याच  कर्मबंधनामुळे  जन्ममरणाच्या  दुष्टचक्रामध्ये  तो  जीव  प्रलया  पर्यंत  अडकतो.  या  सृष्टीच्या  प्रलयकाळामध्ये  सुध्दा  त्या  जीवाचा  अज्ञानाने  कर्तेपणाचा  अहंकार  टिकून  रहातो.  जेव्हा  नविन  सृष्टीची  रचना  होते  तेव्हा  तो  जीव  कर्मबंधनाच्या  गती  नुसार  जन्मास  येतो.  त्या  जीवास  प्रारब्धानुसार  कधीतरी  महापुरूषांचा  सत्संग  मिळतो.  तेव्हा  त्या  जीवास  श्रीहरिकथा  ऐकल्यामुळे  आत्मज्ञान  प्राप्त  होते.  तेव्हा  तो  जीव  शरीरातून  मुक्त  होतो.  त्यास  परमात्मा  स्वरूपाचे  ज्ञान  प्राप्त  होते.  हेच  या  विश्वाचे  एकमात्र  परमसत्य  आहे.  जो  मनुष्य  या  उपदेशाचे  चिंतन,  मनन   स्मरण  करतो,  त्यास  शरीराचा  अहंकार  होत  नाही.  म्हणून  तू  सुध्दा  या  आत्मज्ञानाच्या  उपदेशाचे  श्रध्देने  चिंतन,  मनन   स्मरण  निरंतर  कर.  त्यामुळे  तू  कर्मबंधनातून  मुक्त  होशील. या  उपदेशाचे   वाली  पत्नी  तारा  हीने  रात्रं-दिवस  निरंतर  स्मरण  केले.  कालांतराने  तीचा  देहाभिमान  नष्ट  होऊन  तीला  आत्मसाक्षात्कार  झाला    ती  मुक्त  झाली.

No comments:

Post a Comment