भागवतातील श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान
श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान चिरकालीन आहे. कारण
ते या विश्वाच्या
परमसत्याचे आहे. ते
तत्त्वज्ञान श्रीकृष्णाच्या काळामध्ये अनुकरणीय होते आणि
आज सुध्दा सुमारे
पाच सहा हजार
वर्षांनतर सुध्दा अनुकरणीय
आहे. तसेच ते
फक्त श्रीकृष्णाच्या अनुयायांसाठीच आहे असेही
नाही कारण ते
तत्त्वज्ञान श्रीकृष्णाने जरी त्याच्या
अनुयायांना सांगितले असले तरी
ते अखिल मानवांसाठी
आहे. ज्याने मनुष्य
देह धारण केला
आहे अशा सर्व
मनुष्यांसाठी आहे. अशा
रितीने श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान व्यापक आहे.
त्याला स्थळाचे, जातीचे, धर्माचे, वंशाचे, काळाचे कोणतेच
बंधन नाही. ते
सदा सर्वकाळ सर्वांसाठी आहे. ही
एक जीवन पध्दती
आहे. अखिल मानवांच्या
शांती, समाधानासाठी अत्यंत उपयुक्त
आहे. ते तत्त्वज्ञान
फक्त आस्तिकांसाठीच आहे, हिंदूंसाठीच
आहे, भक्तांसाठीच आहे, असे
कदापीही नाही. तर
ते अखिल मानवांसाठी
आहे. यामध्ये आत्मज्ञानाची ओळख आहे.
ही ओळख मनामध्ये
रूजल्यानंतर देहाची आसक्ती
कमी होते. जेव्हा
देहाचीच आसक्ती कमी
होते तेव्हा मान,
अ्पमान, गर्व, अहंकार,
क्रोध, मोह, मत्सर
सर्व काही देहाचे
विकार गळून पडतात.
हेच आजच्या भयाण
परिस्थितीचे मुळ कारण
आहे. आज आपण सर्वत्र पहातो आहे.
चोरी, दरोडे, खून,
मारामारी, जाळपोळ, हत्याकांड, सत्तेची हाव, भ्रष्टाचार,
स्त्रीयांवर अत्याचार, इत्यादी सर्व काही
अमानूष प्रकार देहाच्या
आसक्तीमुळेच होत आहेत.
हे दिव्य
तत्त्वज्ञान श्रीकृष्णाने संक्षेप्तामध्ये भागवत पुराणातील
दहाव्या स्कंधामध्ये तर विस्ताराने
उध्दवाला सांगितल्याचा उल्लेख अकराव्या
स्कंधामध्ये पहायला मिळतो.
जेव्हा श्रीकृष्णाने आपल्या दिव्य
शरीरासहीत स्वधामगमन करण्याचा संकल्प केला
तेव्हा आपल्या संपुर्ण
यदुवंशाचा ब्राह्मण शापाने संहार
करवून घेतला. परंतू
केवळ एकट्या उध्दवास
आपल्या या तत्त्वज्ञानाचा
प्रसार करण्यासाठी बद्रीनाथ क्षेत्री सुरक्षित ठेवले. या
तत्त्वज्ञानाला उध्दव गीता
असेही म्हणतात. या तत्त्वज्ञानाचा
त्यानंतर सुमारे पाच
सहा हजार वर्षांच्या
कालखंडामध्ये अनेक विचारवंतांनी
अभ्यास केला त्याचे
आचरण करण्याचा प्रयत्न केला आणि
आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतला.
अलिकडच्या काळामध्ये संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी
या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी
भागवत पुराणातील अकराव्या स्कंधाचे निरूपण करून
एकनाथी भागवत हा
ग्रंथ लिहून या
तत्त्वज्ञानाचा प्रसार मराठी
भाषेमध्ये केलेला आहे.
कारण हे श्रीकृष्णाचे
तत्त्वज्ञान संस्कृत भाषेमध्ये आहे. याच
एकनाथी भागवताची तुकाराम महाराजांनी एक हजार
पारायणे केली असा
उल्लेख रामचंद्र कामत यांनी
संपादित केलेल्या सार्थ एकनाथी
भागवत या मध्ये
केलेला आहे. तसेच
आजच्या काळातील पावसचे परम
पूजनीय स्वामी स्वरूपानंदांचे
शिष्य स्वामी विद्यानंद
यांनी या भागवताच्या
सर्वव्यापी तत्त्वज्ञानाचा मागोवा घेऊन
त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला
व तेच तत्त्वज्ञान
आजच्या काळाला पचेल
रूचेल व अंगी बाणता येईल
असे सुगम सोपे
करून सांगितले आहे. भावार्थ
श्रीमत् भागवत या
पुस्तकामध्ये स्वामी विद्यानंद
म्हणतात - नाथ भागवत हा
ग्रंथ तत्त्वज्ञानाचे विवेचन करणारा
श्रेष्ठ, मंगल, तेजस्वी,
महाज्ञानी तसेच कोणत्याही
काळामध्ये व विश्वाच्या
कोणत्याही क्षणी प्रबोधनकारक,
चिरंजीव स्वरूपाचा आहे. तसेच
भागवताच्या सूक्ष्म अभ्यासाने माझ्या जीवनाला
फार सुंदर वळण
लागले असे संत
वाङमयाचे थोर अभ्यासक
प्रा. के. वि.
बेलसरे आपल्या भावार्थ
भागवत या पुस्तकात
म्हणतात - विसाव्या
शतकातील मानव समाजापुढे
जी समस्या उभी
आहे तिचे उत्तर
शोधून काढण्याच्या प्रयत्नातून भावार्थ भागवत तयार
झाले.
भगवत् गीतेतील
अर्जुनाला सांगितलेले तत्त्वज्ञान अनेक जणांना
माहीत आहे. म्हणून
हे भागवत पुराणातील
तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.
तसेच हे तत्त्वज्ञान
आज रोजच्या दैनंदीन जीवनामध्ये आचरणात आणता
येते आणि त्यामुळे
मनुष्य जीवनाचा उध्दार होतो
हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
कारण धर्मशास्त्र वाचणायांपेक्षा, ते समजणायांपेक्षा,
त्या धर्मशास्त्राचे आचरण करणारे
सर्वश्रेष्ठ आहेत असे
मनुस्मृतिमध्ये बाराव्या अध्यायातील श्लोक क्रमांक
१०३ येथे सांगितले
आहे. अज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठा ग्रन्थिनःभ्योधारिणोवराः । धारिभ्यो
ज्ञानिनः श्रेष्ठाज्ञानिम्योव्यवसायिनः ।।१२.१०३।। --- मनुस्मृति
या विश्वातील सर्व प्राणी
आपापल्या कर्माप्रमाणे जन्माला येतात आणि
जन्मभर ज्याप्रमाणे कर्म करतात
त्याप्रमाणे त्यांना मरणानंतर गती मिळते.त्या
कर्मा नुसार त्यांना
सुखदुःख प्राप्त होतात. मनुष्य
आपल्या पुर्व कर्मांच्या,
संस्कारांच्या आधीन आहे.
पुर्व संस्कार चांगले असतील
तर उत्तम शरीर
प्राप्त होते तर
पुर्व संस्कार वाईट असतील
तर हलके शरीर
प्राप्त होते अशा
रितीने कर्म हाच
मनुष्याचा गुरू तसेच
ईश्वर आहे. म्हणून
मनुष्याने पुर्वजन्मीच्या कर्म संस्काराप्रमाणे
मिळालेल्या वर्णानुसार स्वधर्माचे आचरण करून
प्रत्येकाच्या कर्माचा आदर करावा.
ज्यामुळे मनुष्याचे जीवन सूरळीत
चालते तोच त्याचा
इष्ट देव आहे.
जसे विवाहीत
स्त्री आपला लग्नाचा
पती शिवाय इतर
पुरूषांची सेवा करते
तीला कधीही शांती
मिळत नाही. तसेच
जो मनुष्य आपले
इष्टदेव सोडून दुसया
देवाची उपासना करतो
त्याला कधीही सुख
मिळत नाही. (भागवत
१०.२४.१९)
श्रीकृष्णाने हे तत्त्वज्ञान
आपल्या पित्यासमान नंदराजाला सांगितले आहे. इंद्राची
पूजा करण्याची प्रथा चूकीची
आहे हे त्याने नंदराजाला
तसेच सर्व गोकुळवासींना
समजावून सांगितले आहे. आपण
जे काही कर्म
करतो ते समजून
उमजून करावे हे
महत्वाचे तत्त्व आजच्या
दैनंदीन व्यवहारामध्ये सुध्दा भयंकर
महत्वाचे आहे. कारण
समजून उमजून केलेले
कर्म अंधश्रध्दा रहित बुध्दिने
व कार्यक्षमतेने केले जाते.
मनुष्य जीवन हा
एक जन्मापासून मरणा पर्यंतचा
अखंड प्रवास आहे.
जेव्हा आत्मज्ञान मिळविण्याची तीव्र जिज्ञासा,
तळमळ असते तेव्हा
मनुष्य जन्म प्राप्त
होतो परंतू मनुष्य
जन्म प्राप्त झाल्यानंतर मायेच्या असंख्य प्रलोभनामुळे
तो मनुष्य त्या
मायेमध्येच गुंग होतो.
तरीसुध्दा लाखामध्ये एखादा जिज्ञासू
मायेचा त्याग करून
आत्मज्ञान प्राप्त करून घेतो.
मनुष्य अनुभवातून शिकतो. हे
कर्मच त्याला शिकविते
काय करावे आणि
काय करू नये.
धर्मशास्त्राच्या अभ्यासाचे कर्म करून
मनुष्याला आत्मज्ञान होऊ शकते.
स्वधर्माचे आचरण सोडून
स्वार्थाने परधर्माचे आचरण सुरू
झाले आणि समाज
व्यवस्थेची अधोगती सुरू
झालेली आहे. जेव्हा
कोणतेही कर्म करताना
कमीपणा कींवा मोठेपणा
मानला जातो व त्या कर्मामध्ये
स्वार्थ भूमिका असते
तेव्हा कलह निर्माण
होतो. ब्राह्मणाने ब्राह्मण-कर्मा बरोबर स्वार्थी
हेतूने ज्ञानाचा व्यापार केला तर
ब्राह्मण-कर्माचे पावित्र्य संपून शिक्षणाचा
खेळखंडोबा होतो. क्षत्रियाने
क्षत्रिय कर्मा बरोबर
स्वार्थी हेतूने रक्षणाचा
व्यापार केला तर
क्षत्रिय-कर्माचे पावित्र्य संपून संरक्षणाची
शक्ती कमी होते.
वैश्याने वैश्य कर्मा
बरोबर स्वार्थी हेतूने व्यापार
केला तर वैश्य-कर्माचे
पावित्र्य संपून व्यापाराची
कार्यक्षमता कमी होते.
शूद्राने शूद्र कर्मा
बरोबर स्वार्थी हेतूने सेवाभावाचा
व्यापार केला तर
शूद्र-कर्माचे पावित्र्य संपून सेवाभाव
वृत्ती संपते हेच
आजच्या भयाण परिस्थितीचे
मूळ कारण आहे.
ज्या भिन्न भिन्न
व्यक्तींचा समाज बनतो
त्या व्यक्तींच्या भिन्न भिन्न
शारिरीक, मानसिक, बौध्दिक, शक्ति व
कर्तृत्व यांचा पुर्ण
विचार करून या
संस्कृतीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व
शूद्र या चार वर्णांची व्यवस्था केली आहे.
समाजाची प्रगति, उध्दार व्हायचा
असेल तर त्या
करिता समाज हितबुध्दिने
प्रेरित झालेला निःस्वार्थी,
ज्ञान-विज्ञानाची उपासना करणारा
बुध्दिमान विचारवंतांचा वर्ग, बलोपासना
करून परचक्र व
समाज कंटक यापासून
समाजाचे संरक्षण करण्यास सदैव सज्ज
असा वीरवृत्ति लोकांचा शासक वर्ग,
कृषि-व्यापार व इतर आर्थिक व्यवहार
यांची दक्षतेने जोपासना करून समाजाच्या
योगक्षेमाची काळजी घेणारा
असा संपत्तीचा उत्पादक वर्ग, आणि
समाजाच्या उपयोगी अशी
इतर कार्ये शारिरीक
श्रम करून पार
पाडणारा सामान्य जनांचा वर्ग
अशा स्थूलमानाने विभागलेल्या चार व्यावसायिक
वर्गाची समाजाला आवश्यकता आहे. ही
सनातन सामाजिक गरज लक्षात
घेऊन चार वर्ण
व्यवस्था केली आहे.
ही वर्ण व्यवस्था
गुणकर्मांचा विचार करून
व्यक्तीचे सामाजिक स्थान निश्चित
करते परंतू जन्मानुसार
वर्णआश्रम व्यवस्था आपल्या धर्मशास्त्रामध्ये
अजिबात नाही. दुर्दैवाने
ती नंतर जन्मानुसार
झाली याचे कारण
व्यावहारीक सोय हेच
आहे. जन्मल्याबरोबर मुलाचे गुण-कर्म
कसे ओळखायचे आणि जर ओळखता आले
नाही तर त्याचे
संस्कार कोणत्या वर्णांनुसार करायचे. केवळ याचमुळे
वर्णंव्यवस्था जन्मानुसार झाली. परंतू
धर्मशास्त्रास हे मान्य
नाही. मनुष्याचा वर्ण त्याच्या
जन्मानुसार ठरवून त्याचे
संस्कार त्या वर्णांनुसार
करायचे ही प्रथा
रूढ झाली परंतू
पुढे त्याच्या विकसित गुण-कर्मानुसार
वर्ण बदलण्याची प्रथा रूढ
झाली नाही. त्याचमूळे
आज वर्णंव्यवस्थेवर टीका होते.
तरी ही चूक आता लक्षात
घेऊन स्वधर्माचे आचरण करून
समाजाची प्रगती करणे
महत्वाचे आहे. समाज
परिपुर्ण समृध्दतेने वैभव संपन्न
व्हायचा असल्यास त्यासाठी कोणताही एक वर्ग
तेव्हढाच असणे उपयोगाचे
नाही. समतेचे गोंडस
रूप धारण करणारी
स्वतंत्रता-समता-बंधुता ही फ्रॆंच
राज्यक्रांतीतून जन्माला आलेली समाजव्यवस्था
ऐकावयाला आकर्षक वाटत
असली तरी शेवटी
रक्ताचे पाट वाहविण्यास
कारणीभूत झाली. रोमन
साम्राज्याचा नाश वर्णसंकरामुळेच
झाला असे वा.
दा. तळवळकर चातुर्वर्ण्य
या पुस्तकात सांगतात. तर वर्णसंकरामुळे
अमेरिकन लोकांचा बुद्ध्यांक उणावत जात
आहे असे एका
जपानी विचारवंतांनी केलेल्या चाचणी मध्ये
स्पष्ट झाले आहे.
भौतिक समृध्दीसाठी एकवर्णात्मक समाजरचना उपयुक्त नाही असे
जस्टिस वुड्राफ, रोमारोला, जॉॅर्ज डवुर्ड,
मेरिडीथ टाऊनशेड, पेट्रिक गेडेस, व्हि.ए.स्मिथ,
सिडने ला, हेन्रॣ
कॉटन अशा अनेक
पाश्चात्य समाजशास्त्राच्या विचारवंतांचे मत असून
चार वर्ण व्यवस्थेचा
त्यांनी गौरव केलेला
आहे.
जो मनुष्य
प्रेम केल्यावर प्रेम करतो
त्याचे प्रेम स्वार्थी
असते त्या प्रेमामध्ये
फक्त व्यवहार असतो. त्यामध्ये
प्रेमभावना नसते आणि
धर्माचरण नसते. केवळ
अपेक्षा असते. परंतू
जो मनुष्य प्रेम
न करणायावर ही प्रेम
करतो त्याचे प्रेम
निस्वार्थ असते त्या
प्रेमामध्ये धर्माचरण व प्रेमभावना
असते. श्रीकृष्णाची भक्ती करणायांची
भक्ती वाढावी, दृढ व्हावी
याकरिता श्रीकृष्ण भक्तांना अधूनमधून दर्शन देतो.
जसे निर्धन मनुष्याला
अफाट संपत्ती मिळाली आणि
अचानक गायब झाली
तर त्याचे सर्व
चित्त त्या संपत्तीकडेच
सतत चिंतीत होते.
त्या संपत्तीचाच एक सारखा
ध्यास लागतो. गोपी
व
श्रीकृष्ण यांचे मीलन
हे आत्म्याचे व परमात्म्याचे
मीलन आहे. म्हणून
ते पवित्र, निर्मल व
निरंतर निदर्ोष आहे. श्रीकृष्ण
सर्वांचा आत्मा आहे.
तो सर्व प्राणिमात्रांमध्ये
सुक्ष्मरूपाने स्थित आहे.
जसे या विश्वातील
सर्व भौतिक वस्तू, आकाश, वायु, अग्नि,
जल व पृथ्वी
या पंचमहाभूतांनी बनलेल्या आहेत. तसेच
मनुष्यातील मन, प्राण,
पंचमहाभूते, इंद्रिय व त्यांचे
भोगविषय यांचा आश्रय
श्रीकृष्ण आहे. त्या
सर्व वस्तुंमध्ये तोच आहे.
आणि त्या सर्व
वस्तू त्याच्यामध्येच आहेत. इतकेच
नव्हेतर त्या वस्तूंमधूनच
श्रीकृष्ण प्रकट होत
असतो. मनुष्याच्या शरीरातील प्राणरूपी आत्मा शुध्द
ज्ञानस्वरूप असून तोच
परमात्म्याचा अंश आहे.
प्रकृतीच्या त्रिगुणांचा त्या आत्म्यावर
काहीही परिणाम होत
नाही. ही प्रकृती
त्रिगुणात्मक मायारूपी विश्व रचना
स्वप्नाप्रमाणे भासमान आहे.
जसे नदी इकडे
तिकडे वर खाली
फिरून शेवटी समुद्रामध्ये
एकरूप होते. त्याचप्रमाणे
मनुष्य वेदांचा अभ्यास, योगसाधना, तपस्या, आत्मसाक्षात्कार करून शेवटी
परमात्म्यामध्ये एकरूप होतो.
प्रेमी प्रियकरापासून शरीराने दूर गेला
तरी मनाने खूप
जवळ असतो. परंतू
जेव्हा शरीराने ते दोघे
जवळ असतात तेव्हा
ते मनाने एकरूप
असतीलच असे नाही.
म्हणून विरहामध्ये सतत एकसारखे
चिंतन होते.
श्रीकृष्णाने हे तत्त्वज्ञान
महारास क्रिडेनंतर गोपींना सांगितले आहे. प्रेमाचा,
भक्तीचे मर्म साध्या
शब्दांमध्ये स्पष्ट केले
आहे. आपण रोजच्या
व्यवहारामध्ये हेच पहातो.
बालक जन्मल्या नंतर आई
त्याचे पालन पोषण
निस्वार्थपणे करते कारण
तेव्हा ते मूल काहीच करीत
नसते. परंतू मुलगा
मोठा झाल्यावर आईची त्याने
वृध्दापकाळी सेवा करावी
म्हणून ती मूलावर
प्रेम करते तेथे
स्वार्थी भावना असते
मूलाने प्रेम केले
तरच ती त्याच्यावर
प्रेम करते. शेवटी
प्रेम करणे म्हणजे
सेवा करणे हेच
होय. प्रेम हे
सेवेतूनच व्यक्त होत
असते. प्रेमामध्ये शारिरीक मिलनापेक्षा आत्मिक, चित्ताचे मिलन खरे
आहे. शुध्द आहे.
कारण शारिरीक मिलन क्षणिक
असते तर चित्ताचे
मिलन निरंतर असते.
प्रियकराचे मन जाणणे,
त्याला काय पाहीजे
हे तो न सांगता समजले
पाहीजे याला खरे
प्रेम म्हणतात. अशा निस्वार्थ
प्रेमाची आज नितांत
गरज आहे. त्यामुळे
आपापसातील द्वेष, मत्सर
कमी होईल. आज
प्रेम हा शब्द
फक्त तरूण तरूणींच्या
लग्नाच्या आधी होणाया
संबंधापर्यंतच सिमीत झालेला
दिसून येतो. आई-मुलाचे
प्रेम, वडील-मूलीचे प्रेम, आजीआजोबा-नातवांचे
प्रेम, मित्रांचे प्रेम, आज
क्वचीतच पहायला मिळते.
या विश्वामध्ये
जे काही मनाने
विचार केले जाते,
वाणीने बोलले जाते,
डोळ्याने पाहिले जाते,
कानाने ऐकले जाते
तसेच इतर इंद्रियांनी
अनुभवले जाते ते
सर्व नाशीवंत आहे. स्वप्नासारखी
ती मनाची कल्पना
आहे. म्हणून ते
मायारूप आहे. खोटे
आहे. ज्याचे मन
चंचल आहे त्याला
अनेक वस्तू माहीत
होतात. वस्तुतः हा मनाचा
खेळ आहे. अनेक
तत्त्वांचा भ्रम झाल्यामुळे
गुणदोष अशी कल्पना
करावी लागते. ज्याच्या
बुध्दीमध्ये हा गुण दोषाचा भेद
दृढ झाला आहे.
त्याच्यासाठी कर्म, अकर्म
व विकर्म हा
भेद सांगितला आहे.म्हणून सर्व इंद्रियांना
व चित्ताला नियंत्रित करून असा
अनुभव करावा की
सर्व विश्व आपल्या
आत्म्यामध्ये परमात्म्यामध्ये व्यापलेले आहे. निश्चयरूप
ज्ञान व अनुभवरूप
विज्ञानाने संपन्न होऊन
आपल्या आत्म्याच्या अनुभूतीमध्ये आनंदी रहाणे.
हेच वेदांचे तात्पर्य आहे. त्या
अवस्थेमध्ये कोणत्याही विघ्नाने दुःख होणार
नाही कारण त्या
विघ्नाचे आणि विघ्न
करणाराचे आत्मा आपल्या
आत्म्यामध्ये एकरूप झालेले
असतात. तसेच तो
सर्व प्राण्यांचा हितचिंतक असल्यामुळे सर्व प्राण्यांमध्ये
तो परमात्म्याचे स्वरूप पहातो.
म्हणून त्याला जन्ममरण
मुक्ती मिळते. प्रत्येक
मनुष्याचा आत्मा त्याचे
हित व अहित सांगणारा गुरू आहे
कारण हित व अहित याचा
निर्णय करण्यास तो पुर्णपणे
समर्थ आहे. त्याच
आत्म्यामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार होतो. म्हणून
शरीराचा अहंकार सोडावा.
शरीराचा अहंकार धरल्यास
अनेक इच्छा कर्म
सुरू होतात इंद्रियांचे
असंख्य विषयांचे सेवन सुरू
होते.जसे एका मनुष्याच्या
अनेक स्त्रिया त्यास आपल्याकडे
आकर्षित करण्याचा प्रत्येक स्त्री प्रयत्न
करीत असते. मनुष्याच्या
शरीरात असलेला आत्मा
शरीरात राहून भिन्न
आहे. जसे जळणाया
लाकडाने निर्माण होणारा अग्नी
व प्रकाश भिन्न
आहे. तो आत्मा
स्वंयप्रकाशित असून ज्योतिर्मय
आहे. जसे लाकूड
जळताना अग्नी त्या
लाकडाचे गुण ग्रहण
करतो परंतू लाकडाच्या गुणाचा अग्नीशी
काहीच संबंध नाही.
तर अग्नी हा
स्वतंत्र आहे. तसेच
जेव्हा आत्मा शरीरास
आपले मानतो तेव्हा
शरीराचे विकार त्याला
संयुक्त होतात. परंतू
आत्मा हा भिन्न
आहे. त्याचा शरीराशी
काही संबंध नाही.
या जन्ममृत्युरूप संसाराचे एकच मूळ
कारण आहे ते म्हणजे या
परमसत्याचे अज्ञान होय.
सत्व, रज, आणि
तम हे तीन गुण शरीरातील
इंद्रियांना कर्म करण्यास
प्रवृत्त करतात. तर
मनुष्य त्या इंद्रियांनाच
आपले स्वरूप समजतो
व त्यांनी केलेल्या कर्माची फळे सुख
दुःखे भोगतो. जोपर्यंत
गुणांमध्ये विषमता आहे
आणि शरीराचा अहंकार आहे
तो पर्यंत परमात्म्याची
अनुभूती येत नाही.
परंतू ज्ञानी पुरूष
या सर्व विषयां
पासून विरक्त असतात.
खाणे पिणे, पहाणे,
वास घेणे, चालणे
फिरणे, बसणे झोपणे
या सर्व क्रियांचा
कर्ता आपण नाही
हे समजून ते
ज्ञानी पुरूष गुणांनाच
कर्ता मानतात. म्हणून त्यांना
कर्माची फळे बाधत
नाहीत. ते प्रकृतीमध्ये
राहून सुध्दा असंग
असतात. जसे सुगंधामध्ये
वायु असून सुध्दा
तो स्वतः अलिप्त
आहे. या अलिप्ततेच्या
भावनेने ते ज्ञानी
पुरूष सर्व संशय
दूर करतात. जसे
कोणी स्वप्नातून जागा होतो
त्या प्रमाणे या भेद बुध्दीच्या भ्रमातून ते मुक्त
असतात. त्याच्या शरीरास कोणी
कष्ट दिले तर
ते दुःखी होत
नाहीत तर कोणी
त्यांची पूजा केली
तरी ते सुखी
होत नाहीत. ते
चांगले काम करणायाची
स्तुती करीत नाहीत.
तर वाईट काम
करणायाची निंदा करीत
नाहीत. कोणाची चांगली
गोष्ट ऐकून त्याचे
कौतुक करीत नाहीत.
तर वाईट गोष्ट
ऐकून त्याचा तिरस्कार
करीत नाहीत.
या विश्वाचा
कर्ता करविता कोण
आहे हे समजावून
घेऊन आपले खरे
स्वरूप ओळखावे त्यामुळे
देहाचा अहंकार नष्ट
होतो. आणि परमात्म्याशी
एकरूप होता येते.
या तत्त्वाचे आज रोजच्या
दैनंदीन व्यवहारामध्ये आचरण केले
तर वैयक्तीक पातळीवर आत्मज्ञानाची जाण होऊन
मनःशांती निरोगी शरीर
सुख समाधान मिळेल.
कौटुंबिक पातळीवर कुटूंबातील प्रत्येकाचे जीवन सुखी
समृद्ध होइल. लहान
मुलांचे संस्कार त्याच वातावरणात
चांगले होतील. सामाजीक
पातळीवर एका नवीन
समृद्ध समाजाची निर्मीती होइल.ज्या समाजातील प्रत्येकाची वैचारीक क्षमता उदार,
विशाल आहे. राष्ट्रीय
पातळीवर प्रत्येकामध्ये विश्वबंधुत्वाची भावना निर्माण
होइल. जी आजच्या
काळाची खरी गरज
आहे. ही विश्वबंधुत्वाची
भावना नुसतीच धोरणे
जाहीर करून होत
नसते. त्यासाठी प्रत्येकाच्या हृदयी विश्वबंधुत्वाची
खरी तळमळ असावी
लागते. अशा रितीने
या विश्वाचे परमसत्य श्रीकृष्णाने उध्दवाला समजावून सांगितले आहे.
ज्या परमात्म्याचे
अप्रत्यक्षपणे वर्णन केले
जाते तो अप्रत्यक्ष
नसून साक्षात आणि प्रत्यक्ष
आहे. कारण तोच
परमात्मा सर्वांना स्फुर्ती, जीवनदान देणारा आहे.
तो प्रथम परा
वाणीने प्राणासह मनुष्य देहातील
मुलाधार चक्रामध्ये प्रवेश करतो.
त्यानंतर मणिपूर चक्रामध्ये
पश्यंती वाणीने सुक्ष्मरूप
धारण करतो नंतर
कंठामध्ये येऊन विशुध्द
चक्रामध्ये मध्यमा वाणीने
व्यक्त होतो नंतर
मुखाने वाणीतून स्वर वर्णाने
व्यक्त होतो. या
प्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या
हाताने काम करणे,
पायाने चालणे, मलमूत्र
त्यागणे, वास घेणे,
पहाणे, ऐकणे, बसणे,
चालणे, मनाने संकल्प
विकल्प करणे, बुध्दिने
विचार करणे, अहंकाराने
विचार करणे अशा
सर्व कर्मांचा कर्ता, कारण
व कर्म ही
त्या परमात्म्याची अभिव्यक्ती आहे. तोच
या सर्व विश्वाचे
कारण आहे. तो
प्रथम एक असून
अव्यक्त होता. कालगतीनुसार
मायेच्या आधाराने तो असंख्य
रूपामध्ये व्यक्त झाला.
जसे एका बीजापासून
मोठा वृक्ष निर्माण
होतो आणि त्या
बीजाचे सत्व त्या
संपुर्ण वृक्षामध्ये सर्व ठिकाणी
सामावलेले असते तसेच
हा परमात्मा संपुर्ण विश्वामध्ये सुक्ष्मरूपाने स्थित आहे
तरी सुध्दा तो
स्वतः वेगळाच आहे.
तो स्वतंत्र आहे. या
विश्वाच्या आधी परमात्मा
होताच परंतू परमात्म्या
शिवाय या विश्वाला
अस्तित्व नाही. जसे
सुताच्या वस्त्रामध्ये सूत असते
सूताशिवाय वस्त्राला अस्तित्व नाही. परंतू
वस्त्राशिवाय सूत हे स्वतंत्र आहे.
या विश्वातील
सर्व प्राणिमात्रांच्या ठीकाणी परमात्मा
अंशरूपाने कसा स्थित
असतो हे तत्त्व
श्रीकृष्णाने उध्दवाला समजावून सांगितले आहे. तो
परमात्मा प्रत्येक प्राणिमात्रांतून कसा व्यक्त
होतो हे शास्त्रशुध्दतेने
स्पष्ट केले आहे.
हे तत्त्व आज
मनुष्याने जाणून घेतले तर अहंकार कमी
होण्यास मदत होईल.
हा अहंकारच सर्व दुःखाचे
मूळ काण आहे.
मी हे करतो,
हे माझे आहे
हा अहंकार संपून
हे संपूर्ण विश्वातील कार्य प्रत्येकाकडून
तोच परमात्मा करवून घेत
आहे हेच खरे
ज्ञान आहे. सूक्ष्मरूपाने
परमात्मा आपल्या हृदयात
मेंदूला सूचना देतो.
मेंदू शरीराच्या अवयवांना कृती करण्यास
सांगतो. तो प्राणरूपी
परमात्मा आहे म्हणून
मनुष्याला अस्तित्व आहे. तो
प्राण गेल्यावर निर्जीव प्रेत फक्त
उरते. ते चैतन्य
मनुष्यामध्ये आहे म्हणून
सजीवता आहे.
सत्व, रज,
तम हे तीन गुण प्रकृतीचे
आहेत सत्वगुणाने रज व तम या दोन्ही गुणांना
नियंत्रित केले पाहिजे.
निरंतर सात्विक उपासना केली
तर सत्वगुणांची वृध्दी होते
ज्या धर्माच्या आचरणाने सत्वगुणांची वृध्दी होते
तो श्रेष्ठ धर्म आहे.
तो धर्म रजोगुणाला
व तमोगुणाला नष्ट करतो.
शात्र, पाणी, प्रजा,
देश, काळ, कर्म,
जन्म, ध्यान, मंत्र
व संस्कार या गोष्टी
जर सात्विक असतील तर
सत्वगुणांची वृध्दी होते
परंतू याच गोष्टी
जर राजसिक असतील
तर रजोगुणांची वृध्दी होते
आणि त्या गोष्टी
जर तामसिक असतील
तर तमोगुणांची वृध्दी होते
यामध्ये ज्ञानी पुरूष
ज्याची प्रशंसा करतात ते
सात्विक आहे. तर
ते ज्याची निंदा
करतात ते तामसिक
आहे. आणि ते ज्याचा तिरस्कार करतात ते राजसिक
आहे. जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही
तसेच शरीराची व त्रिगुणांची
निवृत्ती होत नाही
तोपर्यंत सत्वगुणांच्या वृध्दीसाठी सात्विक उपासना करीत
रहावे. त्यानेच धर्माची वृध्दी होऊन
अंतःकरणाची शुध्दी होते
तेव्हा आत्मतत्वाचे ज्ञान होते.
या भागवतधर्माचे
तत्त्वज्ञान प्रथम परमात्म्याने
ब्रह्मदेवाला सांगितले त्याने आपला
ज्येष्ठ पुत्र मनुला
सांगितले, त्यानंतर मनुने ऋषींना
सांगितले त्या ऋषींनी
आपापल्या बुध्दी नुसार
हे तत्त्वज्ञान ग्रहण केले
कारण प्रत्येकाचा स्वभाव सत्व,
रज, तम हे तीन गुणांनुसार
भिन्न भिन्न आहे.याप्रमाणे
प्रत्येकाच्या उपदेशामध्ये फरक असल्याने
एकच तत्त्वज्ञान अनेक प्रकारचे
झाले. त्या उपदेशानुसार
त्यांची विचार बुध्दीसुध्दा
भिन्न भिन्न झाली.
म्हणून आत्मज्ञानाचे साधनमार्ग अनेक झाले.
मनुष्याच्या कल्याणासाठी भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग हे तीन मार्ग आहेत.
याशिवाय कोणताही अन्य मार्ग
कल्याणाचा नाही. जो
मनुष्य कर्म व कर्मफळामध्ये अनासक्त आहे व ज्याने कर्माचा
त्याग केलेला आहे
तो ज्ञानयोगाचा आधिकारी असतो ज्याच्या
चित्तामध्ये कर्माचे व कर्मफळाचे
वैराग्य नाही तो
सकाम मनुष्य कर्मयोगाचा
आधिकारी असतो जो
मनुष्य कर्मामध्ये विरक्त नाही
तसेच आसक्त नाही
व ज्यास परमात्म्याच्या
लीलांमध्ये श्रध्दा असते तो
भक्तीयोगाचा आधिकारी असतो. भक्तीयोग
- प्रथम श्रीकृष्णाच्या
कथेमध्ये अढळ श्रध्दा
ठेऊन श्रीकृष्णलीला संकीर्तन करावे श्रीकृष्णाच्या
विग्रहमूर्तीचे पूजन एकनिष्ठेने
करावे. स्तोत्रांद्वारे श्रीकृष्णाची स्तुती करावी.
पूजेमध्ये निरपेक्ष प्रेम असावे.
श्रीकृष्णाच्या भक्तांची पूजा अजून
जास्त भक्तीभावाने करावी. सर्वांप्रती
श्रीकृष्णाचेच रूप पहाण्याचा
ध्यास करावा. आपल्या
सर्वांगाने श्रीकृष्णाची पूजा करावी.
सर्वस्व श्रीकृष्णास समर्पित करावे. श्रीकृष्णासाठी
सर्व भौतिक वस्तुंचा
त्याग करावा. रोज
केलेली सर्व कर्मे
श्रीकृष्णास अर्पण करावीत.
तसेच रोज करावी
लागणारी सर्व कर्मे
श्रीकृष्णासाठीच करावीत. अशा रितीने
श्रीकृष्णाची भक्ती केल्याने
त्या भक्ताच्या हृदयामध्ये श्रीकृष्णाची प्रेममयी भक्ती उदयास
येते.
भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग हे तीन उपासनेचे मार्ग शेवटी
एकाच ध्येयाकडे जातात इतकेच
नाहीतर परमात्मा प्राप्तीचे ध्येय मिळविण्यासाठी,
साध्य करण्यासाठी हे मार्ग
एकमेकास पूरक आहेत.
अगदी साधे उदा.
गुरूभक्ती - भक्तीमध्ये
सेवा म्हणजेच कर्म आणि
ज्ञान असल्याशिवाय कर्म करू
शकत नाही. काय
सेवा करायची याचे
ज्ञान असेल तरच
सेवा करता येते.
हे ज्ञान प्रेमाने
समजते. ज्ञानाने श्रध्दा प्राप्त होते. निष्काम
कर्माने भक्ती होते.
असे हे भक्ती
ज्ञान कर्म जेव्हा
एकरूप होतात तेव्हाच
अंतिम ध्येय प्राप्ती
होते. अशा सोप्या
शब्दांमध्ये श्रीकृष्णाने उध्दवाला भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग मार्ग समजावून
सांगितले आहेत. तसेच
सत्वगुणांची वृध्दी, रजोगुणांची वृध्दी आणि
तमोगुणांची वृध्दी होते
कधी होते हे
स्पष्ट करून दिले
आहे. जेव्हा प्रजा
शुभ मुहूर्तावर धर्मशास्त्रांचे अध्ययन-अध्यापन, घ्यान उपासना
सत्वगुणयुक्त म्हणजे निरपेक्ष,
सपर्पण वृत्तीने केले तरच
सत्वगुणांची वृध्दी होते
परंतू हेच कर्म
जर वेळी अवेळी
रजोगुणयुक्त म्हणजे केवळ
प्रतिष्ठेसाठी, समारंभपुर्वक अहंकार वृत्तीने
केले तर रजोगुणांची
वृध्दी होते. तसेच
कर्म जर तमोगुणयुक्त
म्हणजे आळशी वृत्तीने,
दिरंगाईने, केव्हाही, अनियमितपणे केले तर
तमोगुणांची वृध्दी होते.
हेच आपण आज अनुभवतो आहे. आज
सर्व धार्मिक अनुष्ठाने सुध्दा मोठ्या
उत्सव थाटामध्ये होतात. त्यामुळे
रजोगुणी अहंकार वाढतो.
आणि मुळ उद्देश
आत्मसाक्षात्कार साध्य होत
नाही. कर्माचे आचरण ज्या
गुणांनी युक्त असेल
तशीच वातावरण निर्मिती होणार हाच
सिध्दांत समजून घेण्याची
वृत्ती आज नष्ट
होत चालली आहे.
म्हणून आपण जे कर्म करतो
त्यामागची भावना काय
आहे याचा विचार
केला पाहिजे.
शम, दम,
तपस्या, पवित्रता, संतोष, क्षमा,
सरलता, परमात्म्यावर श्रध्दा, दया या स्वभावाच्या मनुष्याला ब्राह्मण म्हणतात तेज,बल,धैर्य, वीरता, सहनशीलता,
उदारता, स्थिरता, ब्राह्मणभक्ती या स्वभावाच्या
मनुष्याला क्षत्रिय म्हणतात अस्तिकता, उद्योगशीलता, ब्राह्मणभक्ती, धनसंचयवृत्ती या स्वभावाच्या
मनुष्याला वैश्य म्हणतात
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची
निष्कपटसेवा, त्याच्या कडून मिळेल
त्यात संतुष्ट, विनम्रता, सहनशीलता अशा स्वभावाच्या
मनुष्याला शूद्र म्हणतात
यज्ञोपवीत संस्कारानंतर गुरूकुलामध्ये राहून मुलांनी
वेदाध्ययन करावे, मौनव्रताने
गुरूसेवा करावी. गायत्री
उपासना करावी. विद्या
पुर्ण संपादन केल्यानंतर
गुरूंच्या इच्छेप्रमाणे गुरू दक्षिणा
द्यावी त्यानंतर विवाह करून
गृहस्थाश्रमाचे कर्तव्य पुर्ण करावे
अनासक्त वृत्तीने धर्माचरण करावे. त्यानंतर
वानप्रस्थ आश्रम स्विकारून
वानप्रस्थाचे धर्माचरण करावे. फक्त
कंदमूळे व फळे याच अन्नाचे
ग्रहण करून वृक्षांच्या
पानांची कुटी करून
रहावे. आत्मानुभूतीचा ध्यास धरावा
व नंतर देहाचा
अहंकार कमी करून
त्याचा त्याग करावा.
वानप्रस्थाचे व्रताचरण अंगीकारून बारा वर्षे
झाल्यावर संन्यासाश्रम ग्रहण करावा.
धर्माचरण करून सतत
भ्रमण करावे. एकांतात
आत्मसाक्षात्काराच्या अनुभूतीमध्ये सदैव मग्न
रहावे. कठोर तपसाधना
करून देह त्याग
करावा.
ब्रह्मचर्याश्रमाचा मुख्य धर्म
गुरूसेवा, गृहस्थाश्रमाचा मुख्य धर्म
प्रपंचनिर्वाह, वानप्रस्थाश्रमाचा मुख्य धर्म
तपस्या तर संन्यासाश्रमाचा
मुख्य धर्म परमशांती
आहे.
वर्णाश्रमाचे हे मूळ तत्त्व श्रीकृष्णाने
उध्दवाला समजावून सांगितले आहे. त्याचप्रमाणे
चारही वर्णांची कार्यक्षेत्रे स्वतंत्र पण इतर वर्णांना पूरक व पोषक आहेत,
त्याच्यातसुध्दा श्रेष्ठ व कनिष्ठ
असे काही असू
शकत नाही. जसे
मनुष्य शरीराच्या एका अवयवाने,
हाताने दुसया अवयवाचे
पायाचे चालण्याचे कार्य करणे
अशक्य आहे नव्हेतर
हाताने चालण्यास सुरवात केली
तर तो मनुष्य
पशू होतो. तसेच
वर्णांचे आहे. त्याचे
परिणाम समाज विघातक
आहेत. मनुष्याच्या प्रवृत्ती-गुण व कर्म यांवरून त्याचा वर्ण
निश्चित होतो. आश्रम
व्यवस्थेचे नियम याप्रमाणे
सांगितले आहेत. ब्रह्मचर्याश्रमी
गुरूकुलामध्ये राहून छत्तीस
वर्षांपर्यंत ब्राह्मणाने ब्रह्मचर्य व्रताने तीन वेदांचे
अध्ययन करावे. शरीर-मन-बुध्दि
यांच्या शुध्दिसाठी इंद्रियसंयमन करून तपाची
वृध्दि करावी. क्षत्रियाने
शस्त्रविद्येचे शिक्षण घ्यावे.
त्यानंतर आपापल्या वर्णाची शुभलक्षणयुक्त कन्येस पत्नी
स्विकारून गृहस्थाश्रमाची कर्तव्ये निष्कामतेने करावी. वेदांचे
अध्यापन करावे, पितरांचे
श्राध्द करावे, देवतांसाठी
हवन करावे, प्राणिमात्रांना
अन्नदान करावे, अतिथीचे
स्वागत करावे, गृहस्थाश्रम
इतर तिन्ही आश्रमवासींना
शरीरांस आवश्यक अन्न
पुरवून सांभाळतो, त्यामूळे ब्रह्मचारी, संन्यासी, ज्ञानाची उपासना करू
शकतात. नातवंडे झाल्यावर, त्वचेला सुरकूत्या पडल्यावर वानप्रस्थ आश्रम स्विकारून
इंद्रिय-नियंत्रण करून, फलाहाराने,
अरण्यात वृक्षछायेमध्ये निवास करावा,
आत्मज्ञानाचेच ध्येय ठेऊन
यथावकाश देहत्याग करावा, मृत्युसमयी
परमात्म्याचे चिंतनाने मोक्ष मिळतो.
धैर्य, क्षमाशीलता, विनयता, परद्रव्याचा निर्लोभ, शुध्दता, पवित्रता, इंद्रियनिग्रह, विवेक, आत्मज्ञान,
सत्य, व अक्रोध
यांच्या नित्य आचरणाने अंतःकरणी
शांत, समाधानी होउन, सर्व
ऋणमुक्त होउन, संन्यास
घ्यावा. संन्यासाश्रमी मौनव्रताने आत्मानंदाचा अनुभव घेत
रहावा. निस्पृहतेने नित्यकर्मे करून यथावकाश
देहत्याग करावा. असे
अनेक बारीक सारीक
विषय सविस्तरपणे सांगितले आहेत. आज
यातील कोणत्याही तत्त्वाचे आचरण दिसत
नाही म्हणूनच आजची परिस्थिती
भयाण झाली आहे.
आज ब्रह्मचर्य व्रताने ज्ञान संपादन
केले जात नाही.
आज मुलामुलींचे शिक्षण एकत्र
चालू आहे त्याचे
परिणाम आज दिसून
येत आहेत. त्यामूळे
खरे आत्मज्ञान तर होत नाहीच परंतू
लैगीक ओढ वाढत
जाते. पुढे गृहस्थाश्रमाची
कर्तव्ये माहीत नसल्यामुळे,
आत्मज्ञान नसल्यामुळे, आणि फक्त
पैसा मिळविण्याचे शिक्षण घेतल्यामुळे
कोणत्याही मार्गाने पैसा मिळविणे
हे एकच ध्येय
दिसून येत आहे.
त्यानंतर मरेपर्यंत विषयांचा उपभोग घेणे
हेच मनुष्यजन्माचे सार्थक दिसते.
त्यामुळे आत्मज्ञान होत नाही
आणि त्याचमुळे अफाट पैसा
मिळवून सुध्दा सुख
मिळत नाही. पैशाने
सोन्याचा पलंग मिळविता
येतो परंतू झोप
मिळविता येत नाही.
पैशाने सर्व काही
मिळत नसते हे
अजून सुध्दा उमजत
नाही.
बुध्दि श्रीकृष्णा
विषयी चिंतन करू
लागली त्याला शम
म्हणतात. सर्व इंद्रियांचे
विषयांपासून संयमित होणे
त्याला दम म्हणतात.
न्यायाने दुःख सहन
करण्याला तितीक्षा म्हणतात. जिभेवर व
काम वासनेवर नियंत्रण मिळविणे त्याला धैर्य
म्हणतात. कोणाचाही तिरस्कार न करता सर्वांना निर्भयता देणे त्याला
दान म्हणतात. सर्व इच्छांचा
त्याग करणे त्याला
तप म्हणतात. आपल्या सर्व
वासनांवर नियंत्रण मिळविणे त्याला शूरता
म्हणतात. सर्व ठीकाणी
सत्यरूप परमात्म्याचे दर्शन होणे
त्याला परमसत्य म्हणतात. कर्मामध्ये आसक्त न
होणे त्याला शौच
म्हणतात. सर्व इच्छांचा
त्याग करणे त्याला
संन्यास म्हणतात. धर्म हेच
मनुष्याचे अभिष्ट धन
आहे. ज्ञानाचा उपदेश देणे
त्याला दक्षिणा म्हणतात. प्राणायाम हे श्रेष्ठ
बल आहे. श्रीकृष्णाची
भक्ती हा उत्तम
लाभ आहे. ज्या
विद्येने ब्रह्म व
आत्मा यातील भेद
संपतो ती खरी विद्या आहे.
पाप करण्याचा तिरस्कार होणे त्याला
लाज म्हणतात. सुख दुःखाची
भावना सर्वथा नष्ट
होणे त्याला सुख
म्हणतात. तर विषयभोगाची
कामना होणे त्याला
दुःख म्हणतात. जो कर्मबंधनाचे
व मोक्षाचे तत्त्व जाणतो
त्याला शम म्हणतात.
शरीराला मीपणा समजणारा
मूर्ख आहे. ज्याच्या
चित्तामध्ये समाधान नाही
त्याला दरिद्री म्हणतात. गुणदोषांकडे लक्ष जाणे
हा सर्वात मोठा
दोष आहे तर गुणदोषांकडे लक्ष न जाता ते
चित्त आत्म्यामध्ये स्थिर होणे
हा सर्वात मोठा
गुण आहे.
श्रीकृष्णाने येथे शब्दांच्या
व्याख्या देउन स्पष्टीकरण
केले आहे. तितीक्षा
म्हणजे दुःख सहन
करण्याची सहनशिलता हा सद्गुण
आहे. परंतू ते
दुःख अधर्माने असेल तर
ते सहन करू
नका असेच श्रीकृष्णाला
सांगायचे आहे. तेथे
सहनशिलता हाच अधर्म
होईल म्हणून श्रीकृष्णाने
सांगितले जर धर्माने,
न्यायाने जर दुःख
मिळाले तरच ते सहन करावे
अन्यथा त्याचा प्रतिकार
करावा. कारण तेथे
विरोध केला नाही
तर अधर्माची शक्ती वाढते.
तसेच धैर्यवान कोणाला म्हणायचे
तर ज्याने अनेक
संकटांवर मात केली
आहे तो नव्हेच
तर ज्याने काम
वासना आणि जिभ
संयमित केली आहे.
म्हणजे त्याचे बोलणे
आणि खाणे,पिणे नियंत्रित आहे. पुढे
सांगतात संपत्तीचा, अन्नाचा, भूमीचा, राज्याचा, भरपूर दानधर्म
केला तरी ते दान नाही
असे स्पष्ट केले
आहे. तर मग सर्व प्राणिमात्रांच्या
सुरक्षिततेचा विश्वास समाजामध्ये निर्माण करणे यालाच
दान म्हणतात. असंख्य वीरांना
युध्दामध्ये ठार मारले
म्हणजे तो शूरवीर
अजिबात नाही तर
ज्याने इंद्रियांच्या विषयभोग वासनांवर अंकूश ठेवला
आहे तोच खरा
शूर आहे. या
विश्वामध्ये सत्य काय
आहे हे विश्व
दिसते म्हणून ते
सत्य आहे का,
तर
हा सर्व भास
आहे. महामाया आहे. केवळ
एकच परमात्मा सत्य आहे
बाकी सर्व दिसते
ते सर्व भासमान
आहे. परंतू या
विश्वामध्ये प्रत्येक ठिकाणी तो
सुक्ष्मरूपाने स्थित आहे.
त्याला सर्वत्र पहाणे हेच
परमसत्य सांगितले आहे. वनामध्ये
जाऊन राहिला, कंदमूळे खाऊ लागला,
भगवी वस्त्रे परिधान केली,
म्हणजे संन्यास नाही तर
सर्वस्वाचा त्याग म्हणजे
संन्यास आहे. कीती
सुंदर शब्दांमध्ये मतीतार्थ सांगितला आहे. आज सर्वजण
पैशाच्या मागे लागले
आहेत. परंतू मनुष्याचे
इष्ट धन हे पैसा नाही.
कारण पैशाने अहंकार
वाढतो आणि तो सुरक्षित ठेवण्याची चिंता वाढते.
त्याने शांत झोप
सुध्दा लागत नाही.
झोप येण्यासाठी मग कृत्रीम
उपचार करावे लागतात
जे मनुष्याच्या आरोग्याला घातक आहेत.
त्यामुळे शरीराची, मनाची विकृती
निर्माण होते. या
विकृतीमुळेच आजची भयाण
परिस्थिती दिसून येत
आहे. म्हणून धर्माचे
आचरण हेच मनुष्याचे
इष्ट धन सांगितले
आहे. त्यामुळे धर्माचे अध्ययन होते.
आज हेच कोणालाच
नको आहे. कारण
त्यांना धर्माचे आचरण करायचे
नसून त्या धर्माचे
भांडवल करून केवळ
स्वार्थ साधायचा असतो. या
विचार सरणीतून निर्माण होणारा समाज
किती विघटत होत
जाईल हे प्रत्यक्षामध्ये
आज आपण अनुभवतो
आहे. दक्षिणा कशाला म्हणतात
हे ब्राह्मण कर्मामध्येच अनुस्युत आहे. तसेच
दुसया अर्थी शिष्याने
गुरूला दक्षिणा द्यायची म्हणजे त्याने
हे ज्ञान त्याच्या
शिष्यांना द्यायचे आहे. परंतू
हेच आज आपण विसरलो आहे.
पैसे घेऊन विद्या
देणे यामुळे त्या
विद्येचे पावित्र्य संपते. कारण
त्या विद्येचे आचरण होत
नाही. कारण शास्त्रांमध्ये
पैसे न घेता विद्या देणे
असे सांगितले आहे. म्हणजे
पैसा न घेता विद्या शिकवावी
असे पैसे घेऊन
शिकवायचे हे कीती
परस्पर विरोधी आहे.
याचा विचार आज
केला जात नाही.
असा रितीने विद्येतील
पावित्र्य निघून गेल्यामुळे
त्या विद्येने अंतिम उद्दीष्ट
प्राप्त होत नाही.
आणि जीवन व्यर्थ
वाया जाते. आज
असा खोलवर विचार
केला गेला पाहीजे.
हा विचार करण्याची
तिव्र इच्छा निर्माण
झाली पाहिजे. परंतू आज
सर्वांना पैशे कसे
जास्तीत जास्त मिळविता
येतील याची तिव्र
इच्छा निर्माण झालेली आहे.
प्राणायामाचे महत्व आजच्या
विज्ञानाने सुध्दा मान्य
केले आहे. प्राणायामाने
मनुष्य शरीरातील प्राण शक्ती
कार्यक्षमतेने कार्यरत होते. त्यामुळे
आरोग्य उत्तम रहाते.
जसे सीर सलामत
तो पगडी पचास
त्याच प्रमाणे जर शरीर
सूदृढ असेल तरच
सर्व कार्य शक्य
आहेत. मनुष्य जन्माचे
सार्थक श्रीकृष्णाची प्राप्ती
हे असल्यामुळे त्याची भक्ती
करणे हेच मनुष्य
जन्माचे मुख्य कर्तव्य
आहे. अफाट संपत्ती
मिळाली, भरपूर नावलौकीक
मिळाला तरी तो उत्तम लाभ
नाही असे स्पष्ट
केले आहे. मनुष्याचे
ध्येय परमात्मा प्राप्ती आहे. हेच
ध्येय साध्य करणारी
विद्या ही खरी विद्या असे
नमूद केले आहे.
रामदासस्वामी दासबोधामध्ये सांगतात --
एक ज्ञानाचे
लक्षण । ज्ञान
म्हणिजे आत्मज्ञान । पाहावे
आपणासि आपण । या नाव ज्ञान ।।५.६.१।।
जव ते ज्ञान नाही
प्रांजळ । तव सर्व काही
निर्फळ । ज्ञानरहित
तळमळ । जाणार
नाही।। ५.५.१।।
बहुत केले
विद्या पठण । संगीतशास्त्र राग ज्ञान
। वैदिकशास्त्र वेदाधेन । हेहि ज्ञान नव्हे
।। ५.५.४।।
आदि करूनि।
चौसष्ट कळा । याहि वेगळ्या
नाना कळा। चौदा
विद्या सिध्दि सकळा।
हे ज्ञान नव्हे
।।५.५.३१।।
असो सकळ
कळा प्रविण ।
विद्या मात्र परिपूर्ण
। तरी ते कौशल्यता परी ज्ञान
। म्हणोचि नये ।। ५.५.३२।।
इच्छेेमध्येच सुखदुःख आहे ती इच्छा पुर्ण
झाली तर सुख मिळते आणि
ती इच्छा अपुर्ण
राहीली तर दुःख
मिळते त्यातूनच षडविकारांचे चक्र सुरू
होते. याचेच येथे
विडंबन केले आहे
कोणतीही अपेक्षा करू नये.
इच्छेतून विषय चिंतन
- आसक्ती - वासना
- क्रोध -
अविवेक - भ्रांती
- विस्मृती - बुध्दीनाश
निर्माण होते म्हणून
इच्छेचाच त्याग केल्यावर
खरे सुख मिळते.
तसेच या विरूध्द
जेव्हा विषय भोगाची
इच्छा होते त्यालाच
दुःख म्हणले आहे.
आत्मस्वरूपाचे विस्मरण करून जो
शरीराचा अहंकार करतो
तो मूर्ख आहे
असा आवर्जून उल्लेख केला
आहे. म्हणून आज
हे मुख्य आत्मस्वरूपाचे
जीवनमूल्य अवगत झाले
तर आजच्या समाजातील
प्रत्येकाचा देहाभिमान संपून आज
भेडसावणाया सर्व समस्या
संपुष्टात येतील. आजच्या
सर्व समस्या देहाशी
निगडीत आहेत. देहाभिमानाचा
विसर झाल्यावर एकात्मतेची भावना निर्माण
होइल. मुख्य म्हणजे
मृत्युचे भय रहाणार
नाही. कारण मृत्यु
हा देहाचा आहे.
आणि आपले खरे
स्वरूप देह नसून
आत्मा आहे. हे
जाणून घेतले पाहीजे.
यातच खरा शहाणपणा
आहे. तुकाराम महाराज म्हणतात
-- ठेविले अनंते
तैसेचि रहावे चित्ती
असु द्यावे समाधान
त्याप्रमाणे कशाचाच लोभ
नसावा कारण त्याला
अंत नाही. एक
लाख रूपये मिळाल्या
नंतर दहा लाख
कसे मिळतील त्यानंतर
एक कोटी नंतर
दहा कोटी याला
अंत नाही. लोभी
मनुष्याचे समाधान कधी
होतच नाही त्याला
दरीद्री म्हणले आहे.
तो जरी कोट्याधीश
असला आणि समाधानी
नसेल तर तो दरिद्रीच आहे. अनेक
तत्त्वांचा भ्रम झाल्यामुळे
गुणदोष अशी कल्पना
मनामध्ये केली जाते.
नंतर सवयीने तो
बुध्दीमध्ये हा गुण दोषाचा भेद
दृढ होतो हाच
दोष आहे. परंतू
याच्या विरूध्द जेव्हा मनुष्याचे
चित्त एकाग्रतेने सदैव परमात्म्यामध्ये
स्थिर होते हा
सर्वात मोठा सदगूण
आहे. हेच जीवनमूल्य
आज दैनंदीन व्यवहारामध्ये आचरणात आणले
तर कोणीच कोणाचा
द्वेष, मत्सर करणार
नाही. म्हणून या
तत्त्वाचे आचरण करण्याने
मनुष्याचे कल्याणच होणार आहे.
समाधान शांती लाभणार
आहे. हे समजून
घेतले पाहीजे. आज आपण या महत्वाच्या
गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहे.
म्हणूनच मनुष्यजीवन उध्वस्त झाले आहे.
कारण कोणत्याही गोष्टीचा खरा अर्थच
समजला नाही तर
ती गोष्ट यथार्थ
साधली जाणार नाही
आणि त्या गोष्टीचा
लाभ तरी कसा
मिळणार.
जेव्हा मनुष्य
उद्विग्न, विरक्त होतो
तेव्हा त्याने योगामध्ये
स्थिर होऊन आत्म्याच्या
अनुसंधानाने आपले मन
परमात्म्यामध्ये स्थिर करावे.
ते मन चंचलतेने
स्थिर होत नसेल
तर त्याला सावधतेने,
समज देऊन शांत
करणे. मनाला क्षणभर
सुध्दा चंचल होऊ
देऊ नये. हे
मन कर्माच्या आधीन असते.
कर्मसंस्काराने ते प्रेरीत
झालेले असते. क्षणोक्षणी
ते मन अनेक
प्रकारचे विषयभोगांचे विचार करीत
असते. जसे घोडेस्वाराला
घोडा आपल्या नियंत्रणामध्ये
ठेवण्यासाठी घोड्याला गोंजारावे लागते त्या
प्रमाणे मनाला चांगल्या
गोष्टी सांगून शांत
करावे. हाच परमयोग
आहे. या मनाला
आत्मस्वरूपामध्ये तल्लीन करावे
यामुळे मनाची चंचलता
संपून मन शांत
होते. अष्टांगयोगाच्या अभ्यासाने आत्मविद्येने व धर्मनिष्ठेने
हे मन परमात्म्याचे
चिंतन करू लागते
हाच एकमेव उपाय
आहे. ते मन पाहिलेल्या व ऐकलेल्या
विषयांचे चिंतन करते
आणि क्षणामध्ये त्या विषयामध्ये
तल्लीन होते. आणि
आधीच्या विषयाचे विस्मरण करते. आत्म्याच्या
अज्ञानामुळे होणारा गुणदोष
भेदभाव हा केवळ
मनाचा भ्रम आहे.
सर्व धर्माचरणाचे अंतिम उद्दिष्ट
एकच आहे ते म्हणजे मन
एकाग्र होणे. ज्याचे
मन शांत आहे
त्याला सर्व कर्माचे
फळ मिळाल्यासारखे आहे.परंतू ज्याचे मन
चंचल आहे त्याला
कोणत्याही कर्माचा लाभ होत
नाही. सर्व इंद्रिये
मनावर अवलंबून आहेत परंतू
मन हे स्वतंत्र
आहे. हे मन खूप शक्तीशाली
आहे हे मन बाहेरच्याच नव्हेतर आतल्या हृदयातील
मर्मस्थानावर वेध घेते.
ते मन शांत
करणे अत्यंत अवघड
आहे. मनुष्याला कोणीही सुख
दुःख देत नाही
तो केवळ त्याच्या
मनाचा भ्रम आहे.
एखाद्या वस्तुच्या विषयांमध्ये गुणांची प्रशंसा केल्यामुळे त्या वस्तुमध्ये
आसक्ती निर्माण होते. त्यामुळे
ती वस्तु आपल्या
जवळ असावी अशी
इच्छा होते. ती
वस्तु मिळाली नाही
तर संताप होतो
राग येतो. क्रोधामध्ये
ज्ञानाचा बोध होत
नाही. विवेकबुध्दि स्थिर नसते.
अज्ञानावस्थेमुळे माणुसकी ची मुल्ये
नष्ट होऊन तो
मनुष्य पशू प्रमाणे
आचरण करू लागतो.
मन हेच परमार्थाचे साधन आहे
हे तत्त्व श्रीकृष्णाने
उध्दवाला समजावून सांगितले आहे. मनुष्याचे
मन अतिशय चंचल
आहे. क्षणामध्ये ते साता
समुद्रापलिकडे जाऊ शकते.
म्हणून या मनाला
नियंत्रणामध्ये ठेवणे अत्यंत
आवश्यक आहे. तसेच
त्याला आत्मोध्दाराच्या कार्यामध्ये गुंतवून ठेवले पाहिजे.
कारण मनाला विषय
नसला म्हणजे ते
आत्मघातकी विचार करू
लागते. त्यातून तसेच आचरण
होते. आणि या मनामुळे मनुष्याचा आत्मघात होऊ शकतो.
या मनाचा स्वभाव
खरोखर चंचलच आहे
परंतू याला वैराग्याच्या
आधाराने अभ्यासाच्या रस्त्याला लावले तर
काही काळाने हे
स्थिर होईल कारण
मनाच्या ठिकाणी एक
चांगला गुण आहे
तो म्हणजे त्या
मनाला एकदा अनुभविलेल्या
सुखाची गोडी लागली
की त्याची मनाला
चटक लागते. हे
मन वासनामय, विषयासक्त त्रिगुणांनी प्रेरित होऊन शरीरामध्ये
भावनात्मक कार्य करते
सुखदुःखाची धारणा करते
या मनासाठी रामदास स्वामींनी
एक दोन नाही
तर २०५ मनाचे
श्लोक लिहिले आहे
म्हणून हे मन घातकी कसे
आहे, चंचल आहे
हे ओळखून रहावे
त्याला वळण लाऊन
स्थिर करावे. तसेच
आज असंख्य भोगसाधने
उपलब्ध असल्यामुळे मोठा गोंधळ
होतो. या विवंचनेमुळे
तो वैतागून गेला आहे.
शांती समाधानासाठी तो मंदिरामध्ये
- आश्रमामध्ये जातो. परंतू
तेथे सुध्दा संपुर्ण
शांती समाधान दिसत
नाही. ही परमशांती
कोठे मिळेल याचा
तो शोध घेऊ लागतो.
त्यासाठी आत्मज्ञानाचा शोध हा रामबाण उपाय
आहे. परमसत्याचे प्रतिपादन आध्यात्मिक प्रवचने, किर्तने, व्याख्याने यामध्ये सुध्दा विशेष
दिसत नाही. त्याला
कारण एकतर वक्त्याला
परमसत्याचे ज्ञान नसते
व श्रोत्यांना मनोरंजनाची आवड असते,
कींवा वक्त्याला परमसत्याचे ज्ञान असते
तर श्रोत्यांना परमसत्याची जिज्ञासा नसते. परंतू
आज समाजाला परमसत्याची जाणीव करून
देणे खूप आवश्यक
आहे.
वेद ही परमात्म्याची वाणी आहे.
त्या वेदांमध्ये कर्म, उपासना
व ज्ञान अशी
तीन प्रकरणे आहेत. या
तिन्ही प्रकरणामध्ये ब्रह्म आणि
आत्म्यांची एकरूपता हाच विषय
प्रामुख्याने परंतू रूपकात्मकतेने
सांगितलेला आहे. मंत्राच्या
शब्दार्थामध्ये हा अर्थ
प्रतीत होत नाही
परंतू भावार्थामध्ये हा विषय
ज्ञानीजनांना समजतो. जसे
कमळामध्ये नाजूक केसर
असतो त्याप्रमाणे ही वेदवाणी
सर्व प्राणिमात्रांच्या अंतःकरणामध्ये अनाहत नाद
रूपाने प्रकट होते.
वेदवाणीतील मतीतार्थ कोणाला समजतो
हे तत्त्व श्रीकृष्णाने
उध्दवाला समजावून सांगितले आहे. सागराच्या
खोलीचे ज्ञान केवळ
मंदराचल पर्वतालाच होऊ शकते;
त्याप्रमाणे जो मनुष्य
आपली तपस्या आणि
प्रज्ञाबळ या दोन्ही
साधनांनी वेद आराधनेमध्ये
एकरूप होतो त्यालाच
वेदांचा गहन अर्थ
समजतो, उमजतो. इतरांना
हा गहन अर्थ
उमजणे अत्यंत कठीण
आहे. ज्याप्रमाणे गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाचे विश्वरूप पहाण्यासाठी दिव्यदृष्टी धारण करावी
लागली त्याचप्रमाणे वेदवाणी समजण्यासाठी मनाची विशालता,
व्यापकता अत्यावश्यक आहे.
शरीराच्या गर्भाधान, गर्भवृध्दि, जन्म, बालपण,
कुमारवस्था, तरूणपण, उत्तरावस्था, वृध्दपण, व मृत्यु
या नऊ अवस्था
आहेत. परंतू या
सर्व अवस्थांचा साक्षी आत्मा
या सर्व अवस्थांहून
भिन्न आहे. जसे
शेत मजूर गहू
पेरतो, ते उगवल्यावर
त्याची मशागत करतो,
व ते पीक पुर्ण झाल्यावर
ते कापतो. हे
सर्व साक्षी भावाने
जमीनदार पहात असतो
तो वेगळाच असतो.
आत्मा अव्यक्त
आणि तो व्यक्त
होण्यासाठी आकाराची कल्पना हे
तत्त्व श्रीकृष्णाने उध्दवाला समजावून सांगितले आहे.
आत्मा नित्य,
अविनाशी, शूध्द, एक,
क्षेत्रज्ञ, आश्रय, निर्विकार,
स्वयंप्रकाशित, आदिकारण. व्यापक, असंग व आवरण रहित
आहे. शरीर हे
आत्म्यास प्रकट होण्याचे
एक साधन आहे.
कारण आत्मा अव्यक्त
आहे. त्याला प्रकट
होण्यासाठी साधनाची गरज असते.
जसे मनुष्यशरीर, पशुशरीर, वृक्ष वेली
इत्यादी. जो आत्मा
मनुष्यशरीरात आहे तोच
आत्मा किडा-मुंगीमध्ये, हत्तीमध्ये झाडांमध्ये आहे. प्रकट
होण्यासाठी साधने वेगवेगळी
आहेत. ज्या प्रमाणे
सूर्यामधून निघालेली सूर्यकिरणे असंख्य ठीकाणी
एकाच प्रकारची असतात त्याप्रमाणे
सत्यरूप परमात्मा अंशरूपाने सर्व प्राणीमात्रांमध्ये
आत्मारूपाने स्थित असतो.
आत्मानुभव हा केवळ
दिव्य अनुभव आहे.
कारण हा अनुभव
इंद्रियातीत, त्रिगुणातीत आहे. कारण
इंद्रिये आणि त्रिगुण
प्रकृती हे शरीराशी
संबंधीत आहे. तर
आत्मा निर्गुण, निराकार, अव्यक्त व अविनाशी
आहे. तसेच तो
परमात्मा सर्व प्राणीमात्रांमध्ये
आत्मारूपाने स्थित असला
तरी तो मात्र
सर्वांहून भिन्न असून
पुर्णतः अलित आहे.
आत्मघातकी विषयभोगामध्ये आसक्त होऊ
नये. आत्म्याच्या अज्ञानामुळे होणारा गुणदोष
भेदभाव हा केवळ
मनाचा भ्रम आहे.
कोणी अपमान केला,
मान पकडून घराबाहेर
काढले, तिरस्कार केला, निंदा
केली, संपत्ती लुटली, अंगावर
थूंकले, मलमूत्र टाकले, धर्मनिष्ठा
घालविण्याचा प्रयत्न केला तरी
कोणत्याही उपद्रवाने क्रोध करू
नये. कारण ते
बिचारे अज्ञानी आहेत. त्यांना
ते काय करतात
याची विवेकबुध्दि नाही. तरी
या सर्व कठीण
प्रसंगांमध्ये आत्म्याशी एकरूप होऊन
देहा विषयी त्रयस्थ
भूमिका अंगिकारावी. आत्मदृष्टी ही सर्व
आपत्तीवर रामबाण उपायकारी
आहे.
श्रीकृष्णाचा मनोविकारांवर विलक्षण ताबा होता.
शीघ्रकोपी दुर्वासांना घरी आतिथ्य
देऊन त्यांनी काहीही केले
तरी राग आणायचा
नाही असे एकदा
श्रीकृष्णाने कबूल केले
होते. दुर्वासांनी कृष्णाला राग येण्यासाठी
अनेक आत्यंतिक प्रयोग केले
परंतू कृष्णाने सर्वकाही सहन केले
इतकेच नव्हे तर
प्रिय पत्नीचा जाहीर अपमान,
विटंबना सुध्दा सहन
केली तेव्हा दुर्वास
ऋषी म्हणाले,-- तू खरोखर
क्रोध जिंकला आहेस.
प्राणीमात्रांचे अन्नावर जितके प्रेम
असते तितके उत्कट
प्रेम तूला सर्वांच्या
कडून सर्वकाळ मिळेल. अशा
रितीने क्रोधावर ताबा मिळविता
आला पाहिजे. तसेच त्या
ठीकाणी सूड भावना
मत्सर सुध्दा असता
कामा नये असे
स्पष्ट केले आहे.
ही अवस्था प्राप्त
होण्यासाठी कर्मयोगाचे आचरण केले
पाहिजे. शरीरामध्ये आसक्ती नसावी.
कर्माचा अहंकार नसावा.
तसेच कर्मफळाची अपेक्षा नसावी. एव्हढेच
नाही तर केलेले
कर्म ईश्वरार्पण करावे म्हणजे
कर्मबंधन होत नाही.
मायेचे खरे स्वरूप
जाणल्यामुळे त्यामायेमध्ये आसक्ती रहात
नाही. हे साधे
तत्व आजच्या व्यवहारामध्ये
आचरणात आणले तर
आपली प्रगती एका
क्षणामध्ये होऊ शकते
कारण सर्वाचे मूळ कारण
देहाभिमान हेच आहे.
त्यातूनच वासनेच्या प्रतिकूलतेमध्ये क्रोध निर्माण
होतो. या क्रोधामध्येच
मनुष्य अविचाराने वागतो व
नंतर त्याची फळे
त्याला भोगावी लागतात.
सांख्ययोगाचे तत्त्वज्ञान सर्वार्थाने समजल्यावर मनुष्य भेदबुध्दिने
होणाया सर्व सुखदुःखांचा
त्याग करून आत्मस्वरूपामध्ये
एकरूप होतो. ब्रह्म
हे अद्वितीय परमसत्य आहे. मन
वाणी त्या ब्रह्मामध्ये
लीन होतात. त्या
ब्रह्मामध्ये पुरूष आणि
प्रकृती या दोन प्रवृत्ती आहेत पुरूष
ज्ञानस्वरूप आहे तर प्रकृती कार्यस्वरूप आहे. परमात्म्याच्याच
प्रेरणेने त्रिगुणात्मक क्रियाशक्तीने या विश्वाची
निर्मिती, भरण पोषण,
व संहार होतो.
या विश्वामध्ये प्रत्येक ठीकाणी परमात्माच
अंशरूपाने स्थित आहे.
व तोच या विश्वाचा कर्ता करविता
आहे. तो शाश्वत
आहे बाकी सर्व
नश्वर आहे. हेच
सांख्ययोगाचे सारतत्त्व आहे.जो मनुष्य
हे सांख्ययोगाचे तत्त्वज्ञान आत्मसात करतो त्याच्या
चित्तामध्ये या विश्वाचा
भ्रम होत नाही.
जसे सूर्योदयानंतर आकाशामध्ये अंधार रहात
नाही.
सांख्ययोगाचे हे तत्त्वज्ञान
श्रीकृष्णाने उध्दवाला समजावून सांगितले आहे. सृष्टीच्या
पुर्वी केवळ परमात्मा
होता. सृष्टीमध्ये जे जे दिसते तेथे
तेथे तो सुक्ष्मरूपाने
स्थित आहे. परमात्म्याशिवाय
जे जे दिसते
ते सर्व काही
परमात्म्याची महामाया आहे. सर्वत्र
परमात्मा आहे. तरीही
तो परमात्मा पूर्णतः अलिप्त आहे.
हे जाणून घेणे,
अनुभवणे, म्हणजेच सांख्ययोग होय असे
अगदी संक्षेप्तामध्ये स्पष्ट केले
आहे. सूक्ष्मरूपाने परमात्मा सर्व प्राणिमात्रांचे हृदयात
मेंदूला सूचना देतो
मेंदू शरीराच्या अवयवांना कृती करण्यास
सांगतो तो आहे म्हणून अस्तित्व
असते. नाहीतर निर्जीव
प्रेत होते. ते
चैतन्य आहे म्हणून
सजीवता आहे. ते
चैतन्य म्हणजेच परमात्मा आहे. हे
परमसत्य एकदा अनुभवता
आले तर आपला
अहंकार गळून पडतो.
तेव्हा उमजते आपण
खोटाच अहंकार करीत
होतो. आज कोणाचाच
कोणाला आदर नाही.
सर्वांनाच मी चा अहंकार झाला
आहे. आणि आज या अहंकारालाच
समाजामध्ये प्रतिष्ठा
प्राप्त झाली आहे
हे मोठे दुर्दैव
आहे. आणि त्यामूळेच
आजची भयंकर बिकट
परिस्थिती निर्माण झालेली आहे.
मनाचा संयम,
इंद्रियनिग्रह, सहनशीलता, विवेक, तप,
सत्य, दया, स्मृती,
समाधान, त्याग, श्रध्दा,
आत्मानुभूती, दान, विनयता,
साधेपणा हे सत्वगुण
आहेत. इच्छा, प्रयत्न,
अहंकार, ऐषराम, भेदबुध्दि,
विषयभोग, उत्साह, पराक्रम, उत्सवप्रिय हे रजोगुण
आहेत. क्रोध, लोभ,
व्यर्थ गप्पा, हिंसा,
याचना, श्रम, भांडणतंटा,
शोक, मोह, निंदा,
आशा, भीती, आळस
हे तमोगुण आहेत.
जेव्हा धर्माचरण ईश्वरार्पण बुध्दिने केले जाते
ते कर्म सात्विक
आहे. ज्या कर्मामध्ये
कोणत्यातरी फळाची अपेक्षा
असते ते कर्म
राजस आहे. आणि
ज्या कर्मामध्ये कोणाला तरी
त्रास देण्याची बुध्दि असते
ते कर्म तामस
आहे. शुध्द आत्म्याचे
ज्ञान सात्विक असते. त्या
आत्म्याला कर्ता भोक्ता
समजणे ते ज्ञान
राजस आहे. आणि
त्या आत्म्याला शरीर समजणे
हे तामस ज्ञान
आहे. तर परमात्म्याचे
ज्ञान निर्गुण ज्ञान आहे.
ते ज्ञान गुणातीत
आहे. वनामध्ये वास्तव्य सात्विक आहे. वस्तीमध्ये
वास्तव्य राजस आहे.
तर जुगारामध्ये वास्तव्य तामस आहे.
अनासक्तीने कर्म करणारा
सात्विक आहे. क्रोधाने
कर्म करणारा राजस
आहे. तर अविचाराने
कर्म करणारा तामस
आहे. अहंकार रहित
ईश्वरार्पण बुध्दिने कर्म करणारा
निर्गुण कर्ता आहे.
आत्मज्ञानावर श्रध्दा सात्विक आहे. तर
कर्मावर श्रध्दा राजस आहे.
आणि अधर्मावर श्रध्दा तामस आहे. ईश्वरसेवेवर
श्रध्दा निर्गुण आहे. आरोग्यदायी,
पवित्र व सहजप्राप्त
भोजन सात्विक आहे. रूचकर,
स्वादिष्ट भोजन राजस
आहे. तर उन्मादक,
अशुध्द आहार तामस
आहे. आत्मचिंतनाने मिळालेले सुख सात्विक
आहे. विषयभोगातून मिळालेले सुख राजस
आहे. अज्ञानातून मिळालेले सुख तामस
आहे. जे सुख परमात्म्यास मिळते ते
गुणातीत आहे. हे
सर्व विश्व त्रिगुणात्मक
आहे. परंतू परमात्मा
गुणातीत, निर्गुण आहे. त्रिगुणात्मक
प्रकृती नाशीवंत आहे तर परमात्मा शाश्वत आहे.
म्हणून सत्वगुणांची वृध्दि करून
सत्वगुणाने रज व तम गुणांना
नष्ट करावे. व
नंतर आत्मतत्त्वाने सत्वगुणास नष्ट करून
आत्मा परमात्म्यामध्ये समर्पित करावा.
ब्रह्मदेवापासून वृक्षवेलीं पर्यंत सर्व
प्राणीमात्रांचे शरीर पृथ्वी,
पाणी, अग्नी, वायु,
आकाश या पंच महाभुतांचेच बनलेले आहे.
तसेच या सर्वांच्या
ठीकाणी एकच परमात्मा
अंशरूपाने स्थित आहे.
तरी सुध्दा प्रत्येकाचा
स्वभाव वेगवेगळा आहे कारण
त्रिगुणात्मक प्रकृती सत्वगुणाचा, रजोगुणाचा व तमोगुणाचा
प्रभाव सिध्द करते.
शरीर व आत्मा
यामध्ये खूप फरक
आहे. हे विश्वरूप
विराटरूप तसेच मनुष्य
शरीर त्रिगुणात्मक मायेने बनलेले
आहे. ती प्रकृती
आपल्या सत्व, रज
व तमो गुणांनी
अनेक प्रकारची भेद वृत्ती
निर्माण करते.
त्रिगुणात्मक प्रकृतीचे हे तत्त्वज्ञान
श्रीकृष्णाने उध्दवाला समजावून सांगितले आहे. हे
सर्व विश्व त्रिगुणात्मक
प्रकृतीचेच बनलेले आहे.
सत्व, रज आणि तम हे ते तीन गुण आहेत.
या प्रत्येक गुणांची तत्वे सांगितली
आहेत. थोडक्यात सत्वगुण हा अहंकार
रहित असतो, रजोगुण
हा अहंकारयुक्त उत्साही असतो, तर
तमोगुण हा अहंकारयुक्त
शिथील असतो. या
तिन्ही गुणांच्या पलिकडे गुणातीत,
निर्गुण अशी संकल्पना
आहे. तो निर्गुण,
निराकार परमात्मा आहे. जसे
आत्मा दिसत नाही
तसेच परमात्मा दिसत नाही.
सात्विकगुणांची वृध्दी होण्यासाठी
कोणते कर्म कसे
करावे, त्यासाठी कोणत्या ज्ञानाची आवश्यकता आहे, वास्तव्य
कोठे करावे, श्रध्दा
कोठे व कशावर
ठेवावी, भोजन आहार
कसा असावा, सुख
कसे मानावे याची
माहीती स्पष्टपणे केली आहे.
तसेच काय केले
तर रजोगुणांची व तमोगुणांची
वृध्दी होते हे
सुध्दा सांगितले आहे. तर
त्या तिन्ही गुणांच्या
पलिकडे गुणातीत कींवा निर्गुणाची
सुध्दा माहीती सांगितली
आहे. या वरून
आजची परिस्थिती कशाने निर्माण
झाली आहे याचे
मूळ कारण समजून
येते. आज मनुष्यजात
पश्चिम दिशेकडे मोठ्या वेगाने
भोग संस्कृतीकडे चालली आहे
तेव्हा सनातन संस्कृतीचे
ज्ञान कसे होणार,
त्यासाठी विचारमार्ग योग्य दिशेने
झाले पाहिजेत. जोपर्यंत ज्ञान होत
नाही तोपर्यंत परमसत्याची अनुभूती येणार नाही.
जरी व्यवहारामध्ये
पुरूष व प्रकृती,
द्रष्टा व दृश्य
अशा दोन प्रकारामध्ये
प्रतीत होत असल्या
तरी परमार्थ दृष्टिने हे दोन्ही
प्रकार एकच आहेत.
म्हणून कोणाच्याही स्वभावा प्रमाणे होणाया कर्माची
निंदा तसेच स्तुती
सुध्दा करू नये.
निरंतर अद्वैत दृष्टिने
या विश्वाकडे पहावे. आणि
जो अशी निंदा
स्तुती करतो तो
या परमार्थ साधनेतून पदच्यूत होतो.कारण हे परमार्थ
साधन द्वैत मताचा
आणि त्याच्या सत्यतेच्या विचाराचा विरोध करते.तर
निंदा स्तुतीने द्वैत मताच्या
सत्यतेचा भ्रम आधिक
दृढ होतो. इंद्रियांद्वारे
होणारी सर्व कार्ये
रजोगुणी अहंकारयुक्त असतात. निद्रित
अवस्थेमध्ये इंद्रिये शांत असतात
त्यावेळी शरीराची स्मृती नसते.
जर मन जागृत
असेल तर स्वप्नामध्ये
ते रंगून जाते.
आणि जेव्हा मन
सुध्दा शांत असते
तेव्हा ते लीन होते. तसेच
जेव्हा आत्म्याला विसरून मनुष्य
इंद्रिय भोगामध्ये मग्न होतो
तेव्हा तो स्वप्नाप्रमाणे
या विश्वातील प्रसंगांमध्ये तल्लीन होते.
जेथे द्वैत नाहीच
तेथे ही वस्तु
चांगली, ती वस्तु
वाईट हा प्रश्नच
उद्भवत नाही. या
विश्वातील सर्व गोष्टी
शब्दातून व्यक्त होतात
कींवा मनाने विचार
केल्या जातात त्या
द्ृश्य आहेत म्हणून
नाशीवंत, अनित्य आहेत.
हे सर्व दिसणारे
विश्व हा मायेचा
भ्रम आहे. जोपर्यंत
आत्मज्ञान होत नाही
तोपर्यंत या भ्रमाची
निवृत्ती होत नाही
आणि तोपर्यंत त्यापासून मनुष्यास त्याचे कारण
परिणाम सहन करावे
लागतात. या विश्वामध्ये
जे काही प्रत्यक्ष
दिसते आणि विचार
करता येते ते
सर्व आत्मारूप आहे. तोच
परमात्मा आहे. तो
सर्व शक्तीमान आहे. या
विश्वसृष्टीचा तो निमित्त
कारण आहे. तोच
विश्व बनतो, बनवितो
आणि त्याचे भरणपोषण
करतो तसेच तोच
विश्व असल्यामुळे पोषण करून
घेतो. व्यवहार दृष्टिने जरी आत्मा
भिन्न असला तरी
आत्मदृष्टीने आत्म्याशिवाय या विश्वामध्ये
काहीही नाही. सर्व
ठीकाणी त्याचे सुक्ष्म
रूप आहे. हे
सर्व दिसणारे विश्व हा
मायेचा खेळ आहे.
जो मनुष्य हे
रहस्य जाणतो तो
कोणाचीच निंदा स्तुती
करीत नाही. तो
विश्वामध्ये सूर्याप्रमाणे सर्व ठीकाणी
समभाव ठेवतो. प्रत्यक्ष,
अनुमान, शास्त्र व आत्मानुभूती
या सर्व प्रकारांनी
हे सिध्द झालेले
आहे की हे विश्व उत्पत्ती
व प्रलयरूप असल्याने अनित्य व
असत्य मायारूप आहे. ही
गोष्ट पक्की लक्षात
ठेऊन या विश्वामध्ये
प्रत्येक ठीकाणी अनासक्त
भावनेने पहावे. या
विश्वाचे खरे अस्तित्व
नाही परंतू जोपर्यंत
देहाचा, इद्रियांचा आत्म्याशी असलेला संबंध
भ्रामक आहे तोपर्यंत
अविवेकी मनुष्याला हे विश्व
सत्यच भासते. जसे
स्वप्नामधील संकटे जरी
खोटी असली तरी
जागा होत नाही
तोपर्यंत ती संकटे
नष्ट होत नाहीत.
तसेच हे विश्व
नसले तरी त्या
विश्वातील विषयांचे चिंतन करणाया
मनुष्याचे जन्ममृत्युचे कालचक्र थांबत नाही.
स्वप्नातून मनुष्य जेव्हा
जागा होतो तेव्हा
त्याला स्वप्नामधील संकटांशी झुंज द्यावी
लागत नाही. तसेच
त्या संकटाने होणारा क्रोध
वगैरे सर्व काही
विसरून जाते. मनुष्याच्या
अहंकाराने शोक, हर्ष,
भिती, राग, द्वेष,
लोभ, मोह, तिरस्कार
आणि जन्ममृत्यु हे सर्व
निर्माण होते. जेव्हा
मनुष्य आपल्या इंद्रियरूपी
शरीराला आपले स्वरूप
मानतो तेव्हा तो
कालरूपी जन्ममृत्युच्या बंधनामध्ये इकडे तिकडे
भरकटत असतो. वस्तुतः
विवेकी मनुष्य उपासनेने
ज्ञान संपादन करून
देहाच्या अहंकाराचे निर्मुलन करून अद्वैत
बुध्दिने परमात्म्यामध्ये समर्पित होतो. आत्मानुभूतीचा
साक्षात्कार होणे हेच
ज्ञान आहे. कारण
या ज्ञान प्रकाशाने
द्वैत मताचा अंधार
नष्ट होतो. तपस्या
करून हृदय निर्मल,
शुध्द करणे, वेदशास्त्रांचे
श्रवण करणे, महापुरूषांचा
, सद्गुरूंचा उपदेश श्रवण
करणे ही आत्मज्ञान
मिळविण्याची साधने आहेत.
या आत्मज्ञानाचे उद्दीष्ट सार हेच
आहे की तो अद्वितीय परमात्मा विश्वाच्या आधी होता,
विश्वामध्येही आहे, तसेच
तो विश्वाच्या प्रलयानंतर ही असणार
आहे, त्याच्या शिवाय या
विश्वामध्ये काहीही नाही.
सोन्यापासून अनेक दागिने
बनविले जातात परंतू
त्या दागिन्यांच्या आधी सुध्दा
सोने असतेच आणि
जेव्हा ते दागिने
नष्ट होतील तेव्हा
सुध्दा हे सोने
असणारच आहे, तसेच
जेव्हा या दागिन्यांचा
व्यवहार होतो तेव्हा
तो सोन्याचा व्यवहार होतो. तसेच
या विश्वाच्या पुर्वी नंतर
आणि विश्वामध्ये तो परमात्मा
सुक्ष्मरूपाने स्थित आहे.
तो परमात्मा हेच परमसत्य
आहे. जे विश्व
निर्मितीच्या आधी नाही
व प्रलयानंतरही नाही ते
विश्व सत्य कसे
असेल ती केवळ
मनाची कपना आहे.
ही गोष्ट निश्चित
आहे कोणतीही वस्तु ज्यापासून
बनते, ज्याच्यामुळे ती प्रकाशात
येते तेच त्या
वस्तुचे खरे स्वरूप
असते. तसेच हे
विश्व विकारमयी राजससृष्टि नसून सुध्दा
दिसते तरी त्याचा
कर्ता करविता परमात्माच
आहे. म्हणून या
विश्वातील सर्वकाही इंद्रिय, विषय, मन,
पंच महाभूते यातून तोच
परमात्मा प्रतीत होत
असतो. हे केवळ
आत्मज्ञानानेच मनुष्याला उमजू शकते.
ते आत्मज्ञान स्दगुरूकृपा, उपदेश श्रवण,
चिंतन, आणि स्वानुभूती
यामुळे प्राप्त होऊ शकते.अशा
प्रकारे मनुष्याने निरंतर आत्मानंदामध्ये
मग्न रहावे. या
विश्वातील कोणतीही वस्तु आत्मा
नाही. कारण त्या
सर्व वस्तु नाशीवंत
आहेत. ज्या मनुष्यास
आत्मसाक्षात्कार झालेला आहे
त्याला इंद्रिये, मन हे काहीही हानीकारक
तसेच लाभदायक सुध्दा नसते.
जसे आकाशामध्ये ढगाने सूर्य
जरी झाकला गेला
तरी सुध्दा सूर्यास
त्याचा काहीही परिणाम
होत नाही. जसे
आकाशाला वारा वाळवू
शकत नाही, अग्नि
जाळू शकत नाही,
पाणी भिजवू शकत
नाही, धूळ मलीन
करू शकत नाही,
आणि ऋतूू प्रमाणे
थंडी, उष्णता व
पावसाळा यांचा काहीही
परिणाम होऊ शकत
नाही, कारण हे
सर्व क्षणिक भाव
आहेत. तर आकाश
हे या सर्वांचे
आश्रयस्थान आहे. तसेच
सत्वगुण, रजोगुण व
तमोगुणांचा अविनाशी आत्म्यावर परिणाम होत
नाही. आत्मसाक्षात्कारी मनुष्य त्रिगुणात्मक
प्रकृतीमध्ये, संस्काराप्रमाणे कर्म करताना
त्यामध्ये आसक्त होत
नाही कारण त्याने
आनंदस्वरूप साक्षात्काराने या विश्वाच्या
सर्व अपेक्षा नष्ट केलेल्या
असतात. जो मनुष्य
आत्मानुभूतीमध्ये मग्न आहे
याला हे माहीत
नसते तो उभा आहे की बसलेला आहे,
चालतो आहे की झोपला आहे,
भोजन करतो की
मलमूत्र त्यागतो आहे, की
अजून दुसरे काही
कर्म करीत आहे.
तो आत्मस्वरूपामध्ये स्थित असतो.
जसे सूर्योदय झाल्यानंतर अधाराचे आवरण नष्ट
होते तसेच आत्मज्ञानाच्या
स्वयंप्रकाशामध्ये या विश्वाच्या
मायेचे आवरण नष्ट
होते. आत्म्याला अस्तित्व, वृध्दि, परिवर्तन, हास आणि
विनाश हे विकार
नसतात. व्यवहार दृष्टिने त्याला मनुष्याच्या
शरीरातील प्राण असे
म्हणतात. या अद्वितीय
आत्मतत्त्वामध्ये अर्थहीन नावांची विवीधता मानणे हा
मनाचा भ्रम आहे.
काही अहंकारी पंडित द्वैत
मताचा पुरस्कार करतात. परंतू
तो केवळ शब्दांचा
व्यर्थ खेळ आहे.
कारण ते असत्य
आहे.
असे परमार्थाचे
तत्त्वज्ञान श्रीकृष्णाने उध्दवाला समजावून सांगितले आहे. परमात्मा
एकच आहे. तोच
अंशरूपाने सर्वत्र स्थित आहे.
हे अद्वैत तत्त्वज्ञान
एकदा पुर्णपणे समजले, उमजले,
अनुभवले म्हणजे परमसत्याचे
ज्ञान होते आणि
धर्मशास्त्रांचे आचरण आपोआप
केले जाते. हेच
तत्त्व अनेक उदाहणे
देऊन स्पष्ट केले
आहे. आणि हे परमसत्याचे ज्ञान कोणती
उपााना करून प्राप्त
होते याचे सुध्दा
मार्गदर्शन केले आहे.
जसे एकदा अमृत
प्राशन केल्यानंतर इतर काहीही
पिण्याची इच्छा रहात
नाही त्या प्रमाणे
एकदा हे आत्मज्ञान
प्राप्त झाल्यावर सर्व दैनंदीन
कर्मे आपोआप होतात
ती करावी लागत
नाहीत.
श्रीकृष्णभक्ताने आपली सर्व
दैनंदीन कर्मे श्रीकृष्णासाठी
करावीत. आणि ती कर्मे करताना
श्रीकृष्णाचे स्मरण करावे.
अशी नित्य साधना
बराच काळ केल्यानंतर
त्या भक्ताचे मन व चित्त श्रीकृष्णामध्ये
हळुहळु समर्पित होते. त्या
भक्ताने श्रीकृष्णभक्तांच्या सहवासामध्ये नेहमी रहावे.
त्यांच्या आचरणाचे अनुकरण करावे.
विशेष उत्सवाच्या दिवशी सर्वजण
मिळून नाचून गाऊन
महोत्सव साजरा करावा
शुध्द अंतःकरणाने सर्व प्राणीमात्रांचे
ठिकाणी श्रीकृष्णाचे रूप पहावे.
तसेच ब्राह्मण आणि चांडाळ,
चोर आणि ब्राह्मणभक्त,
सूर्य आणि काजवा
तसेच कृपावंत व रानटी
मनुष्य या सर्वांमध्ये
समान दृष्टि ठेवणारा
खरा ज्ञानी भक्त
समजावा. जेव्हा सर्व
प्राणीमात्रांचे ठिकाणी श्रीकृष्णभावना
दृढ होते तेव्हा
ईर्षा, तिरस्कार, अहंकार हे
दोष दूर होतात.
सर्व संशय नष्ट
होतात. हाच भागवत
धर्म आहे. याचे
आचरण केल्यानंतर कोणत्याही विघ्नबाधेने या भक्ताचे
चित्त विचलीत होत
नाही. कारण हा
भागवत धर्म निष्काम
आहे. या भागवत
धर्मामध्ये कोणतीही त्रुटी नाही
तसेच निरर्थक कर्म जरी
श्रीकृष्णास निरपेक्ष भावनेने समर्पित केले तरी
सुध्दा प्रसन्नता येते. हे
या भागवत धर्माचे
वैशिष्ट्य आहे. मोठमोठ्या
गर्वीष्ठ पंडितांची सुध्दा परिक्षा
होते असे अत्युच्च
अवस्थेचे हे तत्त्वज्ञान
आहे. जे मनुष्यालाच
नव्हे तर देवतांना
सुध्दा समजणे अत्यंत
कठीण आहे. तरी
सुध्दा श्रीकृष्णाने ते गुढ तत्त्वज्ञान अगदी सोपे
व सहज करून
स्वतः आपल्या परमप्रिय
उध्दवास सांगितले आहे. जो
भक्त हे मर्म
ज्ञान समजून उमजून
घेतो त्याच्या हृदयातील संशयग्रंथी नष्ट होऊन
तो मुक्त होतो.
हे गुढ तत्त्वज्ञान
दांभिक, नास्तिक, शंखेखोर, अश्रध्दाळू व उध्दट
यांना कधीही सांगू
नये तर भक्तांना
अवश्य सांगावे. जरी भक्त
शूद्र असेल तरी
त्यास अवश्य सांगावे.
जो हे गुढ तत्त्वज्ञान भक्तांना स्पष्ट करून
सांगतो तो पवित्र
होतो कारण तो
या तत्त्वज्ञाना द्वारे श्रीकृष्णाचेच
दर्शन घडवित असतो.
तसेच जे भक्त
हे गुढ तत्त्वज्ञान
एकचित्ताने, श्रध्देने श्रवण करतात
ते सुध्दा पवित्र
होतात. जसे दिव्य
अमृताचे प्राशन केल्यानंतर
दुसरे कोणतेही अन्य पेय
पिण्याची इच्छा होत
नाही त्याच प्रमाणे
या पवित्र तत्त्वज्ञानाचे
अनुकरण केल्यानंतर काहीही नव्याने
जाणण्याची इच्छा रहात
नाही
भागवत धर्मार्चे
तत्त्वज्ञान श्रीकृष्णाने उध्दवाला अगदी सोप्या
शब्दामध्ये समजावून सांगितले आहे. भागवत
हा एक आध्यात्मिक
विचार आहे. शरीराचा
आत्म्याशी असलेला संबंध
समजून घेण्याचा विचार आहे.
भागवत म्हणजे फक्त
इतिहास तसेच पुराण
नाही, ते एक परमसत्य आहे. भागवत
हा एक मनुष्यजीवन
सार्थकी लावण्याचा सविस्तरपणे केलेला उपदेश
आहे. भागवत ही
एक मृत्युच्या भीती वर
मात करण्याची शक्ती आहे.
भागवत हा एक हिंदू संस्कृतीतील
महत्वाचा धार्मिक ग्रंथ आहे.
यामध्ये आत्मज्ञानाचे तत्वज्ञान सांगीतले आहे. कलीयुगाच्या
प्रारंभी भगवान व्यासांनी
या भागवताची रचना केली.
यामध्ये अखिल मानवाच्या
परमकल्याणाचे तत्वज्ञान सहजपणे सांगीतले
आहे. तेव्हा अखिल
मनुष्यजात हाच एक दृष्टीकोन त्यांच्या समोर होता.
या मनुष्यजातीचे कल्याण कसे
साधता येईल याचेच
मार्गदर्शन केलेले आहे.
हा भागवतधर्म सदा सर्वकाळ
सर्वांसाठी आहे. हे
तत्वज्ञान जिज्ञासू पर्यंत पोहोचविण्याची
आज गरज आहे.
कारण या तत्वज्ञानाच्या
अभ्यासाने सांगणायाचे तसेच ऐकणायाचे
परम कल्याण होते.
आपल्या संस्कृतीचा वारसा उद्याच्या
नवीन पिढीला देणे
हे आपले कर्तव्यच
आहे. भागवताचा आज उपयोग
काय, हे भागवत
म्हणजे काय, हे
समजल्यावर स्पष्ट होतो.
आपला देह म्हणजे
आपण नाही हे
समजल्यानंतर जी स्थिती
होईल, तशी भगवान
रमण महर्षींची झाली होती.
तात्पर्य़ हेच की जेव्हा देहाचीच
आसक्ती कमी होते
तेव्हा मान, अ्पमान,
गर्व, अहंकार, क्रोध, मोह,
मत्सर सर्व काही
देहाचे गळून पडते.
हेच आजच्या परिस्थितीचे
मुळ कारण आहे.
आज आपण सर्वत्र
पहातो आहे. चोरी,
दरोडे, खून, मारामारी,
जाळपोळ, हत्याकांड, सत्तेची हाव, भ्रष्टाचार,
स्त्रीयांवर अत्याचार, इत्यादी सर्व काही
देहाच्या आसक्तीमुळेच होते आहे.
आजच्या काळातील उदाहरण -- भारताचे
उपराष्ट्रपती यांना राष्ट्रपती
पद मिळाले नाही
तर लगेच त्यांना
मानसिक धक्का बसला
व त्यात त्यांचा
अंत झाला. राष्ट्रपती
पद हेच जीवनाचे
ध्येय समजून ते
मिळाले तरच जीवन
नाही तर जीवनाला
काही अर्थ नाही
अशी त्यांची समजूत झाली.
भागवतातील मुख्य जीवनमूल्य
आत्मज्ञान अवगत झाल्यामुळे
आजच्या समाजातील देहाभिमान संपून आज
भेडसावणाया सर्व समस्या
संपुष्टात येतील. आजच्या
सर्व समस्या देहाशी
निगडीत आहेत. देहाभिमानाचा
विसर झाल्यावर एकात्मतेची भावना निर्माण
होइल. मुख्य म्हणजे
मृत्युचे भय रहाणार
नाही. कारण मृत्यु
हा देहाचा आहे.
आणि आपले खरे
स्वरूप देह नसून
आत्मा आहे. हेच
भागवत धर्मार्चे सार आहे.
हे तत्वज्ञान समजण्यास अतिकठीण आहे. सामान्य
मनुष्यासच काय तर मोठमोठ्या विद्वानांना, दिर्घकाळ तपसाधना केलेल्यांना, देवदेवतांना सुध्दा हे
तत्वज्ञान समजणे, उमजणे
केवळ अशक्य आहे.
परंतू श्रीकृष्णाने स्वतः आपल्या
परमप्रीय भक्तांना त्यांच्या कल्याणासाठी सोपे व सरळ करून
सांगितले आहे. भक्तांना
हे रहस्य समजते
कारण भक्तांमध्ये अहंकार नसतो.
ते परमात्म्यामध्ये एकरूप झालेले
असतात. तसेच महत्वाची
सूचना केलेली आहे
की हे तत्वज्ञान
नास्तीकांना कधीही सांगू
नये कारण त्याची
चेष्टा होते. त्यातून
गैरसमजूती व संशय निर्माण होतात. आणि
शेवटी या तत्वज्ञानाचे
महत्व थोडक्यात सांगितले आहे की हे तत्वज्ञान
एकदा आत्मसात केल्यानंतर इतर काहीही
समजून घेण्याची गरज वाटत
नाही. कारण या
विश्वाचे एकमेव परमसत्य
निरनिराळ्या पध्दतीने समजून सांगितलेले
आहे. जसे हिमालयाच्या
सर्वोच्च शिखरावर जाण्याचे अनेक मार्ग
असले तरी तेथे
एकदा पोहोचल्यावर इतर मार्गांचा
विचार करण्याची इच्छाच होत
नाही.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु
।।
No comments:
Post a Comment